28 April, 2025
प्रशासनाप्रती विश्वास निर्माण करणे, मोठी बाब -मावळते जिल्हाधिकारी अभिनव गोयल
निरोपाच्या वेळी हिंगोलीकरांच्या भावना संमिश्र....!!!
हिंगोली (जिमाका), दि. 28 : हिंगोली जिल्ह्यात जेमतेम 7 महिने काम करण्याची संधी लाभली. त्या कार्यकाळात हिंगोलीवासीयांच्या मनात जिल्हा प्रशासनाप्रती विश्वास निर्माण करता आला, ही मोठी बाब असल्याची भावना मावळते जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी निरोप समारंभात व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित निरोप आणि स्वागत समारंभात श्री. गोयल बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर नूतन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, श्रीमती शुभी अभिनव गोयल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार अश्विन माने यावेळी उपस्थित होते.
या जिल्ह्यात काम करताना काही बाबींचा, प्रसंगांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, असे सांगून त्यांनी अतिवृष्टी व कयाधू नदीला आलेल्या पूरपरिस्थितीबाबतची आठवण सांगितली. या जिल्ह्यात काम करताना निपुण हिंगोली, संजिवनी अभियान, कृषि, आरोग्य, शिक्षण विभागात काम करता आले. हिंगोली जिल्ह्यात शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रक्षेत्र भेटी दिल्यामुळे हिंगोलीकरांसोबत चांगली नाळ जुळली असल्याचे सांगून, आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत असलो तरीही हिंगोली आणि हिंगोलीकर कायम हृदयात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच कधीही तिकडे आल्यास हिंगोलीकरांसाठी त्यांच्या घराचे दरवाजे उघडे असल्याचे सांगताच सभागृहाचे वातावरण भावूक झाले होते.
नोकरी म्हटले की बदली आलीच, त्यामुळे जिथे आहोत, तिथे आपल्या कामाची छाप सोडायची. नेतृत्वाने केवळ फॉलोअर्स न वाढवता नेतृत्व वाढवायचे ते विकसित करायचे असते, असे मावळते जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध विकासकामांचा आवर्जून उल्लेख करत जिल्हा न्यायालयाची इमारत, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयाकडे झालेले हस्तांतरण यांचा उहापोह केला. तसेच येथील कामकाजाचा मोठा अनुभव भविष्यात वरिष्ठ पातळीवर धोरणनिश्चिती करताना नक्कीच कामी येईल, असे सांगून जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि माध्यमकर्मींचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
यावेळी स्वागत समारंभात नूतन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मावळते जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे राहिलेले कामकाज त्याच गतीने पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त करताना धाराशिवमध्ये असताना त्यांच्या अनेक नाविन्यपूर्ण बाबींचे अनुकरण केले असल्याचे सांगितले. हिंगोलीच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना, उपक्रम तितक्याच ताकदीने यशस्वीरित्या पुढे नेत राबविण्यात येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, जयाजी पाईकराव, संजय टाकळगव्हाणकर यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment