22 April, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला विविध योजनांचा आढावा
• रोहयोची अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करा-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• विविध योजनेची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश
• प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना पाच झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करा
हिंगोली (जिमाका), दि. 22: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून घेण्यात येणारी अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, विविध आवास योजना, जलशक्ती अभियान, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोल, पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, पुष्पा पवार, सर्व गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, जिल्ह्यात रोहयोची मंजूर असलेली सर्व कामे वेळेत आणि जलदगतीने पूर्ण करावीत. मजुरांचे हजेरी पट वेळेत तातडीने पूर्ण करा. तसेच त्यांचे वेतन अदा करण्याची कार्यवाही तातडीने करावी. मजुरांचे वेतन अदा करण्यास विलंब झाल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करावी. त्याला वेळ लागणार नाही याची दक्षता घ्यावी. रेशीम लागवड, फळबाग लागवड, चारा लागवड यासह विविध कामांना वेळेत तांत्रिक मान्यता देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिका-याला दिल्या. दि. 28 एप्रिल व 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत विविध योजनेचे जास्तीत जास्त प्रस्ताव मागवून घ्यावेत. योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
तसेच प्रधानमंत्री आवास टप्पा दोन मधील 3944 घरकुलांना तात्काळ मंजुरी द्यावी तसेच घरकुलाचा पहिला हप्ता 10 हजार 483 लाभार्थ्यांना 30 एप्रिलपर्यंत त्यांच्या बँक खात्यावर जमा करावा. अपूर्ण बांधकाम झालेली घरे तात्काळ पूर्ण करावीत. तसेच घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या जागेत 5 झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करावे. घरकुलांसाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांना गावठाण विस्तारामध्ये जागा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन प्रस्ताव सादर करावेत. त्यास मान्यता देण्यात येईल. तसेच आवास योजनेची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या.
स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाला गती द्यावी, कुटुंबाना वैयक्तिक कचरा कुंडी तसेच गावात सार्वजनिक कचराकुंडी उपलब्ध करून द्यावी व गावे ओडीएफ प्लस मॉडेल करावीत, वैयक्तिक शौचालय पूर्ण करावेत तसेच मोठ्या शाळांना सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना देत यासंदर्भात सविस्तर आढावा घेतला व पुढील बैठकीत याचा प्रगती अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात जलजीवन मिशनची 616 कामे प्रस्तावित असून, 201 कामे पूर्ण झालेली आहेत. प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत. जागेचा किंवा इतर काही वाद असल्यास ते तात्काळ सोडविण्यात यावेत. यासाठी पोलीस संरक्षणाची गरज भासल्यास तसे कळवावे. त्यानुसार आपणास पोलीस संरक्षण देण्यात येईल. जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचविण्यासाठी 'हर घर जल' मोहिम यशस्वीपणे राबवावी. काम करण्यास अडचण येत असलेल्या गावांची यादी तयार करावी. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 73 गावांची निवड करण्यात आली होती. निवड केलेल्या गावांमध्ये विविध विभागाने ७८.७५ कोटी रुपयांच्या 1805 कामांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला होता. त्यापैकी विविध विभागाने 1155 कामे पूर्ण करण्यात आली आहेत, तसेच पूर्ण झालेल्या कामावर 23.98 कोटी खर्च करण्यात आलेला आहे. 104 कामे प्रगतीपथावर आहेत. प्रकल्पनिहाय प्रलंबित कामाचा आढावा घेऊन ती कामे तात्काळ पूर्ण करावेत. जलशक्ती अभियानांतर्गंत 'कॅच दि रेन' उपक्रम राबवावा. पाण्याच्या स्त्रोताच्या ठिकाणी शोषखड्डे (रिचार्ज शॉफ्ट) घेण्यात यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या.
****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment