• ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी तातडीने काढून घ्या; बँकेत विनाकारण गर्दी न करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 3 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करून घ्यावी. फार्मर आयडीशिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तलाठ्याशी संपर्क साधून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
ॲग्रीस्टॅक नोंदणी करताना काही तांत्रिक अडचणी येत असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित अडचणींचे निराकरण करण्यात येईल. तसेच मयत खातेदारांच्या नातेवाईकांनी वारस नोंदीसाठी आवश्यक फेरफार नोंद करून सातबारा उताऱ्यावर वारसांची नोंद घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कर्जमाफीचा लाभ मिळण्याची प्रक्रिया शासनस्तरावर सुरू असून शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा संभ्रम बाळगण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत जाऊन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून आपल्या कर्ज खात्याशी संबंधित तपशील तपासून खात्री करावी. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असून, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.
कर्जमाफीच्या प्रक्रियेसाठी बँकांमध्ये विनाकारण गर्दी करू नये. बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी शेतकऱ्यांनी सौजन्याने व सहकार्याने वागावे. बँक अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यास अथवा काही अडचण निर्माण झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यात येईल.
कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीबाबतची आवश्यक माहिती, प्रक्रियेचे टप्पे तसेच संबंधित बँकांचे हेल्पलाईन क्रमांक बँक शाखांमध्ये ठळकपणे प्रदर्शित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे.
सीबील स्कोअरबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये
कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही किंवा सीबील स्कोअरमध्ये लाभ मिळणार नाही, अशा स्वरूपाची कोणतीही माहिती शासनाकडून देण्यात आलेली नाही. शासनाच्या निर्णयानुसारच कर्जमाफीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करणारी माहिती देत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
तसेच दि. 30 सप्टेंबर 2021 पूर्वीची तसेच सन 30 सप्टेंबर, 2025 पर्यंतची कर्जमाफी संदर्भातील शासनाची भूमिका व स्पष्टीकरण स्पष्ट आहे. पात्रतेनुसार दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शासनाकडून भरण्यात येणार असून, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जाची रक्कम असल्यास शासनाच्या नियमानुसार अतिरिक्त रक्कम एकरकमी भरावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे किंवा अनावश्यकपणे बँकांमध्ये गर्दी करण्याचे कारण नाही.
कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत कोणतीही तक्रार, अडचण किंवा शंका असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित समस्यांचे योग्य प्रकारे निराकरण करण्यात येईल. पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, शेतकऱ्यांनी संयम राखून शासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
******

No comments:
Post a Comment