14 May, 2025
पावसाळ्यात आपत्तीचा सामना करताना योग्य समन्वय ठेवा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व तयारी आढावा
• तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करा
हिंगोली (जिमाका), दि. 14 : आगामी पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा प्रभावी सामना करण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवावा,असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. कोणतीही परवानगी न घेता अधिकारी मुख्यालय सोडू नयेत,असेही त्यांनी स्पष्ट केले.
मान्सूनपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला. यामध्ये जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी आपले कामकाज सुसूत्रपणे पार पाडावे, मदत व पुनर्वसन कार्य तत्काळ सुरू करावे आणि नागरिकांमध्ये जनजागृती वाढवावी, असे निर्देश देण्यात आले.
या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेसिंग चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, नगर परिषद व नगर पंचायतीचे मुख्याधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी जलद प्रतिसाद पथक, आपत्कालीन संपर्क यंत्रणा, वैद्यकीय सुविधा, पूरप्रवण क्षेत्रातील उपाययोजना आणि जनजागृती मोहिमांवर भर देण्याचे निर्देश दिले. संभाव्य पूरस्थिती, वीज गळती, आरोग्यविषयक आपत्ती आणि सेवा कार्यक्षमतेबाबतही चर्चा झाली. प्रत्येक विभागाला विशिष्ट जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले.
जिल्ह्यातील पैनगंगा, पुर्णा, कयाधू आणि इतर नद्यांमुळे काही गावांना पूराचा धोका असल्याने संबंधित यंत्रणांनी दक्ष रहावे. 70 पूरप्रवण गावांमध्ये आवश्यक साहित्याची तपासणी करून ठेवावी. पूर परिस्थितीत पुरात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी बचाव पथके तयार करुन त्यांना प्रशिक्षण द्यावे. 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवून कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करावेत. आरोग्य पथकांची नियुक्ती, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार, मुबलक औषधे, रक्तसाठा, ब्लिचिंग पावडरची साठवणूक यावर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
शहरातील नाल्यांची स्वच्छता, धोकादायक इमारतींची तपासणी, स्थलांतराची पर्यायी व्यवस्था, सुरक्षित स्थळांची निवड याबाबतही निर्देश देण्यात आले. महावितरण, शिक्षण, पशुसंवर्धन व कृषी विभागांनीही आवश्यक उपाययोजना राबवाव्यात.
पाटबंधारे विभागाने धरणनिहाय समन्वय अधिकारी नेमण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी केल्या. तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी ठेवून पूर्वतयारी पूर्ण करावी. वाहन व्यवस्था सुरळीत ठेवावी. नागरिकांनी दामिनी ॲप डाऊनलोड करून विजेपासून बचाव करावा. नगरपालिका प्रशासनाने नाल्यांची सफाई युद्धपातळीवर करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment