14 May, 2025
कृषि निविष्ठा दुकानांची मे अखेरीपर्यंत तपासणी पूर्ण करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• खरीप हंगाम पूर्वतयारीचा आढावा बैठक
• रेशीम लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करा
• मुबलक कृषि निविष्ठा उपलब्ध असल्याची खात्री करा
हिंगोली (जिमाका), दि. 14: यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतक-यांना बियाणे व खताची खरेदी करताना कंपन्यामार्फत कृषी केंद्र संचालकांकडून लिंकींग करण्यात येणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच सर्व कृषी निविष्ठा दुकानदारांची मे अखेरपर्यंत तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आढावा बैठकीत संबंधित अधिका-यांना दिले.
बैठकीला आमदार तानाजी मुटकुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, तालुका कृषी अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम 2025 ची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील खरीप हंगामातील तयारी, बियाणे व खतांची उपलब्धता, कृषी योजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मातीचा पोत सुधारणे आणि शेतीचे आरोग्य वाढविणे यासाठी मृदा परीक्षणासोबतच टप्प्याटप्प्याने रासायनिक खतांवरील शेतीचे अवलंबित्व कमी करताना सेंद्रीय खतांचा वापर वाढविण्यावर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज येथे जिल्हा यंत्रणा प्रमुखांना दिले.
पीक विमा व अतिवृष्टी अनुदानाच्या प्रलंबित लाभार्थ्यांची ई-केवायसी तात्काळ करुन त्यांना अनुदानाचे वितरण करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या विहिरींना मागेल त्याला सौर पंप योजनेतून तात्काळ वीज जोडणी द्यावी. यासाठी योग्य कंपनीची निवड करावी. गारपिटीमध्ये नुकसान झालेल्या सोलारचे सर्वेक्षण करुन ते तात्काळ दुरुस्त करावेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, एसआरएलएम आदी योजनेच्या प्रलंबित प्रस्तावाची बँकनिहाय माहिती तयार करुन द्यावी व ती प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, अशा सूचना केल्या.
रासायनिक खतांच्या वापरामुळे होणाऱ्या पर्यावरणीय व आरोग्यविषयक दुष्परिणामांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी सेंद्रीय खतांचा अधिकाधिक वापर करावा यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. खतांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. या खतांचा वापर वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देताना फळबाग लागवड योजना, हळद लागवड, रेशीम शेती क्षेत्र वाढविण्यासाठी विशेष भर द्यावा. त्यासाठी कृषि विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे. त्यासाठी विविध कार्यशाळा, प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करण्यास त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात तुती लागवडीसही चालना मिळावी, शेतकऱ्यांनी त्यामध्ये रस दाखवावा, यासाठी एक हजार एकरावर रेशीमशेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढविण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले.
या वर्षी जिल्ह्यासाठी 73 हजार 293 क्विंटल सोयाबीन बियाण्याची गरज आहे. रासायनिक खतांचा पुरवठाही पुरेशा प्रमाणात राहणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. जिल्ह्यासाठी कापूस बियाण्यांच्या 1 लाख 52 हजार पाकीटांची आवश्यकता आहे.
बैठकीत हळद प्रशिक्षण व संशोधन केंद्र, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, राष्ट्रीय अन्न व पोषण अभियान, प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजना, वैयक्तिक शेततळे, फळबाग योजना, डिजिटल शेती शाळा, माती परीक्षण, महाडीबीटीवरील अर्जवाढ, हिरवळीच्या खतांचा वापर, पिक स्पर्धा, बायोचार योजना, हुमनी कीड नियंत्रण, बीबीएफ पद्धत, शेतकऱ्यांचे व्हॉट्सअॅप गट तयार करून त्यांच्यामध्ये जनजागृती आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.
यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी जिल्ह्यात सोयाबीन हे मुख्य पीक आहे. परंतु सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मका पिकाकडे वळला पाहिजे. यामुळे जनावरांना वैरण सुध्दा उपलब्ध होते. यासाठी शेतकऱ्यांना मका पिकांकडे वळविण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून हरभरा पिकाचा पिक विमा मिळण्यासाठी सर्व मंडळे समाविष्ट करुन प्रस्ताव पाठवावा. तसेच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा बियाणे व खताची लिंकींग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच राखीव साठाही मागणीनुसार तयार ठेवावा, अशा सूचना केल्या.
यावेळी कृषि विज्ञान केंद्रामार्फत दि. 29 मे ते 12 जून, 2025 या कालावधीत विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये कृषी सुवर्ध समृध्दी रथाद्वारे जिल्ह्यातील 90 गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राजेश भालेराव यांनी दिली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर खरीप हंगामपूर्व आढावा सादर केला. शेवटी उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment