02 June, 2025
फलोत्पादन योजनेचे अनुदान शाश्वत शेतीला प्रोत्साहन • लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 02 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्गवारी घटकानुसार 40 ते 50 टक्के अनुदान दिले जात आहे. या अभियानाचा उद्देश फलोत्पादनाला प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा आहे.
या अभियानाच्या माध्यमातून फळबाग उत्पादनात वाढ, गुणवत्ता आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल अशी अपेक्षा आहे. हे पाऊल शाश्वत शेतीच्या विकासाला प्रोत्साहन देईल. तसेच पीक काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यास मदत करेल. शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व फलोत्पादन पिकांच्या वाढीसाठी आवश्यक सुविधा मिळवाव्यात. अभियानांतर्गत ड्रॅगन फ्रुट, ॲव्होकॅडो, खजूर, फुले, मसाला पिके, हळद, शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टिक मल्चींग, सामूहिक शेततळे, त्यांचे अस्तरीकरण, फळबाग पुनरुजीवन, कांदा चाळ, फॉर्म गेट पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रेफरव्हॅन, रायपनिंग चेंबर, पॉवर टिलर, पीक संरक्षण उपकरणे, साठवणूक व विक्रीसाठी सुविधा, शीतगृह विक्री केंद्र, मधुमक्षिका वसाहत इत्यादी बाबीसाठी अर्ज मागविण्यात येत असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
असा करा अर्ज :
महाडीबीटीच्या संकेतस्थळावर लॉगिन करा. योजनेच्या टप्यानुसार अर्ज सादर करा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, याशिवाय नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन माहिती घ्यावी. या वर्षापासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
लाभार्थीच्या नावे सातबारा असणे आवश्यक तसेच सातबाऱ्यांमध्ये फळपिकांची नोंद आवश्यक, 8 अ नमुना, आधारकार्ड छायांकित प्रत, आधारलिंक बँक पासबूकची छायांकित प्रत, आधार लिंक मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment