24 June, 2025

आणीबाणी काळात लढा देणाऱ्या व्यक्तींचा मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन होणार गौरव

• आणीबाणी लागू करण्यात आलेल्या घटनेला 50 वर्षे पूर्ण होत असल्याने 25 व 26 जून रोजी दोन दिवशीय चित्रमय प्रदर्शनाचे आयोजन हिंगोली (जिमाका), दि. 24 : देशात दि. 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला 25 जून रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात दि. 25 व 26 जून, 2025 या कालावधीत दोन दिवशीय चित्रमय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. 25 जून, 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते फीत कापून करण्यात येणार आहे. तसेच दि. 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत घोषित आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या आणि त्यासाठी बंदिवास सोसावा लागला अशा व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने बुधवार, दि. 25 जून 2025 रोजी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र वितरीत करण्याच्या सभारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली तालुक्यातील हयात आणीबाणी धारक किंवा त्यांच्या वारस पत्नी यांना शिवाजीराव देशमुख सभागृह, हिंगोली येथे दि. 25 जून, 2025 रोजी सकाळी 10 वाजता वितरण करण्यात येणार आहे. तर कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील हयात आणीबाणी धारक किंवा त्यांच्या वारस पत्नी यांना संबंधित तहसील स्तरावर वितरीत करण्यात येणार आहे. संबंधित तालुक्यातील हयात आणीबाणी धारक किंवा त्यांच्या वारस पत्नी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. *****

No comments: