02 June, 2025

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्ह्यात फळबाग लागवडीच्या माध्यमातून फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ करणे. शाश्वत रोजगार निर्मिती करुन स्थानिक पातळीवर पूरक व्यवसायात वाढ करणे व उत्पादन वाढविणे हा योजनेचा उद्देश आहे. ही योजना जिल्ह्यात सर्व ग्राम पंचायतीमध्ये राबविण्यात येत असून लागवड जून ते मार्च या कालावधीत करण्यात येईल. लाभार्थीस 100 टक्के अनुदानावर सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर विविध फळझाडांची, वृक्षांची, फूल पिकांची, मसाला पिकांची लागवड करता येते. फळपिके, वृक्ष व इतर पिके : आंबा, काजू, चिकू, पेरु, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, बोर, सिताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, अंजीर कलमे, साग, गिरीपुष्प, सिंध्दी, शेवगा, हादगा, बांबू, जट्रोफा, कडीपत्ता, पानपिंपरी, करंज व इतर औषधी वनस्पतींचा समावेश आहे. नवीन फळपिके : द्राक्ष, ड्रॅगनफ्रूट, अव्हेकेडो, केळी (3 वर्ष) चा समावेश आहे. फूल पिके : गुलाब, मोगरा, निशीगंधा, सोनचाफा . मसाला पिके : लवंग, दालचिनी, जायफळ, मिरी . पात्रतेचे निकष : लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थी जॉबकार्ड धारक व अल्प, अत्यल्प भूधारक असावा. जमीन कूळ कायद्याखाली येत असल्यास व सातबाराच्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असले तर योजना कुळाच्या संमतीने राबविण्यात यावी. योजनेतील लाभार्थींना लागवड केलेल्या फळझाडे, वृक्षांच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायत पिकांचे 90 टक्के आणि कोरडवाहू पिकांचे 75 टक्के असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना 0.05 हेक्टर ते 2 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत फळझाड लागवड करता येते. इच्छूक शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी लाभ घ्यावयाचा आहे. अधिक माहितीसाठी संबंधित गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. *****

No comments: