06 May, 2025
शून्य मशागत शेती पद्धती जिल्ह्यात राबवावी -- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली(जिमाका), दि. 06 : शेती सजीव करण्यासाठी तिचा कर्ब वाढविणे गरजेचे आहे. यासाठी शून्य मशागत शेती पद्धती अवलंबली पाहिजे. तसेच जिल्ह्यामध्ये किमान दहा हजार शेतकऱ्यांनी ही पद्धती स्वीकारावी यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
उमरा येथील उगम संस्थेमध्ये सगुना रुरल डेव्हलपमेंट नेरळ आणि उगम ग्रामीण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शून्य मशागत शेती पद्धतीचे संशोधक चंद्रशेखर भडसावळे यांनी शून्य मशागत शेती पद्धतीची निर्मिती व संकल्पना याविषयी ऑनलाईन शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले, शेतकरी आनंदी झाला पाहिजे, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे परंतु तो समाधानी नाही कारण शेतीमध्ये होणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात आहे आणि मिळणारे उत्पन्न हे कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागत टाळली तर होणारा खर्च वाचतो. त्याचबरोबर जमिनीतील जिवाणू जिवंत राहतात आणि जिवाणू कर्ब खाऊन जिवंत राहतात. जर कर्ब कमी झाला तर जिवाणूंची संख्या कमी होईल आणि शेतीवर होणारा खर्च वाढवावा लागेल. याला लगाम घालायला शून्य मशागत शेती पद्धती महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल निवळकर यांनी सगुना शेती पद्धतीमुळे माती वर्षानुसार बदलत जाते. तसेच ती थंड राहते त्याचबरोबर या शेतीमध्ये गांडूळ पाहायला मिळतात. तापमान कमी करण्यासाठी ही शेती पद्धती महत्त्वाची आहे. या पद्धतीमध्ये फक्त तणनाशकाचा वापर केला जातो. मात्र कुठल्याही प्र कारच्या रासायनिक खत किंवा औषधाचा वापर केला जात नाही. तसेच मिश्र पीक पद्धती सुद्धा या पद्धतीने मध्ये घेता येते, असे त्यांनी सांगितले.
सतीश खाडे यांनी मातीचे आरोग्य कसे तपासायचे याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याचबरोबर माती साक्षरता शेतकऱ्यांमध्ये रुजावी अशी अपेक्षा त्यांनी यंत्रणेसमोर मांडली. शेतीमध्ये जेव्हा तणाचे मूळ तसेच ठेवली जातात आणि ती जेव्हा पूर्णपणे वाळून जातात. ती मूळ पाणी जमिनीमध्ये मुरवण्यासाठी मदतीची ठरतात, असे सांगितले. परशुराम अगविले यांनी शून्य मशागत शेतीमध्ये सुरुवातीपासून तर पिकनिघेपर्यंत काय काय पायऱ्या आहेत याची माहिती शेतकऱ्यांना दिली तसेच कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारी पद्धतीही आहे, असेही त्यांनी सांगितले. विठ्ठलराव बदखल यांनी सांगितले की वन्य प्राण्यापासून शेतीचे संरक्षण कशा पद्धतीने केले जाते. तसेच वन्य प्राणी शेतात येत असतील तर वनविभाग कसल्या प्रकारचे मदत करू शकते हे त्यांनी सांगितले तसेच जीवित हानी मनुष्यहानी झाली तर नुकसान भरपाई काय मिळते याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
सहायक विभागीय अधिकारी सचिन माने यांनी शेती नुकसान भरपाईसाठी ऑनलाइन पद्धतीने कसा अर्ज करावा याविषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सदाशिव अडकिने यांनी जैविक बांध याविषयी मार्गदर्शन केले तसेच त्यांनी केलेली करवंदाची बाग व त्याचे फायदे शेतकऱ्यांना सांगितले. रावसाहेब मोरे व विठ्ठलराव वैद्य यांनी जालना व संभाजीनगर येथे केलेल्या शून्य मशागत शेती पद्धतीचा अनुभव शेतकऱ्यांना सांगितला व हा प्रयोग आपल्या भागात यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलताना जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी राजेंद्र कदम यांनी शून्य मशागत शेतीसाठी अधिक शेतकऱ्यांना प्रवृत करण्यात येईल. प्रामुख्याने पोकरा व नैसर्गिक शेती अंतर्गत निवडलेल्या सर्व गावांमध्ये तसेच या कार्यशाळेस उपस्थित असलेल्या सर्व गावात हा कार्यक्रम राबविला जाईल, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जयाजी पाईकराव म्हणाले, सगुणा बाग कर्जत येथे भेट देऊन तेथील माती आणि शेतीची पाहणी केली आणि ती पद्धती यशस्वी होऊ शकते. तसेच आपल्या परिसरात तसेच मॉडेल उभे राहू शकते म्हणून या कार्यशाळेचे नियोजन केले असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास कांबळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिशांत पाईकराव, सुशांत पाईकराव, सिद्धार्थ निनुले, रामराव खंदारे, ओमकार भालेराव व बुद्धभूषण पातोडे, भीमराव पाईकराव यांनी प्रयत्न केले.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment