27 June, 2025
वैद्यकीय सहाय्य सल्ला शिबिरात केली दिव्यांग विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी
हिंगोली (जिमाका), दि. 27 : उम्मीद फाऊन्डेशन यांच्या सहकार्याने तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 25 जून, 2025 रोजी हिंगोली येथील खाकीबाबा निवासी अस्थिव्यंग विद्यालयामध्ये व दि. 26 जून, 2025 रोजी कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील निवासी मतिमंद विद्यालयात मोफत दिव्यांग वैद्यकीय सहाय्यता मूल्यमापन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक ती उपकरणे उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा समाज कल्याण अधिकारी गीता गुठ्ठे, खासदार कार्यालयाचे प्रतिनिधी दयानंद सोनसळे, उम्मीद फाऊंडेशनचे संचालक परवेज फरीद, डॉ.बुशरा खान, प्रकल्प अधिकारी सय्यद निलोफर, राईज बायोनिक्स कंपनीच्या डॉ.स्नेहा प्रवीण, डॉ. रिम्पल लॉरे, डॉ. अच्युत नरेन, शिबीर समन्वयक हर्षवर्धन लव्हाळे, शिबीर सहायक सरफराज, समाज कल्याण विभागाचे विस्तार अधिकारी मधुकर राऊत, सहायक सल्लागार विजयानंद पकाने, संगमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे वैजनाथराव तोनसुरे, जगजाहीर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनंतराव करंजे यांची उपस्थिती होती.
खाकीबाबा निवासी अस्थिव्यंग विद्यालयातील शिबीर यशस्वीतेसाठी एम. के. शिंदे, व्ही.एन.उबाळे, एस.पी.इंगोले, आर. एस. झगडे, ए.एन.निकुंभ, व्ही. एस. लामतुरे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मऱ्यांनी सहभाग नोंदवला. तर डोंगरकडा येथील निवासी मतिमंद विद्यालयातील शिबीर यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका लता बेंडके, निवासी अस्थिव्यंग विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडूरंग दाभाडे, कृष्णा राव, अनिल जगताप, एस. ए. नरवाडे तसेच निवासी मतिमंद विद्यालय व निवासी अस्थिव्यंग विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान देऊन कार्यक्रम यशस्वी केला.
***
ग्रामीण विकास विभागाच्या एकात्मिक वित्त विभागाचे संचालक जगदीश कुमार यांचा हिंगोली दौरा
हिंगोली (जिमाका), दि. 26 : भारत सरकारच्या ग्रामीण विकास विभागाच्या एकात्मिक वित्त विभागाचे संचालक जगदीश कुमार हे दि. 28 जून ते 2 जुलै, 2025 या कालावधीत हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
श्री. जगदीश कुमार हे दौरा कालावधीत ग्रामीण विकास विभागामार्फत हिंगोली जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ग्राम विकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेचे मूल्यांकन करणार आहेत.
*****
वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा हिंगोली दौरा
हिंगोली (जिमाका), दि. 26 : कै.वसंतराव नाईक शेती स्वावंलबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे दि. 1 जुलै, 2025 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दि. 1 जुलै रोजी दुपारी 12 वाजता अमरावती येथून हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता विश्राम भवन, हिंगोली येथे आगमन. दुपारी 3.30 वाजता रोहयो अंतर्गत शासकीय गायरान जमिनीवर चारा लागवडीसंबंधी उपजिल्हाधिकारी (रोहयो) व तहसीलदार हिंगोली यांनी सुचविलेल्या हिंगोली तालुक्यातील गावास भेट. सायंकाळी 6 वाजता सोईनुसार अमरावती मार्गे काटोलकडे प्रयाण .
**
26 June, 2025
जिल्ह्यातील ५ हजाराहून अधिक लोकसंख्येची १४ गावे 'रुफटॉप सोलर मॉडेल व्हिलेज' घोषित होणार - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली, दि. २६ (जिमाका): सन २०११ च्या जणगणनेनुसार जिल्ह्यातील ५,००० हून अधिक लोकसंख्या असलेली १४ गावे ‘रूफटॉप सोलर मॉडेल व्हिलेज’ म्हणून घोषित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत संबंधित गावे सौरऊर्जेवर आधारित विविध सुविधा प्राप्त करून घेणार असून, हरित ऊर्जा वापरात जिल्ह्याची मोठी कामगिरी होणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आढावा बैठकीत सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हास्तरीय रुफटॉप सोलर, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेचा आढावा या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी घेतला.
यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता आर. एम. चव्हाण, शिखर बँकेचे व्यवस्थापक पंकज बोरकर, महाऊर्जेचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत गायकवाड, महावितरणचे उपविभागीय अभियंता रणजीत देशमुख, श्री. पिसे, डिग्रसचे सरपंच, यांच्यासह रुप टॉप सोलरचे व्हेंडर यावेळी उपस्थित होते.
जी गावे १०० टक्के सौरऊर्जायुक्त होतील, त्या गावांना केंद्र शासनाचे १ कोटी रुपयांचे अनुदान मिळणार असून, या अनुदानाच्या रकमेतून या योजनेच्या माध्यमातून घरगुती सौर दिवे, पथदिवे, सौरपंप, शासकीय इमारतींवरील सोलर पॅनल्स आदींची कार्यवाही हाती घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. महावितरण व मेडाच्या अधिका-यांनी याकामी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतींच्या सहकार्याने गावोगावी जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असून, स्वयंपूर्ण व हरित ऊर्जेवर चालणारी गावे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
या योजनेंतर्गत शासकीय अनुदानासोबत स्वयंप्रेरित सहभागालाही प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी संबंधित यंत्रणांनी तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, असे निर्देश दिले आहेत.
या योजनेच्या माध्यमातून जी व्यक्ती एखाद्या घराला सौरऊर्जेवर आणण्यासाठी प्रोत्साहीत करेल, त्याने त्याचा संदर्भ सोलर अँप्लिकेशनमध्ये टाकल्यास त्याला १ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार असून, यामधूनही युवकांना पैसे कमावण्याची व गावे सौरऊर्जेवर चालविण्यासाठी प्रोत्साहन देण्याची संधी मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांनी जिल्ह्यात वीज वितरणाच्या सुरू असलेल्या पायाभूत सुविधा, भविष्यात येणा-या योजना आणि सद्यस्थितीत चालू असलेल्या योजनांची सादरीकरणाव्दारे माहिती दिली. तसेच हानी कमी करण्यासाठी आरडीएसएस, तसेच वीज वाहिन्यांचे विलगीकरणाची माहितीही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी संबंधित यंत्रणेकडून जाणून घेतली.
या योजनेमध्ये मॉडेल सोलर व्हिलेजकरिता हिंगोली जिल्ह्यातील एकूण १४ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार निवड करण्यात आलेल्या गावामध्ये जास्तीत जास्त घरावरती सौरसंच आस्थापित करण्यासाठी महावितरणद्वारे कार्यक्रम राबवण्याकरिता
जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सूचना दिल्या तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतीवर वीज पारेषण संलग्न सौरसंच बसवण्याकरिता सर्व शासकीय
इमारतींचे सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याकरिता महाऊर्जा विभागास सूचना दिल्या.
*****
बँकांनी खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी घेतला विविध बँकांचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्ह्यातील सर्व बँकांनी योग्य नियोजन करुन सन 2025-26 च्या खरीप पीक कर्जाचे जास्तीत-जास्त वितरण करुन वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक पंकज बोरकर, आरबीआयचे अधिकारी अरुण बाबू, एसबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक हेमराज बनसोड, विविध बँकेचे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, जिल्ह्यात बँकनिहाय पीक कर्ज वितरणाचा तपशील, पीक कर्जाचा केलेला परतावा, पीक कर्ज नूतनीकरण प्रकरणे याची तपशीलवार माहिती उपलब्ध करुन द्यावी. तसेच चालू वर्षात खरीप पीक कर्जाचे 875 कोटी 90 लाखांचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 278 कोटी 81 लाख 75 हजार रुपयांचे पीक कर्ज वितरण झाले आहे. त्याची टक्केवारी 31.38 टक्के इतकी आहे. यासाठी गावात शिबिरांचे तसेच गावभेटीचे आयोजन करुन सर्व बँकांनी चालू वर्षात जास्तीत-जास्त पीक कर्जाचे वितरण करुन वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे. ज्या बँका उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत. तसेच बँकेचे अधिकारी बैठकीला अनुपस्थित आहेत त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे निर्देश दिले.
तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री स्वनिधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती विमा योजना, पशुसवंर्धन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना, किसान क्रेडिट कार्ड, बचतगटांना कर्जाची प्रकरणे तात्काळ मंजूर करुन त्याचा अहवाल सादर करावा. बचतगटांना तालुकानिहाय कार्यक्रम घेऊन लोकप्रतिनिधींच्या हस्ते कर्जाचे वितरण करावे. तसेच विविध योजनेत आपणांस देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. धरती आबा योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये बँकांचे स्टॉल लावून शासनाच्या विविध योजनाचा लाभ द्यावा. जिल्ह्यात मागणीप्रमाणे नवीन शाखा सुरु करण्याची कार्यवाही करावी किंवा बँक ग्राहक सेवा केंद्र सुरु करुन नागरिकांना सेवा उपलब्ध करुन द्याव्यात. आरसेटीने शेतकरी व नागरिकांना रेशीम, हळद प्रक्रिया उद्योग यासह विविध प्रशिक्षणाचे आयोजन करुन लाभ द्यावा. प्रॉपर्टी कार्डच्या आधारे नागरिकांना कर्ज उपलब्ध करुन द्यावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिले.
***
अमृत लक्षित गटातील (खुला प्रवर्ग) उमेदवारांकरिता मोफत स्वरुपाचा अमृत आयात-निर्यात प्रशिक्षण
हिंगोली, दि.26 (जिमाका): महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अमृत लक्षित गटातील (खुला प्रवर्गासाठी) आयात-निर्यात प्रशिक्षण कार्यक्रम 21 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
खुल्या प्रवर्गातील अमृत संस्थेच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी हे प्रशिक्षण सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती महिलांसाठी निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगार युवक-युवती व महिलांना रोजगार व उद्योग करण्याची संधी या प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध होणार आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील आयात-निर्यात वाढीच्या दृष्टिकोनातून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. निर्यात क्षेत्र व त्याचे महत्त्व, निर्यात म्हणजे काय व त्याची प्रक्रिया, परकीय व्यापार धोरणाचा आढावा 2015-20 ते 2020-25, पॅक हाउस मानक कार्य व्यवस्थापन, निर्यातीतील इसीओ टर्म, परदेशात खरेदीदार कसे शोधावे, अपेडा/फेमाच्या भूमिकेचा अभ्यास, डीजीएफटीची भूमिका, नवीन कंपनी तयार करणे, इसीजीसीची भूमिका, पेमेंट व्यवस्थापन, इत्यादी विषयांवर सखोल मार्गदर्शन होणार आहे. वरील प्रशिक्षणाकरिता उमेदवाराची प्रत्यक्ष निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी असून, पदवीधर व तांत्रिक पदवीधारकास प्राधान्य असेल. यासाठी किमान वयोमर्यादा 21 ते 50 वर्षे आहे. अधिक माहिती व नोंदणी करिता एमसीइडी जिल्हा कार्यालय द्वारा जिल्हा उद्योग केंद्र हिंगोली, दुसरा मजला एस-12 जिल्हाधिकारी प्रशासकीय कार्यालय, नांदेड रोड या ठिकाणी दत्ता उचीतकर (9960189358) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र हिंगोली यांनी केले आहे.
*****
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी
हिंगोली(जिमाका), दि. 26 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार तानाजी मुटकुळे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, समाज कल्याणच्या प्रादेशिक उपायुक्त छाया कुलाल, इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक यादव गायकवाड, बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, आयकर विभागाचे अंकेत जाधव, असिस्टंट कमांडंट अक्षय राठोड, विशेष अधिकारी अमोल घुगे, कार्यालयीन अधीक्षक आत्माराम वागतकर उपस्थित होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. कांबळे यांनी विचार व्यक्त केले. आयकर विभागाचे अंकेत जाधव, असिस्टंट कमांडंट अक्षय राठोड यांनी स्पर्धा परीक्षेविषयी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुट्टे यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे भारतीय संविधानाच्या उद्देशिका प्रतिमा व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला, संविधान उद्देशिकेचे वाचनही सामूहिकरीत्या करण्यात आले.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त डॉ. वर्षा कुरील, प्रा. विक्रम जावळे, शांताबाई मोरे, बबन मोरे आदीं मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातून प्रथम आलेल्या गुणवंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार 5 हजार रुपये, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ योजने अंतर्गत श्रीमती संगीता राठोड यांना पाच लाख रुपयांचा सानुग्रह अनुदान प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी गीते यांनी केले, तर शेवटी वर्षा घुगे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय विभागातील सर्व कर्मचारी व बार्टी समतादूत कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 2 व 3 जुलै रोजी आरक्षण सोडत
हिंगोली(जिमाका), दि. 26 : महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, 1967 च्या नियम 2 (अ) मधील तरतुदीनुसार हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गातील महिला) आरक्षण निश्चित करण्यासाठी तालुकास्तरावर आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठीच्या तारखाही निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
प्रत्येक तालुक्यासाठी त्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांना आरक्षण सोडत काढण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. सेनगाव व वसमत तालुक्याची आरक्षण सोडतीची बैठक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी दि. 2 जुलै, 2025 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. तर हिंगोली, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्याची आरक्षण सोडतीची बैठक संबंधित तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी दि. 3 जुलै रोजी दुपारी 12 वाजता निश्चित करण्यात आली आहे.
वरील तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नमूद दिनांकास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांसाठीचे आरक्षण संबंधित तालुक्याच्या नियुक्त केलेल्या समन्वय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पूर्ण करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत.
******
जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी महसूल विभागाचे तहसीलदार आश्विनकुमार माने, नायब तहसिलदार डी. एस.जोशी, सचिन जोशी, सी.आर.गोळेगावकर, संतोष बोथीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
*****
25 June, 2025
वसमत आयटीआयमधील 15 विद्यार्थ्यांची एल ॲन्ड टी कंपनीसाठी निवड
हिंगोली (जिमाका), दि. 25 : वसमतनगर येथील स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयटीआयमधील आजी, माजी विद्यार्थ्यांसाठी संस्थेमध्ये भारतातील नामांकित कंपनी एल ॲन्ड टी मुंबई येथील कंपनीला बोलावून कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पस मुलाखतील 15 विद्यार्थ्यांनी निवड करुन त्यांना निवड पत्र देण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मुलाखतीला सामोरे जाऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कंपनीकडून आलेले प्रतिनिधी नागसेन खंदारे यांनीही विद्यार्थ्यांना कंपनीची माहितीसह कंपनीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणारे वेतन, सोयी सुविधा व इतर भत्ते याची माहिती दिली. त्यानंतर संस्थेतील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन तात्काळ निकाल घोषित केले.
या कॅम्पस मुलाखतीसाठी संस्थेतील गट निदेशक टी. जे. झाड, निदेशक जी. आर. कोरवार, जी. एन. येमेवार, एन.एस. सबनवार, एस.आर.पडघन, एस.आर.खुपसे श्रीमती आर. जे. शहारे तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
*****
आणीबाणीच्या अनुषंगाने घटनांवर आधारित विशेष प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते झाले उद्घाटन
• आणीबाणी काळात लढा देणाऱ्या व्यक्तींचा जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांच्या हस्ते मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन गौरव
• 25 व 26 जून या दोन दिवशी नागरिकांना पाहता येणार चित्रमय प्रदर्शन
• शिवाजीराव देशमुख सभागृहात सर्वांसाठी खुले चित्रप्रदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 25 : देशात दि. 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला आज बुधवार (दि.25) रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आज येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात दोन दिवशीय चित्रमय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलन करुन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार श्रीकांत भुजबळ, हयात आणीबाणी धारक लक्ष्मीकांत शिरडकर, उपसंपादक चंद्रकांत कारभारी यांच्यासह हयात आणीबाणी धारक आणि त्यांचे वारस, नागरिक उपस्थित होते.
या प्रदर्शनात आणीबाणीच्या अनुषंगाने विविध घटना व घडामोडी, आणीबाणी विरोधी संघर्षात सहभागी झालेले विविध मान्यवरांची छायाचित्रे, तसेच छायाचित्रांसोबत अनुरुप व औचित्यपूर्ण असा मजकूर, आणीबाणीच्या कालावधीतील संपूर्ण संघर्ष याची माहिती संक्षिप्त स्वरुपात दिली आहे. या प्रदर्शनामध्ये छायाचित्रांबरोबरच संक्षिप्त व माहितीपूर्ण मजकूर, घटनाक्रम, माहितीफलक यांची माहिती देण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह विविध मान्यवर यांनी प्रदर्शनाची पाहणी केली.
हे चित्रमय प्रदर्शन दि. 25 व 26 जून, 2025 या दिवशी सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असून, जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
देशाच्या लोकशाही परंपरेचे रक्षण करण्याच्या या लढ्यातील योगदान दिलेल्या हयात आणीबाणीधारक आणि त्यांच्या वारसांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व नागरिकांना देशभक्तीपर माहितीचे चित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी कैलास लांडगे, श्रीकांत देशमुख उपस्थित होते.
*****
24 June, 2025
आणीबाणी काळात लढा देणाऱ्या व्यक्तींचा मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन होणार गौरव
• आणीबाणी लागू करण्यात आलेल्या घटनेला 50 वर्षे पूर्ण होत असल्याने 25 व 26 जून रोजी दोन दिवशीय चित्रमय प्रदर्शनाचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 24 : देशात दि. 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला 25 जून रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात दि. 25 व 26 जून, 2025 या कालावधीत दोन दिवशीय चित्रमय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. 25 जून, 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते फीत कापून करण्यात येणार आहे.
तसेच दि. 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत घोषित आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या आणि त्यासाठी बंदिवास सोसावा लागला अशा व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्याअनुषंगाने बुधवार, दि. 25 जून 2025 रोजी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र वितरीत करण्याच्या सभारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली तालुक्यातील हयात आणीबाणी धारक किंवा त्यांच्या वारस पत्नी यांना शिवाजीराव देशमुख सभागृह, हिंगोली येथे दि. 25 जून, 2025 रोजी सकाळी 10 वाजता वितरण करण्यात येणार आहे. तर कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील हयात आणीबाणी धारक किंवा त्यांच्या वारस पत्नी यांना संबंधित तहसील स्तरावर वितरीत करण्यात येणार आहे. संबंधित तालुक्यातील हयात आणीबाणी धारक किंवा त्यांच्या वारस पत्नी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
*****
जिल्हा व सत्र न्यायालयात आरोग्य शिबिर संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 24 : येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आज न्यायिक अधिकारी, विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी व पक्षकार यांच्याकरीता सर्व रोग निदान व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 सौ. एस. एन. माने (गाडेकर), तदर्थ जिल्हा न्यायाधीश-1 पी.जी.देशमुख, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर वि. म. मानखैर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर पी.बी. महाळंकर, मुख्य न्यायदंडाधिकारी सौ. ए. बी. कुरणे, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती पी. आर. पमनानी, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सौ.डी. व्ही. भंडारी, तिसरे सह दिवाणी कनिष्ठ स्तर सी. एस. एस. पळसुले तसेच जेष्ठ विधीज्ञ अॅड. सतीष देशमुख, सदस्य बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवा, अॅड. एस. आर. भुक्तार, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ हिंगोली यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
या आरोग्य शिबिरामध्ये हृदयविकार, किडनी विकार, कान, नाक, घसा विकार, त्वचा विकार, दंत विकार, स्त्री रोग, अस्थिरोग, नेत्र तपासणी तसेच रक्त तपासणी इत्यादी आरोग्यविषयक तपासण्या, प्राथमिक उपचार व सल्ला तज्ञ डॉक्टरांकडून निशुल्क देण्यात आल्या.
या आरोग्य शिबिरास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हिंगोली येथील डॉ. फैसल सलीम खान, डॉ. विनय बगाटे, डॉ. वर्षा पवार, डॉ. अश्विनी राठोड, डॉ. खोकले व रुग्णालयातील कर्मचारी यांनी न्यायिक अधिकारी, विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी व पक्षकार यांची तपासणी करून त्यांना प्राथमिक उपचार व सल्ला देण्यात आला. आरोग्य शिबिरास 310 जणांची आरोग्य तर 150 जणांची रक्त तपासणी करण्यात आली.
***
बायोमेट्रीक प्रणालीवर उपस्थिती न नोंदविणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यावर कारवाई करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि.24 : शासनाने प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांची कार्यालयात उपस्थिती होतांना बायोमॅट्रीक मशीनवर नोंदविणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात व सर्व उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आले आहे.
शासनाने दिनांक 29 फेब्रुवारी, 2020 पासून पाच दिवसाचा आठवडा लागू केला असून सोमवार ते शुक्रवार कार्यालयातील कामकाजाची वेळ सकाळी 09.45 ते सायंकाळी 6.15 अशी निश्चित करण्यात आलेली आहे.
हिंगोली जिल्हा आस्थापनेवरील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी उक्त नमूद केलेल्या वेळेत बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे कार्यालयात उपस्थिती नोंदविण्यात यावी, जे कर्मचारी अशा पध्दतीने उपस्थिती नोंदवित नसतील त्या अधिकारी, कर्मचाऱ्याविरुद्ध नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिलेले आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जे अधिकारी कर्मचारी शासनाने ठरवून दिलेल्या कार्यालयातील कामकाजाच्या विहित वेळेत बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे कार्यालयात उपस्थिती नोंदवित नाही त्या अधिकारी कर्मचारी यांची अर्धा दिवसाची गैरहजेरी समजून त्यांचे अर्धा दिवसाचे वेतन कपात करण्याबाबत आदेश दिले आहे.
******
23 June, 2025
जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि.23 : येथील जिल्हा व सत्र न्यायालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये न्यायिक अधिकारी, वकील, कर्मचारी व पक्षकार यांच्यासाठी उद्या, दि. 24 जून, 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये तज्ञ डॉक्टर व तपासणीसांकडून हृदयविकार, किडनी विकार, कान, नाक, घसा विकार, त्वचा विकार, दंत विकार, स्त्री रोग, अस्थिरोग, नेत्र तपासणी अशा विविध तपासण्या तसेच विविध प्रकारच्या रक्त तपासण्या इत्यादी आरोग्य विषयक तपासण्या, प्राथमिक उपचार व सल्ला तज्ञ डॉक्टरांकडून निशुल्क देण्यात येणार आहे.
सर्व न्यायिक अधिकारी, वकील, न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार यांनी या आरोग्य शिबिरात उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी केले आहे.
***
21 June, 2025
जिल्हा व सत्र न्यायालयात जागतिक योग दिन साजरा
हिंगोली (जिमाका),दि.२१ : तालुका विधी सेवा समिती व जिल्हा न्यायालय वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रांगणामध्ये आज न्यायिक अधिकारी, वकील संघ व कर्मचारी यांच्या वतीने "जागतिक योग दिवस" साजरा करण्यात आला.
यावेळी अशोक पवार, सौ. पवार, राजकुमार टिळे व अॅड. एकनाथ बांगर यांनी योगाचे वेगवेगळे आसन करून दाखवले. तसेच दररोज सकाळी योग केल्यास कोणतेही गंभीर स्वरूपाचे आजार होणार नाहीत अशी महत्वपूर्ण माहिती सांगितली.
या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी.एस. अकाली, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ पी.जी. देशमुख, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वि.म. मानखैर, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व्ही. व्ही. सावरकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. बी. महाळंकर, मुख्य न्याय दंडाधिकारी ए.बी. कुरणे तसेच जेष्ठ विधीज्ञ अॅड. सतीष देशमुख, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एस. आर. भुक्तार तसेच कर्मचारी वृंद हजर होते.
कार्यकमाचे आभार प्रदर्शन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वि. म. मानखैर यांनी केले.
*******
जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग वसतिगृहात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा
हिंगोली (जिमाका), दि.21 : येथील जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग वसतिगृहात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली आज अकरावा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला.
या योग दिनाची ‘‘योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ (एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग)’’ अशी संकल्पना ठेवण्यात आलेली होती. या योग दिनाचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक मोरे यांच्या हस्ते धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करुन करण्यात आले.
योगाचे प्रशिक्षक डॉ. राधा नगरे व संतोष वानखेडे यांनी उपस्थित विद्यार्थी, अधिकारी यांच्याकडून योगासने व प्राणायाम करुन घेत मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य कुलदीप कांबळे, मेट्रन आशा क्षीरसागर, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विद्या देवकते, डॉ. संजय देशमुख, डॉ. सोनी अग्रवाल, डॉ. रहेमतुल्ला खान, डॉ. अझहर देशमुख, सुनिल जाधव, सोपान वानखेडे, प्रकाश ठाकरे, राजू बसिया, सुरेश चिटकरे, स्वाती वरखडकर व नर्सिंग वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी डॉ. मोरे यांनी उपस्थितांना योगा दिनाचे महत्व सांगून योगाभ्यास दररोज करावा, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधिकारी, कर्मचारी व नर्सिंग वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
*****
हिंगोली येथे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
• योग हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे-जिल्हाधिकारी
हिंगोली (जिमाका), दि.21 : येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर आयोजित अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, योग विद्याधाम, पतंजली योग समिती, हरिओम योगा ग्रुप, विविध सामाजिक संस्था, मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, योग शिक्षक रत्नाकर महाजन, विठ्ठल सोळंके, ज्योती शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, आज दि. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. माणसाला निरोगी राहण्यासाठी योग हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे, असे सांगून सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आज संपूर्ण जगभर हा दिन साजरा केला जात आहे. याचे सर्व श्रेय भारत देशाला, देशाच्या प्रधानमंत्र्यांना आहे. योग हा आपल्या जीवनातला अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सर्वांनी दररोज योग करुन निरोगी रहावे, असे सांगून आमदार तानाजी मुटकुळे यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी माजी खासदार शिवाजीराव माने, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनीही दररोज योग करणे आवश्यक असल्याचे सांगून योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
योगगुरु रत्नाकर महाजन व विठ्ठल सोळंके यांनी योग दिनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाने आपले मित्र व कुटुंबीयांना योगाचे महत्त्व समजावून सांगावे. तसेच योगाचा प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन केले. तसेच योग दिनानिमित्त त्यांनी उपस्थितांकडून योगविद्येची विविध आसने करुन घेतली. योगाची शपथ तसेच प्रार्थना आणि संकल्प करत, शांती पठनाने योग दिनाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन योग शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. या शिबिरास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, योगाभ्यासी मंडळाचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
20 June, 2025
नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदांच्या परीक्षेचे 1 ते 8 जुलै कालावधीत आयोजन
हिंगोली, दि. 20 (जिमाका) : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई 'गट-ड' संवर्गात 284 पदे भरती करीता दि. 22 एप्रिल, 2025 रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याकामी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारणे, तसेच ऑनलाईन पध्दतीने परीक्षेचे आयोजन करण्याकरिता आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकीग पर्सोनेल सिलेक्शन) कंपनीस नियुक्त केले आहे व त्यानुसार आय.बी.पी.एस. कडून दि. 22 एप्रिल 2025 ते 16 मे 2025 दरम्यान ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरुन घेण्यात आलेले आहेत.
आय.बी.पी.एस.च्या संकेतस्थळावर यशस्वीरीत्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची दि. 01 जुलै 2025 ते 8 जुलै 2025 या कालावधीत्त ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र/हॉलतिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आय.बी.पी.एस. कडून पाठविण्यात येणार आहे.
या परीक्षेकरीता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्थेकडून, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध राहावे, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी एस.जी. सुंकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
******
19 June, 2025
आंतरराष्ट्रीय योग दिन, योग संगम पोर्टलवर नोंदणी करा-जिल्हाधिकारी
हिंगोली (जिमाका), दि.19: जिल्ह्यात येत्या 21 जून रोजी अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व व्यापक सहभागासह साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर योगदिनाचे आयोजन अधिक प्रभावी व व्यापक स्वरुपात होण्यासाठी ‘योग संगम’ या केंद्र शासनाच्या https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
यावर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन हा ‘‘योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ (एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग)’’ या संकल्पनेवर साजरा करण्यात येणार आहे.
योग शास्त्र ही भारतीयांनी जगाला दिलेली देणगी आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थौल्य, थॉयराईड वृध्दी, मनोविकार, सांध्याचे विकार तसेच सध्याच्या जीवन शैलीमुळे निर्माण झालेले अनेक आजार योग करण्यामुळे कमी होऊ शकतात. योगाच्या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्यास मदत होते व सकारात्मक ऊर्जा कायम राहते.
हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, नागरी आरोग्य केंद्र, शाळा, महाविद्यालये खाजगी संस्था इत्यादी स्तरावर ‘योग संगम’ पोर्टलवर जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके यांनी केले आहे.
या प्रक्रियेमुळे देशभरातील सर्व योग कार्यक्रमांचे एकत्रीकरण होईल आणि नागरिकांना त्यांच्या नजीकच्या योग उपक्रमांची माहिती सहज उपलब्ध होईल. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 अधिक व्यापक, सर्वसमावेशक आणि यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
******
18 June, 2025
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिबिराचे आयोजन * योग शिबिराचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि.18 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, योग विद्याधाम, पतंजली योग समिती, जिल्हा योगा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जून, 2025 रोजी सकाळी 6 ते 7 वाजे दरम्यान योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या योग शिबिराचा सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व जनतेनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी केले आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाची पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तर समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, योग शिक्षक रत्नाकर महाजन, विठ्ठल सोळंके, क्रीडा शिक्षक आर. एन. गंगावणे, जिल्हा योग संघटनेच्या प्रतिनिधी ज्योती शेळके, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सचिन हाटकर, प्रवीण पांडे, विविध संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान महोदयांनी 2014 च्या राष्ट्रीय महासभेत दिनांक 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्याअनुषंगाने दि. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. पाच हजार वर्षाहून अधिक परंपरा असणारी योगविद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योगविद्या सहाय्यभूत आहे. तसेच केंद्र शासनाने दि. 21 जून, 2025 हा दिवस 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
योगा दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती करणे ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण योग हा आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य भाग आहे. दि. 21 जून, 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करुन जनतेमध्ये आरोग्य आणि भावनिक निरोगीपणा सुधारणा, एक लक्षणीय मालमत्ता म्हणून त्यांचे महत्व आणि योगदान यावर प्रकाश टाकून योगाचा सराव सुरु ठेवण्यासाठी लोकांना प्रेरणा देणे तसेच योगासने नागरिकांचा एक अविभाज्य भाग बनविणे आणि त्याद्वारे सर्वांसाठी आरोग्यदायी जीवन जगणे हे योग दिनाद्वारे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगून या योग दिनासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक, योग साधक, खेळाडू, विद्यार्थी यांनी उपस्थित राहून योगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी यावेळी केले आहे.
यावेळी बोलताना अपर जिल्हाधिकारी श्री. कांबळे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग शिबिरासाठी सर्वांनी समन्वय ठेवून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच विद्यार्थ्यांची रॅली काढून घोषवाक्याच्या माध्यमातून योग दिनाचे महत्व सांगून योग शिबिरासाठी जास्तीत जास्त नागरिक उपस्थित राहण्यासाठी आवाहन करावेत, अशा सूचना केल्या.
***
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 18 : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी गुण प्राप्त झाले असतील, अशा उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी-विद्यार्थीनींना महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 03 ते 05 विद्यार्थ्यांस उपलब्ध निधीच्या अधिन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यामुळे दिनांक 15 जुलै, 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपूर्ण कागदपत्रानिशी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी जिल्हा कार्यालयात संपर्क करावा. उशीरा आलेल्या अर्जाचा जिल्हा कार्यालयामार्फत स्वीकार करण्यात येणार नाही.
मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी अर्जासोबत मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, दोन फोटो, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रासह जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, रिसाला बाजार, सरकारी दवाखान्याजवळ, हिंगोली-413513 येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
***
विविध क्रीडा प्रबोधनीमध्ये सरळ व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश • 24 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 18 : शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे, बालेवाडी पुणे अंतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये रिक्त जागांवर सन 2025-26 करिता सरळ प्रवेश 50 टक्के व कौशल्य चाचणीद्वारे 50 टक्के प्रक्रियेंतर्गत खेळाडून प्रवेश देण्यात येणार आहे.
क्रीडा प्रबोधिनीमध्ये 17 क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते. तथापि, व्हॉलीबॉल करिता 13, सायकलींग-13, जलतरण-7, फुटबॉल-7, ज्युदो-5, जिमनॅस्टीक्स-9 याप्रमाणे खेळाडूंच्या जागा रिक्त असल्याने याच खेळातील खेळाडूनी अर्ज करावेत. जिल्हास्तरावर क्रीडा प्रबोधिनी विभाग चाचणीसाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंची नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे नोंदणी करावी.
प्रवेशासाठी खेळाडूचे नाव, जिल्हा, खेळ प्रकार, जन्म दिनांक, वय व क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र याबाबत माहिती संकलित करुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे दि. 24 जून, 2025 पर्यंत अर्ज सादर करुन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.
**
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन आदिवासी बांधवांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 18 : देशातील आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान ही योजना दि. 2 ऑक्टोबर, 2024 पासून मा. पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 25 प्राधान्यक्षेत्रे व 17 मंत्रालये निश्चित करण्यात आली आहेत. भारत सरकारने आदिवासी समुदायांचे सशक्तीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री जन जाती न्याय महाभियान आणि धरती आबा जन जातीय ग्राम उत्कर्ष अभियान या दोन महत्वाच्या आणि कालबच्द मोहीम हाती घेतल्या आहेत. देशभरातील आदिवासी भागांमध्ये सेवा व पायाभूत सुविधा संतृप्त करणे हा या दोन्ही उपक्रमांचा उद्देश आहे. याव्दारे आदिवासी जमातींचा सामाजिक व आर्थिक विकास साध्य करण्याचे उहिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर जनजातीय कार्य मंत्रालयाने 15 जून ते 30 जून, 2025 या कालावधीत धरती आबा या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करणे व लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. आदिवासी जमातीच्या शेवटच्या टप्यापर्यंत वैयक्तीक लाभ पोहोचवणे आणि धरती आबा जनजागृती उत्कर्ष अभियानाची जनजागृती निर्माण करणे हा याअभियाना चा उदेश आहे. हे अभियान हिंगोली जिल्ह्यातील 81 गावामध्ये राबविण्यात येणार आहे.
परंपरागत आईसी मोहिम वेगळे म्हणून या अभियानामध्ये गावपातळीवर क्लस्टर पातळीवरील शिबीरे आयोजित करुन आधारकार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, जात प्रमाणपत्र, पी-एम किसान, जनधन खाते, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, रेशन कार्ड नोंदणी, गॅस कनेक्शन, किसान क्रेडीट कार्ड, अटल पेन्शन योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण, सौर उर्जेव्दारे वीज पुरवठासाठी लाभार्थी नोंदणी, एफआरए पटाधारकासाठी कृषी, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन-उपजिवेकेच्या योजनांसाठी नोंदणी, स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत होम स्टे योजनेसाठी लाभार्थी नोंदणी इत्यादी सेवा प्रत्यक्षात पुरविण्याचे नियोजन आहे. याशिवाय या अभियानात सिकलसेल आजाराविषयी जनजागृती व तपासणी शिबीर, सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबीर, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, लहान मुले यांच्यासाठी पोषण शिबीर, क्षयरोग तपासणी शिबीर यावरही भर दिला जाणार आहे. या शिबीरामध्ये सीएससीएस, स्थानिक प्रशासन, फ्रंटलाइन कामगार आणि विविध विभागांशी समन्वय साधून योजनांचा लाभ पात्र आदिवासी व्यक्ती व कुंटुंबापर्यंत पोहोचवला जाईल.
ही शिबीरे 15 जून ते 30 जून, 2025 या कालावधीत गाव, क्लस्टर पातळीवर लाभ संतृप्ती शिबीरे (Benefit Saturation Camps) आयोजित करण्यात येणार आहेत.
या शिबीरामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधवानी सहभाग नोंदवावा व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कळमनुरीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सुनिल बारसे यांनी आदिवासी नागरिकांना केले आहे.
******
इतर मागासवर्गीय महामंडळाच्या विविध कर्ज योजनेचा लाभ घ्यावा
हिंगोली (जिमाका), दि. 18 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्या उप कंपनी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ या तीनही महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी बेरोजगारांना स्वयंम उद्योगासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजु व कुशल व्यावसायिक व्यक्तींना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम व लघु उद्योग व मध्यम उद्योग उत्पादन, व्यापार विक्री सेवाक्षेत्र इत्यादी व्यवसायासाठी महामंडळाच्या विविध कर्ज योजना आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
1) एक लाख रुपयापर्यंतची थेट कर्ज योजना : या योजनेमध्ये अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 पेक्षा जास्त असावा, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी असावे, परतफेडीचा कालावधी 48 समान मासिक हप्त्यांमध्ये राहील. नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेत व्याज अदा करावे लागणार नाही, परंतु थकीत झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल.
2) 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना : यासाठी उद्दिष्ठ 46 असून या योजनेमध्ये 75 टक्के रक्कम ही बँकेची असून त्यावरील व्याज हे बँकेच्या नियमाप्रमाणे राहील . 20 टक्के रक्कम ही महामंडळाची असून त्यावर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज आकारण्यात येते व 5 टक्के सहभाग हा लाभार्थ्यांचा आहे. या योजनेची कर्ज मर्यादा पाच लाखापर्यंत असून परतफेडीचा कालावधी पाच वर्षाचा समान 60 हप्त्याचा आहे.
3) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना : ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा 15 लाख रुपयापर्यंत आहे. या योजनेसाठी महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. या योजनेत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख पर्यत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. तसेच लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे.
4) गट कर्ज व्याज परतावा योजना : ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी कर्ज मर्यादा 10 लाख ते 50 लाख रुपयापर्यंतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. गटातील लाभार्थीचे वय 18 ते 45 वर्षे असावे. तसेच गटातील लाभार्थ्यांनी यापूर्वी महामंडळाचा किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच इतर मागास प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदार संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत), एलएलपी, एफपीओ अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीसाठी जे कर्ज दिले जाईल. त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.
5) शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना : ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत आहे. कर्जरकमेवरील व्याज परतावा देशांतर्गत व परदेशी उच्च शिक्षणासाठी कर्ज मर्यादा 10 लाख ते 20 लाख रुपये पर्यंतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचे वय 17 ते 30 वर्षे असावे. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपये असावी. विद्यार्थी बारावी 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.
6) महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना : ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोक संचलित साधन केंद्रामार्फत राबविली जात आहे. इतर मागास प्रवर्गातील किमान 50 टक्के महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटास प्रथम टप्प्यात 5 लाख रुपयापर्यंत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात येईल. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्यांच्या आधार लिंक बॅंक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.
वरील कर्ज योजना या बँकेमार्फत असून लाभार्थ्यांने महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा. तसेच या योजनेचा लाभ हा इतर मागासवर्गीय समाजातील व्यक्तीने जास्तीत जास्त घ्यावा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, हिंगोली-413513, दूरध्वनी क्र. 02456-224442 वर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
******
17 June, 2025
हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायती रंगणार आता एका रंगात
हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या संकल्पनेतून व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड यांच्या नेतृत्वात हिंगोली जिल्ह्यातील 563 ग्रामपंचायतीच्या इमारती एक रंगात करण्याच्या कामास मागील आठवड्यात सुरुवात झाली आहे.
सर्व ग्रामपंचायत इमारतीत स्वतंत्र शौचालय, बैठक व्यवस्था, संगणक संच, पिण्यासाठी पाणी, नियमित स्वच्छता, ऑफिससाठी खुर्ची, टेबल, अभ्यांगतासाठी स्वतंत्र खुर्च्या, प्रिंटर, वायफाय, इन्व्हर्टर इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत सर्व गटविकास अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सर्व गटविकास अधिकारी यांनी तालुकास्तरावर सर्व ग्रामसेवक (ग्राम पंचायत अधिकारी) यांच्या बैठका घेऊन नियोजन केले आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी 15 वा वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायत स्तरावर खर्च करावयाचा आहे.
याबाबत दर आठवड्याला गटविकास अधिकारी यांचा आढावा घेऊन कामास गती देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी दिले आहेत. या उपक्रमासाठी विष्णू भोजे यांना जिल्ह्याचे समन्वयक म्हणून नेमण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेने दिली आहे.
******
प्राधान्यक्रम ठरवून निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• सन 2024-25 च्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र तातडीने सादर करावेत
• आकांक्षीत तालुक्यातील कामे दिलेल्या निर्देशांकानुसार तातडीने पूर्ण करावेत
• धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत 15 ते 30 जून या कालावधीत विविध शिबिराचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतच्या कामाबाबत लोकप्रतिनिधीशी समन्वय साधून व प्राधान्यक्रम ठरवून निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, सहायक जिल्हाधिकारी योगेश मीना, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व कार्यालय प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2024-2025 च्या कामावर केलेल्या खर्चाचा ताळमेळ तात्काळ पूर्ण करुन उपयोगिता प्रमाणपत्रासह अहवाल सादर करावा. तसेच अखर्चित निधीची माहिती तात्काळ सादर करावी. तसेच सन 2025-26 या वर्षात करावयाच्या कामाचे योग्य नियोजन करुन निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी कृषी, पशुसंवर्धन, महावितरण, आरोग्य, क्रीडा, पाणीपुरवठा, नगरविकास, तीर्थक्षेत्र, पर्यटन क्षेत्रावरील सन 2024-25 च्या खर्चाचा तसेच सन 2025-26 प्रस्तावित खर्चाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या गावापासून शाळेत नेआण करण्यासाठी मानव विकास अंतर्गत नवीन आलेल्या बस आहेत. या बससाठी शिक्षण विभागाने रुट प्लॅन तयार करुन द्यावा, अशा सूचना दिल्या.
जिल्ह्यातील हिंगोली या आकांक्षीत तालुक्यात केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार महिला व बालकांना देण्यात येणारे पोषण आहार, प्रधानमंत्री आवास योजना, ओडीएफ प्लस गावे, जलजीवन मिशन, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, ज्या अंगणवाडीमध्ये शौचालयाची सुविधा नाही त्या ठिकाणी शौचालय उभारणे यासह निर्धारित निर्देशांकानुसार सर्व सुविधा उपलब्ध करुन द्यावेत. केलेल्या कामाची छायाचित्रे, माहितीचा डेटा अपलोड करावा व निती आयोगाकडून बक्षीस पात्र ठरवावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
देशातील आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान ही योजना हिंगोली जिल्ह्यातील 81 गावांमध्ये विविध 17 यंत्रणेमार्फत राबविण्यात येणार आहेत. या अभियानाच्या पहिल्या टप्यात 15 ते 30 जून या कालावधीत लाभार्थ्यांसाठी विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी हे समन्वय अधिकारी असून त्यांनी सर्व विभागाशी समन्वय ठेवून हे शिबीर यशस्वी होण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीस विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
******
16 June, 2025
मोटार सायकल भाड्याने देण्यासाठी लायसन्स देण्यावर घालण्यात आलेले निर्बंध मागे
हिंगोली, दि. 16 (जिमाका) : शासनाच्या 12 एप्रिल, 2016 च्या पत्रातील निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात रेंट-ए-मोटार सायकल स्कीम-1997 अंतर्गत मोटार सायकल भाड्याने देण्यासाठीचे लायसन्स देण्याबाबत निर्बंध घालण्यात आले होते.
मोटार वाहन अधिनियम-1988 चे कलम 75 व रेंट-ए-मोटार सायकल स्कीम-1977 अंतर्गत मोटार सायकल भाड्याने देण्यासाठी लायसन्स देण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे.
शासनाने दि. 28 एप्रिल, 2025 रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्यात रेंट-ए-मोटार सायकल स्कीम-1977 अंतर्गत मोटार सायकल भाड्याने देण्यासाठी लायसन्स देण्यावर घालण्यात आलेले निर्बंध मागे घेतलेले आहेत. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
15 June, 2025
शाळेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी साजरा होणार “शाळा प्रवेशोत्सव
* 16 जूनपासून सुरू होणार शाळा
* विद्यार्थ्यांचे केले जाणार स्वागत
हिंगोली, दि. 15 (जिमाका) : शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविणे आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या वर्षाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवार, दिनांक 16 जून 2025 पासून होणार आहे. यानिमित्ताने पहिल्या व दुसऱ्या दिवशी खास स्वागत समारंभाचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये संबंधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, अधिकारी सहभागी होणार असून, ते विद्यार्थ्यांचे स्वागत करतील.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी यावर्षी ‘दत्तक शाळा योजना’ही राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 50 पेक्षा जास्त पट असलेल्या शाळा शासकीय अधिकाऱ्यांनी दत्तक घ्यायच्या आहेत. या शाळांना वर्ग 1 व वर्ग 2 चे अधिकारी वर्षभर भेट देतील, शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या गरजांची माहिती घेऊन त्यावर उपाययोजना करतील. या शाळा भेटींचे नियमित अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी सादर करणे अनिवार्य आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शासनाने विशेष प्रचार मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. पालकांना शाळांमध्ये उपलब्ध सुविधा, शिष्यवृत्ती योजना व उपक्रमांची माहिती दिली जाणार आहे. प्रमुख भर इयत्ता 1 लीच्या प्रवेशात वाढ करण्यावर असेल. यासाठी शाळा, तालुका व जिल्हा पातळीवर विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. संबंधित अधिकारी, शाळा प्रशासन हे समन्वयाने हे कार्य यशस्वी करणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकाव्दारे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.
*-*-*-*
14 June, 2025
विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
* पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न
मुंबई, दि.१४: भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केले आहे.आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई, नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हॉटेल ताज येथे 'मुंबई रायझिंग : क्रिएटिंग अॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' या पाच जागतिक विद्यापीठांना (एलओआय) आशयपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,केंद्रीय शिक्षण सचिव तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष विनित जोशी,अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ब्रिटनच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, ऑस्ट्रेलियाचे कॉन्सुल जनरल पॉल मर्फी,अमेरिकेचे कॉन्सुल जनरल माईक हॅंकी, इटलीचे कॉन्सुल जनरल वॉल्टर फेरारा, अॅबर्डीन विद्यापीठाचे उपप्राचार्य ग्लोबल एंगेजमेंट प्रा.सिलादित्य भट्टाचार्य, यॉर्क विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. चार्ली जेफ्री, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ उपकुलगुरू गॉय लिटलफेअर, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष इलिनॉय टेक राज ईचंबाडी, आयईडी चे रिकार्डो बाल्बो,अधिष्ठाता,विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,युनिव्हर्सिटी ऑफ अॅबर्डीन (स्कॉटलंड, यु.के.),युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (यु.के.),युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया),इलीनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका),इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन (इटली) ही जगातील पाच नामवंत विद्यापीठे भारतात येत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ही विद्यापीठे उभी राहणार आहेत.याचं परिसरात येत्या काही वर्षात मेडिसिटी,स्पोर्टस सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारणारण्यात येणार आहे. येथे आगामी कालावधीत दहा विद्यापीठ एकत्र येतील अशी संकल्पना राबवण्यिाचा विचार आहे. सध्या या पाच विद्यापीठांमुळे हा परिसर पूर्ण शिक्षण आणि संशोधन साठी ओळखला जाईल.मुंबईची सध्या वित्तीय,औद्योगिक आणि मनोरंजन उद्योगाचे शहर म्हणून ओळख आहे. विद्यापीठामुळे एज्युकेशनल सिटी अशी ओळख होईल.विकसित भारत २०४७ मध्ये हा निर्णय महत्वाची भूमिका बजावेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अॅबरडीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इस्टिट्यूटो युरोपियो डी डिझाईन हे मुंबई,नवी मुंबईत पूर्ण कॅम्पस आणणार आहेत - राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी सुसंगत अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होत आहे. अटल सेतू निर्माण झाला आहे.. पायाभूत सुविधांच्या व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी यामुळे विद्यापीठाशी निगडित सर्वांना उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशातील अनेक विद्यापीठांना भारतात येण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.ज्या भारतीय तरुणांना परदेशी जाऊन शिक्षण घेणं शक्य नाही त्यांचे स्वप्न आता अपुरे राहणार नाही. सध्या पाच विद्यापीठे आली आहेत. पण भविष्यात अजूनही विद्यापीठांचे स्वागत करायला आम्ही तयार आहोत.नुकताच वेर्स्टन युनर्व्हसिटी आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
*विकसित भारत करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण हातभार लागेल: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान*
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की,मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे त्याचबरोबर ही आर्थिक राजधानी देखील असून आगामी कालावधीत मुंबई येथे शिक्षणाचे हब होण्यासाठी परदेशी पाच विद्यापीठांचा खूप महत्त्वाचं योगदान राहील. भारत हा प्राचीन काळापासून शिक्षण क्षेत्रात जागतिकस्तरावर नावलौकिक राहीला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित भारतची स्वप्न साकारण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. नवीन शैक्षणिक धोरणामुळे जागतिक पातळीवरच्या विद्यापीठांना देखील आपल्या संस्था भारतात सुरू करता येणार आहेत त्याचबरोबर भारतातील शिक्षण संस्थांना परदेशामध्ये आपल्या शाखा उघडता येणे शक्य होणार आहे.भारतात जागतिक दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना कमी खर्चात उपलब्ध होईल. आज भारतातील आयआयटी, आयआयएम, आयएफ, सिम्बॉयसिस यासारख्या संस्था परदेशामध्ये सुरू झाल्या आहेत.परदेशी विद्यापीठ भारतात येवून शिक्षण देणार भारताला विकसित बनवण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रात पुढे नेण्यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे असेही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले.
यावेळी गुजरात अहमदाबाद विमान दूर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाश्यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ ढवसे यांनी सुत्रसंचालन केले.प्रास्ताविक सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.यावेळी केंद्रीय शिक्षण सचिव विनित जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
*जागतिक दर्जाची पाच विद्यापीठे नवी मुंबईत*
*युनिव्हर्सिटी ऑफ अॅबरडीन*, यूकेमधील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आणि भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले स्कॉटिश विद्यापीठ असून 200 हून अधिक भारतीय विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांसह अनेक दशकांच्या विद्यापीठ भागीदारी यामध्ये असून आयआयटी - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी; एम्स - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस; मणिपाल अकादमी; आयसीएआर - इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च, आयसीएमआर - इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि दिल्ली विद्यापीठ यांचा समावेश आहे.
जगातील टॉप 100 विद्यापीठांमध्ये स्थान मिळवलेले आणि आयव्ही लीग समतुल्य संस्था आणि मुंबईत कॅम्पस स्थापन करणारे ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ग्रुप ऑफ एट (Go8) विद्यापीठांमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले *वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ*. भारतीय विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि भविष्यात जागतिक कार्यबल आणि अर्थव्यवस्थेच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेले विज्ञान,औद्योगिक व इंजिनिअरींग या क्षेत्रात (STEM)व्यवसाय या विषयांमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम असतील.
*यॉर्क विद्यापीठ* ही यूकेमधील सर्वात प्रतिष्ठित संशोधन-केंद्रित संस्थांपैकी एक आहे तसेच ते रसेल ग्रुपची सदस्य आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा, व्यवसाय, अर्थशास्त्र आणि सर्जनशील उद्योगांसह संगणक विज्ञानातील अत्याधुनिक पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध होतील. उदयोन्मुख क्षेत्रातील कार्यक्रम - एआय, सायबर सुरक्षा, सर्जनशील उद्योग - जागतिक उद्योगांच्या इनपुटसह डिझाइन केले जातील.भारतीय विद्यार्थ्यांसाठी नोकरीचा संधी उपलब्ध होतील.
*इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इलिनॉय टेक)* हे स्वतंत्ररित्या पदवी देणारे आणि भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले अमेरिकन विद्यापीठ आहे.संगणक विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यवसाय यासारख्या उच्च मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये पदवीपूर्व आणि पदवीधर शिक्षण उपलब्ध होतील. त्यांचा प्रसिद्ध एलिव्हेट प्रोग्राम देखील ते राबवणार आहेत. जो सर्व विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, संशोधन, स्पर्धा उपलब्ध करून देईल.
युरोपमधील प्रीमियम डिझाइन शाळांपैकी एक, *इस्टिटुटो युरोपियो डी डिझाइन (IED) फॅशन*, उत्पादन डिझाइन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये जागतिक दर्जाचे कौशल्य उपलब्ध करून देईल.
*****
13 June, 2025
ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मागासवर्गीय मुलामुलींनी अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 13 : जिल्हा परिषद सेस योजना सन 2025-26 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींना अर्थसहाय्य पुरविण्यासाठी अर्जदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
या योजनेंतर्गत विद्यार्थी हा ग्रामीण भागातील रहिवाशी असावा. विद्यार्थी हा कोणत्याही शाखेचा पदवीधर व मागील पाच वर्षात त्यांने एमपीएससी, युपीएससी, एसएससी-सीजीएल, आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेली पूर्व किंवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. ही योजना डीबीटी तत्वावर राबवावयाची असल्याने निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जास्तीत जास्त 20 हजार रुपये वर्ग करण्यात येणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवाशी असणाऱ्या एससी, एसटी, व्हीजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती अथवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयात दि. 25 जून, 2025 पर्यंत सादर करावे. विलंबाने प्रस्ताव सादर केल्यास त्याचा विचार केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी गिता गुट्टे यांनी केले आहे.
***
लॅपटॉप खरेदीच्या अर्थसहाय्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 13 : जिल्हा परिषद सेस योजना सन 2025-26 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहाय्य पुरविण्यासाठी अर्जदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत विद्यार्थी हा ग्रामीण भागातील रहिवाशी असावा. वैद्यकीय (एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस, बीएचएमएस व तत्सम), अभियांत्रिकी (बीई, बीटेक) या शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेत असावा. ही योजना डीबीटी तत्वावर राबवावयाची असल्याने निवड झालेल्या लाभार्थ्यांनी प्रथम लॅपटॉप खरेदी करुन अनुदानासाठी मूळ देयकासह प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम त्यांच्या खरेदी किंमती इतकी किंवा जास्तीत जास्त 30 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवाशी असणाऱ्या एससी, एसटी, व्हीजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती अथवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयात दि. 25 जून, 2025 पर्यंत सादर करावे. विलंबाने प्रस्ताव सादर केल्यास त्याचा विचार केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी गिता गुट्टे यांनी केले आहे.
***
इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांचा हिंगोली दौरा
हिंगोली (जिमाका), दि. 13 : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे हे शनिवार, दि. 14 जून, 2025 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 14 जून, 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने समृध्दी महामार्गाने हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे मोदी सरकारची 11 वर्षे 'संकल्प से सिध्दीतक' या विषयावर पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून अर्धापूर जि. नांदेडकडे वाहनाने प्रयाण.
*****
जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू
हिंगोली (जिमाका), दि. 13 : जून महिन्यात हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या विविध सण-उत्सव, स्पर्धा आणि सभा, बैठका, धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी दिले आहेत.
दि. 14 जून, 2025 रोजी श्री गजानन महाराज शेगाव पालखी आगमन दुपारी औंढा नागनाथ, मुक्कामी जवळा बाजार, दि. 20 जून रोजी राजमाता मॉसाहेब जिजाऊ पुण्यतिथी तिथीप्रमाणे, दि. 26 जून रोजी छत्रपती शाहू महाराज जयंती, दि. 27 जून रोजी मोहरम मास आरंभ होत आहे. तसेच मराठा आरक्षण व इतर आरक्षण संबंधाने घडणाऱ्या राजकीय घडामोडी, नागरिक, विविध संघटना, पक्ष यांच्या मागण्यासंदर्भात मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 13 जून, 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते दि. 28 जून, 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याजवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तूजवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटकद्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल, अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील, या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
**
12 June, 2025
पीक प्रात्यक्षिक घटकांतर्गत लाभार्थी निवडीसाठी शेतकऱ्यांनी ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली(जिमाका), दि. 12 : खरीप हंगामासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया आणि आरकेव्हीवाय महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य (श्री अन्न) अभियान सन 2025-26 अंतर्गत पीक प्रात्यक्षिक या घटकांतर्गत केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार लाभार्थी निवड कार्यक्रमाची अंमलबजावणी करावयाची आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवासाठी कृषी विभागाकडून चालू खरीप हंगामासाठी पीक प्रात्यक्षिके गट लाभार्थ्यांमार्फत घ्यावयाचे आहेत. याकरिता लाभार्थी गटांची निवड महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्यात येणार आहे. त्यानुसार आतापर्यंत महाडीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांची निवड झालेली आहे. सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टलवर येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणीमुळे यापुढे विविध योजनांतर्गत पीक प्रात्यक्षिक या घटकासाठी गट लाभार्थ्यांची निवड ऑफलाईन करावयाची आहे. ऑफलाईन गट लाभार्थी निवड मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून करण्यात यावी. ऑफलाईन निवड केलेल्या गटांची नोंदणी महाडीबीटी पोर्टलवर करणे व त्यांची माहिती केंद्र शासनाने विकसित केलेल्या कृषी मॅपर पोर्टलवर भरणे अनिवार्य आहे. पीक प्रात्यक्षिके कार्यक्रमासाठी पात्रता, निकष खालीलप्रमाणे आहेत.
शेतकरी गट हा 31 मार्च, 2024 पूर्वी नोंदणी केलेला असावा. शेतकरी गट कोणत्याही शासन यंत्रणेकडे नोंदणीकृत असावा. जसे आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जीवोन्नोती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण जीवोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड इत्यादी ठिकाणी नोंदणी केलेला असावा. एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येईल. पीक प्रात्यक्षिकासाठी निवडलेल्या गटात 25 पेक्षा जास्त शेतकरी असल्यास संबंधित गटाने एकाच गावातील 25 शेतकऱ्यांची निवड करावी. एक गाव एक गट एक प्रात्यक्षिक या तत्वावर पीक प्रात्यक्षिकांची अंमलबजावणी करावयाची आहे. त्यामुळे एका गावातून अधिक गटांचे अर्ज प्राप्त झाल्यास गट लाभार्थ्यांची निवड पारदर्शकपणे होईल याची दक्षता घेण्यात येईल. ज्या गट अर्जदारांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर केला आहे. या अर्जदारांपैकी पात्र अर्जदारांना ऑफलाईन निवड करताना प्राधान्य देण्यात येईल. गटातील शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकाचा लाभ देताना ॲग्रीस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. तसेच गटातील ज्या सभासदांना लाभ द्यावयाचा आहे त्यांची फार्मर आयडी बंधनकारक आहे.
या योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था आदींनी ऑफलाईन अर्ज करावे. यासाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीनी कागदपत्रे संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दि. 17 जून, 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
********
बालकामगार दिनानिमित्त राबविण्यात आली स्वाक्षरी मोहिम
हिंगोली (जिमाका), दि. 12 : जगभरात 12 जून हा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर सरकारी कामगार अधिकारी कार्यालय व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली.
यावेळी सरकारी कामगार अधिकारी एस. जी. फड, दुकाने निरीक्षक एस. जे. पेरके, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य जरीबखान पठाण, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, रेशमा पठाण, समुपदेशक सचिन पठाडे, क्षेत्रबाह्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत इत्यादी उपस्थित होते.
**
बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्ह्यात 'स्टॉप डायरिया अभियान' यशस्वीपणे राबवा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• जिल्ह्यात 16 जून ते 31 जुलै या कालावधीत राबविणार अभियान
हिंगोली (जिमाका), दि. 12 : अतिसारामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्ह्यात दि. 16 जून ते 31 जुलै, 2025 या कालावधीत विविध उपक्रम राबवून 'स्टॉप डायरिया अभियान' यशस्वीरित्या राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दि. 10 जून रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली स्टॉप डायरियाबाबत जिल्हा सुकाणू समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नामदेव पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलेजा स्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड, बाल विकास प्रकल्प अधिकारी व्ही. आर. वाकडे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
स्टॉप डायरियाचे उद्दिष्ट राज्यातील अर्भक मृत्यूदर, बालमृत्यू दर कमी करणे हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. देशामध्ये 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्युमागे अतिसार हे प्रमुख कारण असून सुमारे 1 ते 7 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि त्या बालमृत्युचे प्रमाण उन्हाळा व पावसाळ्यात जास्त असते. ‘अतिसारावर करा मात, स्वच्छता व ओआरएसची घेऊनी साथ’ या घोषवाक्याचा अवलंब करुन 'स्टॉप डायरिया' अभियान यशस्वीपणे राबवावे. अतिसार झालेल्या सर्व मुलांकरिता ओआरएस आणि झिंकचे वाटप होईल व त्यांच्यामार्फत ते पोहचेल हे सुनिश्चित होईल. पाच वर्षाखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंधक आणि व्यवस्थापनासाठी पालकांचे काळजी घेणाऱ्यांचे योग्य समुपदेश करावे. स्टॉप डायरियाचे ध्येय अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर पोहचविणे हे अंतिम ध्येय आहे.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे आजार होतात. सर्व ग्रामपंचायतीमध्ये जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात 16 जून ते 31 जुलै दरम्यान अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग व ग्रामपंचायत विभाग आदीच्या संयुक्त विद्यामाने राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये गावातील अंगणवाड्या प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी कार्यालय व प्राथमिक शाळा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता असणे आवश्यक आहे.
पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया, गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक आजार होत असतात. त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुक करुन पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येते. यासाठी गावस्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग राहणार आहे.
या बैठकीला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. डी. व्ही सावंत, बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम, डॉ. स्नेहल नगरे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखापाल व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, सांख्यिकी अधिकारी अजय कदम, डॉ निशांत थोरात, डॉ. प्रशांत पुठावार, डीपीएचएन मनीषा वडकुते, अमोल कुलकर्णी, अझर अली, लक्ष्मण गाभने, सुरभी शाहू आदी सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
******
11 June, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा
हिंगोली दि.11: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात नियामक मंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला.
प्रामुख्याने एनकॉसचा आढावा घेण्यात आला 11 प्राथमिक आरोग्य केंद्र एनकॉस करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. तसेच संजीवनी अभियानाचा आढावा घेण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नामदेव पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतिश रुणवाल, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ शैलेजा कुप्पास्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड, डॉ. नरवाडे, डॉ. काळे, डॉ अनुराधा दहिफळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. काळे, डॉ. सावंत, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, डॉ. प्रशांत पुठावार, डॉ. निशांत थोरात यांची उपस्थिती होती.
या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुविधा आणि आरोग्य सेवा यांचा आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले, “ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत सेवा देण्यात याव्यात, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी शक्यतो जास्तीत जास्त प्रसूती झाल्या पाहिजेत. संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वाढविण्यात यावे, अशा सूचना श्री. गुप्ता यांनी दिल्या.
बैठकीत क्षयरोग, निश्चय मित्र, कुष्ठरोग, एनसीडी, माता बाल संगोपन कार्यक्रम, जननी शिशु सुरक्षा योजना, ओरल हेल्थ, मेंटल हेल्थ, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, जलजन्य व कीटकजन्य आजार, फ्लोरोसिसचे रुग्ण आढळून आलेल्या गावाचा आढावा घेण्यात आला.
यावेळी 11 प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, सर्व कार्यक्रम अधिकारी व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
******
मागासवर्गीय मुलींनी वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत
हिंगोली (जिमाका),दि.11 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने हिंगोली शहरातील नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतीगृह ही दोन्ही वसतिगृहे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली यांच्या नियंत्रणाखाली सुरु आहेत. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात वसतिगृहात प्रवेश करण्यासाठी फक्त ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज स्वीकारणे सुरु झालेले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलींसाठी नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे तर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली येथे 75 क्षमतेचे वसतिगृह सुरु आहेत.
नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, हिंगोली येथे जुने प्रवेशित विद्यार्थी 83 असून सन 2025-26 या वर्षासाठी 17 रिक्त असलेल्या जागा भरावयाच्या आहेत. तर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतीगृह, हिंगोली येथे जुने प्रवेशित विद्यार्थी 35 असून सन 2025-26 या वर्षासाठी 40 रिक्त असलेल्या जागा भरावयाच्या आहेत.
वरील रिक्त जागेसाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर वसतिगृहाचे नाव नमूद करुन मागासवर्गीय पात्र मुलींनी ऑनलाईन अर्ज करावेत.
तसेच ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रिंट काढून त्यासोबत आवश्यक कागदपत्रासह आपला अर्ज वसतिगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसर, दर्गा रोड, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पूर्व बाजूस, हिंगोली या पत्त्यावर जमा करावेत, असे आवाहन गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, हिंगोली यांनी केले आहे.
**
09 June, 2025
आषाढी वारी पालखी सोहळ्यामधील भक्तांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका),दि.09 : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हिगोली जिल्ह्यातून श्री क्षेत्र शेगाव येथून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान होणारी गजानन महाराज दिंडी आषाढी वारी पदयात्रा, संत नामदेव महाराज संस्थान नर्सी नामदेव तसेच हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या इतर पायी दिंड्या व पदयात्रेमधील आषाढी वारी पालखी सोहळ्यामधील भक्तांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व संबंधित विभागाला दिले.
हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या आषाढी वारी पालखी सोहळा व दिंडी पदयात्रेतील भाविकांना मूलभूत आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या दालनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, प्रतीक्षा भूते, नगर पालिका प्रशासनचे सहायक आयुक्त जगताप, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, जीवककुमार कांबळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण तसेच विविध विभागाचे प्रतिनिधी, पालखी सोहळा आयोजक आदी उपस्थित होते.
दिंडीतील वारकऱ्यांना हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून दिंडी व दिंडी रथासमवेत तसेच मुक्कामाच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे व्यवस्थापन, वाहतूक मार्गात बदल, फिरते शौचालय, सार्वजनिक शौचालय, मुक्कामाच्या ठिकाणी डास प्रतिबंधक धूर फवारणी, स्वच्छता, पाण्याची सोय, दिंडी मार्गावरील दवाखाने, डॉक्टर, आरोग्य पथक, पुरेशा प्रमाणात औषधाची उपलब्धता, वैद्यकीय पथकासह रुग्णवाहिका, पालखी मार्गावर फिरते रुग्णवाहिका, दिंडी मार्गाचे रस्ता दुरुस्ती, मुक्कामाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा, दिंडी मार्गावरील धाबे, हॉटेल्सची अन्न सुरक्षा तपासणी आदी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. सर्व संबंधित विभागप्रमुखांनी नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी आणि भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी बैठकीत दिल्या.
******
08 June, 2025
सोयाबीनच्या प्रमाणित बियाणे वाटपामध्ये महाबीज यंत्रणा आणि कृषी विभागाकडून कोणताही घोटाळा नसल्याचा खुलासा
हिंगोली (जिमाका),दि.०८ : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 मध्ये सोयाबीन पिकाचे समुह निवडण्यात आलेले आहेत. त्यासाठी सोयाबीन पिकाचे पाच वर्षाच्या आतील बियाण्याचे १०० टक्के अनुदानावर कमीत-कमी ०.२० हेक्टर ते १ हेक्टर क्षेत्रासाठी लागणारे बियाणे वाटपाचा कार्यक्रम चालू असून त्यासाठी नोंदणी केलेल्या पात्र लाभार्थ्यांना जास्तीत जास्त ७५ किलो बियाणे मंजूर असल्याचे कृषि आयुक्तालय, पुणे यांच्या नोंदणीकृत प्राप्त लाभार्थ्यांना सूचना प्राप्त आहेत, त्यासाठी महाबीज यंत्रणेकडून २२ किलो प्रती बॅग पॅकींग असलेले बियाणे देण्यात येत आहे. सोयाबीनची पेरणी बीबीएफ टोकन तंत्रज्ञानाव्दारे केल्यास उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी प्रती एकरी २२ किलो बियाणे पुरेसे असते या उद्देशाने महाबीज यंत्रणेकडून २२ किलो प्रती बॅग बियाणे पॅकींग करण्यात आली आहे. तथापि, लाभार्थ्यांना ७५ किलो बियाणे मंजूर झाले असल्यास २२ किलो पॅकींगमध्ये ७५ किलो बियाणे देणे शक्य होत नाही आणि प्रमाणित बियाणे असल्याने ते बॅग फोडून देता येत नाही. म्हणून २२ किलोच्या तीन बॅगा म्हणजे ६६ किलो बियाणे देण्याचे निश्चित करण्यात आले होते, जर शेतकऱ्यांना ७५ किलो बियाणे पाहिजे असल्यास त्यांनी ८८ किलो बियाणे घेऊन ७५ किलो बियाणे अनुदानित व उर्वरीत १३ किलो बियाणे विना अनुदानित स्वखर्चाने घ्यावे लागेल.
संबंधित प्रमाणित बियाणे वाटपामध्ये महाबीज यंत्रणेकडून आणि कृषी विभागाकडून कोणताही घोटाळा नसून सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि वरीलप्रमाणे बियाणे खरेदी करावे. शासकीय अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजेंद्र कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
***
06 June, 2025
हिंगोली जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा
हिंगोली, (जिमाका) दि. 06: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या प्रेरणेचा स्मृतीदिन म्हणजे शिवस्वराज्य दिन, आज हिंगोली जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. शिवस्वराज्य दिन हे नव्या पिढीला प्रेरणा व नवचैतन्य देणारे स्मरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक करून स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्र शासनाने 2021 पासून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या हस्ते भगवा स्वराज्यध्वज शिवशक राजदंडासह गुढीची पूजा करुन व गुढी उभारुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे सादरीकरण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) अनंत कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी पुरवठा) संजय कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सखाराम खुणे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंके, बाधंकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी पद्यमणे, लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, शिक्षणाधिकारी (योजना) संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर, उप अभियंता एस. बी. गिते तसेच जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
*****
स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्यासाठी 10 जून अंतिम मुदत
हिंगोली (जिमाका), दि. 06 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ऑनलाईन पध्दतीने विभागाच्या संकेतस्थळावर दि. 15 मार्च, 2025 पर्यंत स्वीकारण्यात आले होते. विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या अर्जाची तपासणी कार्यालयाकडून करण्यात आली आहे.
यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आहेत. त्यांनी ऑनलाईन पध्दतीने त्रुटीची पूर्तता करुन अर्ज फेरसादर करण्यासाठी 10 जून, 2025 पर्यंत अंतिम मुदत दिली आहे.
विहित मुदतीत त्रुटीची पूर्तता करुन अर्ज ऑनलाईन फेर सादर न केल्यास अर्ज अपात्र, बाद ठरतील. तसेच विद्यार्थ्यांसाठी बँक खाते भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते तपशील भरुन घेण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जातील त्रुटी पूर्ण करण्यात तसेच बँक खाते भरण्यास अडचण येत असल्यास सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
******
विकसित कृषी संकल्प अभियान औंढा नागनाथ तालुक्यात उत्साहात संपन्न विकसित कृषी संकल्प अभियान औंढा नागनाथ तालुक्यात उत्साहात संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 06 : भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व कृषी विज्ञान केंद्र तोंडापुर, जि. हिंगोली अंतर्गत विकसित कृषी संकल्प अभियान कार्यक्रम औंढा नागनाथ तालुक्यातील असोला, कोंडशी व वडद या गावांमध्ये उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे सनियंत्रक कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी विकसित कृषि संकल्प अभियान भेटीचा मुख्य उद्देश खरीप हंगामाच्या पूर्व तयारीमध्ये मदत करणे, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे आणि शासनाच्या योजनांची माहिती देत शेतकऱ्यांच्या शंकेचे निरासन केले. तसेच त्यांनी नैसर्गिक शेतीचे महत्व, हवामान आधारित पिक सल्ला घेउन शेतकऱ्यांनी शेती करावी, असे सांगितले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी विविध योजनांची माहिती देताना नैसर्गिक शेतीचे महत्व सांगितले. तसेच त्यांनी वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी व कृषि विज्ञान केंद्राच्या सल्ल्याने शेतकऱ्यांनी शेती करावी, असे आवाहन केले.
या विकसित कृषि संकल्प अभियान कार्यक्रमामध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषद,नवी दिल्ली केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. तिरुग्नानवेल यांनी प्रमुख मार्गदर्शन करतांना लिंबूवर्गीय पिकांचे लागवड तंत्रज्ञान, योग्य वेळेवर खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याची माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकेचे निरसन केले. प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुरजित मंडल यांनी माती नमुना कसा घ्यावा, त्याचे महत्त्व, माती परीक्षण नुसार खत व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. परभणी येथील पशुवैद्यक आणि पशु विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सईद अली यांनी पावसाळ्यात जनावराची घ्यावयाची काळजी, एकात्मिक पद्धतीने कीड व रोग व्यवस्थापन, गोठ्याची स्वच्छता व स्वच्छ दुध उत्पादन विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. गोळेगाव कृषी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. एस.एच. सारंग यांनी विद्यापीठाचे नवीन विकसित केलेले सोयाबीन व तूर पिकाच्या वाणाची माहिती व या पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान, बीज प्रक्रियाचे महत्व सर्वांना अवगत करून दिले. इफकोचे वरिष्ठ मार्केटींग व्यवस्थापक डॉ. शिवाजी पोवार यांनी इफकोचे उद्देश, शेती मध्ये नॅनो युरिया, डी.ए.पी. वापरण्याची पद्धत व प्रमाण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. अतुल मुराई यांनी तर आभार प्रदर्शन अनिल ओळंबे यांनी केले.
या अभियानांतर्गत किसान रथाद्वारे अनेक गावामध्ये जाऊन विविध तंत्रज्ञान विषय माहिती देण्यात येत आहे. तसेच विविध विषयाच्या घडीपत्रिका सुद्धा शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येत आहेत. या कार्यक्रमांमध्ये इफकोचे प्रतिनिधी आणि आय.पी.एल.चे प्रतिनिधी यांनी देखील कृषि फवारणीसाठी ड्रोन प्रात्यक्षिकासह सहभाग घेतला. या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांकडून अभिप्राय देखील नोंदवण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असोला, कोंडसी व वडद गावचे सरपंच, बी. टी. राठोड, गुलाबराव सूर्यवंशी, संतोष हाणवते, बबनराव ढोबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
*******