23 April, 2025
अक्षय तृतियेला बालविवाह केल्यास होणार कठोर कारवाई - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. 23 : येत्या बुधवार (दि.30) रोजी 'अक्षय्य तृतीया’ असून, या दिवशी जिल्ह्यात संभाव्य बाल विवाहाच्या घटना घडू शकतात. ते संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तसेच असे बालविवाह केल्यास कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यंत्रणेला दिले आहेत.
तसेच नागरिकांनी बालविवाह रोखण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1098 किंवा 112 यावर माहिती द्यावी, नागरिकांनी सतर्क राहून बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 आणि महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2022 लागू करण्यात आला आहे. त्यानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना शहरी भागासाठी तर ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तसेच ग्रामीण भागाकरिता अंगणवाडी सेविका व शहरी भागाकरिता पर्यवेक्षिका यांना सहाय्यक बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
'अक्षय्य तृतीया' या दिवशी हिंगोली जिल्ह्यात बालविवाह होवू शकतात व यास प्रतिबंध म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. त्यानुसार एखाद्या पुरुषाने अल्पवयीन वधूशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीचो कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बालविवाह झाल्यास, संबंधित वर व वधू यांचे आई-वडील किंवा पालक व अन्य नातेवाईक मित्र परिवार, विवाह विधी पार पाडणारे संबंधित व्यक्ती, धार्मिक गुरु, पंडित, काजी, सेवा देणारे, मंडप मालक, फोटोग्राफर, केटरिंग व्यावसायिक, लॉन्स मालक आणि वाजंत्री असे सर्व, ज्यांनी हा बालविवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत व विवाहात सामील झालेल्या सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. सोबतच ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांनी जन्म दाखल्याची खोटी नोंद केल्यास त्यांच्यावर सुध्दा गुन्हा दाखल होऊ शकतो.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment