19 June, 2026

जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करा; विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करा : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


नळ पाणीपुरवठा योजनांच्या प्रगतीचा आढावा ; त्रुटी दूर करण्याचे दिले निर्देश



हिंगोली(जिमाका), दि. 19 : जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध नळ पाणीपुरवठा योजनांची कामे तात्काळ पूर्ण करून संबंधित गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित यंत्रणांना दिले. तसेच विहित कालावधीत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध कठोर भूमिका घेत त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सविस्तर प्रगती आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, संबंधित विभागांचे अधिकारी, जलजीवन मिशनचे अभियंते तसेच विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील विविध नळ पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, तांत्रिक अडचणी आणि योजनांच्या कार्यान्वयनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. अंतिम टप्प्यात असलेल्या योजनांची कामे वेगाने पूर्ण करून ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रत्येक योजनेच्या प्रगतीचा आढावा घेत कामांमधील अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. ज्या योजनांची कामे पूर्णत्वास आली आहेत, त्या योजनांचे तात्काळ कार्यान्वयन करून लाभार्थी गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत राबविण्यात येत असलेल्या डोंगरकडा, आरळ यासह इतर पाणीपुरवठा योजनांच्या प्रलंबित कामांचाही आढावा यावेळी घेण्यात आला. ज्या कंत्राटदारांकडून निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण होत नाहीत, त्यांची नावे शासनाच्या सचिवांना कळवून त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

तसेच येत्या कालावधीत दरमहा किती कामे पूर्ण होणार आहेत, याचा सविस्तर कृती आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सादर केलेल्या नियोजनानुसार प्रत्यक्षात कामे पूर्ण होत आहेत की नाही, यावर नियमित लक्ष ठेवण्यास सांगितले. 

या बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत त्रयस्थ तांत्रिक तपासणी करण्यात आलेल्या योजनांचाही आढावा घेण्यात आला. तपासणीदरम्यान निदर्शनास आलेल्या सर्व त्रुटी, तांत्रिक उणिवा व प्रलंबित बाबींची पूर्तता करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण कुटुंबापर्यंत सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट असून, योजनेची सर्व कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले. 

****

No comments: