26 February, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 32 रुग्ण ; तर 11 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 192 रुग्णांवर उपचार सुरु

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 : जिल्ह्यात 32 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे औंढा परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 22 व्यक्ती, औंढा परिसर 01 व्यक्ती, कळमनुरी परिसर 01 व्यक्ती, सेनगाव परिसर 07 व्यक्ती असे एकूण 32 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 11 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 08 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 02 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 10 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 4 हजार 37 रुग्ण झाले असून, त्यापैकी  3 हजार 785 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 192 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 60 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

25 February, 2021

बालविवाह निर्मूलन कृतीदलाची बैठक संपन्न

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : बालविवाह निर्मूलनासंदर्भात जिल्हा कृती आराखडा तयार करण्यासाठी  जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह निर्मूलन कृतीदल समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली .

या बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बाल विवाह निर्मूलनासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी सर्व संबंधित विभागाला सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. तसेच किशोरवयीन मुलींसाठी असणाऱ्या सर्व योजना तपासून त्याची अंमलजबजावणी  जिल्हा कृती दलात करावी. तसेच अल्पवयीन मुलींच्या गर्थधारणेच्या आकड्यावर लक्ष ठेवण्याच्याही संबंधित विभागाला सूचना केल्या. बालविवाह निर्मूलनासाठी  शासन स्तरावरुन प्रत्येक गावात ग्रामसेवकांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून आणि अंगणवाडी सेविकांना सहायक म्हणून घोषित करण्यात आले आहे. बालविवाह निर्मूलनासाठी त्यांच्यामार्फत काम केले जात आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस युनिसेफचे प्रतिनिधी आणि एसबीसी-3 संस्थापक निशीत कुमार यांनी बाल विवाह निर्मूलनासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी युनिसेफ आणि महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत सुचविण्यात आलेल्या सात महत्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. तसेच पुढील बैठकीत जिल्हा कृती आराखडा तयार करण्याठी मसुदा चर्चेला आणण्याचे ठरले.

या बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी ए.आर. मलदोडे, नगर परिषदेचे राजू असोले, शिक्षण विस्तार अधिकारी एम.के.जुमडे, जिल्हा काजी संघटनेचे ॲड . काजी नईमोद्दीन सलाहोद्दीन ,  एसबीसी -3 चे राज्य समन्वयक पूजा यादव , ॲड . राजेश भूतनर, संदीप कोल्हे, चाईल्ड लाईन, केंद्र समन्वयक, उज्वल पाईकराव, विद्या नागशेट्टीवार, विधी सल्लागार जि.म.बा.वि. कार्यालय तसेच जिल्हा बाल सरंक्षण कक्षातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

****

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 24 रुग्ण ; तर 10 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 158 रुग्णांवर उपचार सुरु तर एकाचा मृत्यू

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात 24 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे कळमनुरी परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 22 व्यक्ती, सेनगाव परिसर 01 व्यक्ती असे एकूण 24 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 10 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 08 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 02 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 10 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 4 हजार 5 रुग्ण झाले असून, त्यापैकी  3 हजार 774 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 171 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 60 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

24 February, 2021

हिंगोली जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रे कंटेनमेंट झोन घोषित

 


 

        हिंगोली, दि.24 :  हिंगोली शहरातील लक्ष्मीनगर, बियाणीनगर, गांधी चौक, तालाब कट्टा, कोमटी गल्ली, मारवाडी गल्ली, ग्रामीण पोलीस स्टेशन, शिवाजी नगर, विवेकानंद नगर, पोस्ट ऑफीस रोड, जिजामाता नगर, टि.व्ही. सेंटर तसेच हिंगोली ग्रामीण क्षेत्रातील समगा, सावरगांव बगला, इंचा, काळकोंडी, जोडतळा येथे कोविड-19 चे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव इतरत्र होवू नये यासाठी वरील संपूर्ण क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक त्या सेवा  नगर परिषद / ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.

            या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

****

 

 

 

सर्व आस्थापना, दुकानदार, प्रवासी यांचे अँटीजेन तपासणी करण्याचे आदेश

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : राज्यात तसेच जिल्ह्यात कोव्ह‍िड-१९ बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आस्थापना मालक, दुकानदार तसेच जिल्ह्यात येणारे व जिल्ह्यातून बाहेर जाणारे प्रवासी यांची अँटीजेन  तपासणी बंधनकारक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी आदेश दिले आहेत.

यासाठी आरोग्य विभागामार्फत यापूर्वी आस्थापना मालक, दुकानदार यांच्या अँटीजेन तपासण्यासाठी उभारण्यात आलेल्या कॅम्प प्रमाणे यावेळी देखील जिल्ह्यातील सर्व आस्थापना मालक, दुकानदार व त्यांच्याकडे काम करणारे कमर्चारी यांच्या कोरोना अँटीजेन तपासण्या करण्यासाठी कॅम्प उभारुन तपासण्या करण्यात याव्यात. यासाठी आरोग्य विभागाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी नगर परिषद/नगर पंचायत यांच्याशी समन्वय साधावा.

तसेच जिल्ह्यात येणारे व जिल्ह्यातून बाहेर जाणारे प्रवाशी यांची देखील कोरोनाच्या अनुषंगाने अँटीजेन तपासण्या करण्यात याव्यात. यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या मुख्य रस्त्यांवर प्रवासी व खाजगी वाहतूकीतून प्रवास करणारे प्रवाशी यांच्यासाठी एका रस्त्यावर 02 कॅम्प उभारावेत. 02 कॅम्प मध्ये किमान एक किमी अंतर असावे. यानुसार जिल्ह्यातून बाहेर जाणारे व जिल्ह्यात येणारे प्रवाशी यांच्या अँटीजेन तपासण्या करण्यात याव्यात. यासाठी आरोग्य विभागाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी नगर परिषद/नगर पंचायत यांच्याशी समन्वय साधावा.

यानुसार वरीलप्रमाणे जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकानदार, प्रवासी यांच्या अँटीजेन तपासण्या करण्यात याव्यात. यामध्ये जे नागरिक कोरोना बाधित आढळतील अशांना कोरोनाच्या अनुषंगाने उपचारासाठी पुढील कार्यवाही करण्यात यावी.

या आदेशाची आवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

या आदेशाची सक्तीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी नगर पंचायत-नगर परिषद, ग्रामसेवक, तलाठी व इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची असेल.

******

संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : राज्यात तसेच जिल्ह्यात कोव्ह‍िड-१९ बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी त्यांना प्राप्त अधिकाराचा वापर करुन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्याच्या (ग्रामीण/शहरी) हद्दीतील सर्व प्रकारच्या हालचालीस (व्यक्ती/वाहन) व सर्व आस्थापना, दुकाने, खानावळ इत्यादीसाठी दि. 24 फेब्रुवारी, 2021 पासून पुढील आदेशापर्यंत रात्री 7.00 ते सकाळी 7.00 या कालावधीत संचारबंदी लागू केली असून खालीलप्रमाणे आदेश देण्यात आलेले आहेत.

1. या कालावधीत दूध विक्री केंद्र, दूध विक्रेते यांनारात्री ७.०० ते रात्री ९.०० पर्यंत चालू ठेवण्यास मुभा राहील.

2. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, बँका या कामकाजासाठी चालू राहतील. यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना ये-जा करण्यासाठी मुभा राहील. परंतु सोबत ओळखपत्र ठेवणे बंधनकारक राहील.

3. या कालावधीत फक्त खाजगी रुग्णालयास संलग्न असलेली औषधी दुकाने रुग्णालयाच्या वेळेनुसार तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यकतेनुसार अशा औषधी दुकानांना चालू ठेवण्यास मुभा राहील.

4. या कालावधीत पत्रकार व त्यांचे कार्यालयीन कर्मचारी यांना सदर कालावधीत वार्तांकन व कार्यालयीन कामकाजासाठी ये-जा करण्यास मुभा राहील.परंतु सोबत ओळखपत्र ठेवणे बंधनकारक राहील.

5. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गाची कामे व दुरुस्ती करण्यास, आरोग्य/शासकीय विभागाशी संबंधित बांधकामे, महावितरण, महापारेषणआणि इतर विद्युत विषयक विभागाकडील देखभाल व दुरुस्तीची कामे, दूरसंचारशी संलग्न सेवा, पाणीपुरवठा, जलनिस्सारण आणि स्वच्छता विषयक कामे करण्यास मुभा राहील. यासाठी संबंधित विभागाकडील आदेश, ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक राहील.

6. या कालावधीत जिल्ह्यातील पेट्रोल पंप केवळ शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व कृषी सेवा संबंधित वाहने यांना इंधन पुरवठा करण्यासाठी चालू राहतील.

या कालावधीत यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या कोणत्याही खाजगी आस्थापना, दुकाने, खानावळ, हॉटेल यांना परवानगी राहणार नाही.

वरीलप्रमाणे संचाराची मुभा दिलेल्या व्यक्तींना सामाजिक अंतर राखून तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. यानुसार संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा, परवानगी घेतलेल्या व्यक्तीशिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने, बाजारामध्ये, गल्ली मध्ये, गावामध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास त्याच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

वरीलप्रमाणे आदेशाची सक्तीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी,सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी नगर परिषद-नगर पंचायत, ग्रामसेवक, तलाठी व इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची असेल, असेही आदेशात नमूद केले आहे.

*****

 

 

लग्न समारंभास पूर्व परवानगी आवश्यक जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतअसल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे अगत्याचे झाले आहे.

त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लग्न समारंभास बंदी घालण्यात येत आहे. लग्न समारंभ आयोजित करण्यासाठी संबंधितानी जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्व परवानगी घेणे अनिवार्य राहील. अन्यथा पूर्व परवानगी न घेता लग्न समारंभाचे आयोजन केल्यास वधूपक्ष व वर पक्षातील सर्व नागरिकांविरुद्ध कोरोनाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल. तसेच परवानगी नसताना देखील लग्न समारंभाचे आयोजन केल्यास संबंधित लॉन्स / मंगल कार्यालय चालकांविरुद्ध गुन्हा नोंद करुन लॉन्स / मंगल कार्यालय सील करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.

VRRT पथकाने परवानगी न घेता आयोजित केल्या जाणाऱ्या लग्न समारंभाविषयी स्थानिक तहसीलदार, मुख्याधिकारी नगर परिषद/नगर पंचायत तसेच पोलीस विभागास तात्काळ अवगत करावे. त्यानुसार संबंधितांवर कार्यवाही करण्याची व या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी हिंगोली जिल्हा, सर्व तहसीलदार हिंगोली जिल्हा तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधीत विभाग प्रमुख यांची असेल. त्यानुसार या आदेशाची आवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग प्रतिबंध कायदा १८९७यानुसार अपराध केला असे मानण्यात येऊन संबंधितावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असेही आदेशात नमूद केले आहे.

******