27 April, 2025

मूल्य साखळी भागीदार निवडीसाठी पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अर्ज करावेत

हिंगोली(जिमाका), दि. २७ : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत सन २०२५-२६ साठी मूल्य साखळी भागीदार यांच्यामार्फत समूहामध्ये प्रमाणित बियाणे शेतकरी प्रशिक्षण व शेतकरी शेतीशाळा इत्यादी घटक राबवायचे आहेत. त्यानुषंगाने मूल्य साखळी भागीदार निवडीसाठी पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत नवीन कार्यकारी सूचना केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाल्या आहेत. या अभियानाची सन २०२५-२६ मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत सोयाबीन, करडई या पिकांसाठी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्याची निवड केली आहे. अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये पिकनिहाय मूल्य साखळी समूह निवडणे, मूल्य साखळी भागीदार म्हणून शेतकरी उत्पादक कंपनीची निवड करणे, तांत्रिक सहाय्य संस्था म्हणून कृषि विज्ञान केंद्राची निवड, मुलभूत बियाणे खरेदी (१०० टक्के केंद्र हिस्सा), मूल्य साखळी भागीदार यांच्यामार्फत समुहामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी शेतीशाळा व मूल्य साखळी भागीदार यांना व्यवस्थापन खर्च, मूल्य साखळी समुहामधील शेतकऱ्यांचे माती परिक्षण, सीड हब, ब्लॉक प्रात्यक्षिके, काढणीत्तोर सुविधा सहाय्य, कृषि मॅपरवर लाभार्थ्यांची माहिती भरणे इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत सन २०२५-२६ या योजनेअंतर्गत मूल्य साखळी भागीदार यांच्यामार्फत समूहामध्ये प्रमाणित बियाणे शेतकरी प्रशिक्षण व शेतकरी शेतीशाळा इत्यादी घटक राबवायचे आहेत. त्यानुषंगाने मूल्य साखळी भागीदार म्हणून निवड करावयाच्या शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्थांसाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे असतील. कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यांतर्गत नोंदणी केलेली असावी. हिंगोली जिल्ह्यात समूह तयार झाला आहे तेथे काम करण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा. किमान २०० शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्थेमध्ये नोंदणीकृत असावेत. सहकारी संस्था असल्यास संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये तेलबिया पिकांत कामकाजाबाबत नमूद असावेत. मागील तीन वर्षातील सरासरी वार्षिक उलाढाल ९ लाख रुपयांपेक्षा जास्त असावी. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकऱ्यांचा किमान ३ लाख रुपयांचा समभाग असावा. शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी संस्था प्राधान्याने कमी उत्पादकता असणाऱ्या तालुक्यांमध्ये कार्यरत असावी. सरकारकडून अनुदान प्राप्तकर्ता शेतकरी उत्पादक संघाला प्राधान्य दिले जाईल. १० हजार रुपये शेतकरी उत्पादक संघ योजनेंतर्गत तयार केलेले शेतकरी उत्पादक कंपनी, नाफेड, एनएससी-ओएस इत्यादी सार्वजनिक संस्थांकडे नोंदणीकृत तेलबियांशी संबंधित शेतकरी उत्पादक कंपनी यांना पात्रता निकषांच्या पूर्ततेच्या अधीन राहून प्राधान्य दिले जाईल. हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांनी/सहकारी संस्थांनी निकषानुसार दि. ३० एप्रिलपूर्वी या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याकडे कागदपत्रासह अर्ज प्रत्यक्ष सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. **

No comments: