26 May, 2025
पीक प्रात्यक्षिक बाबीसाठी नोंदणीकृत शेतकरी गटांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 26 : खरीप हंगामासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य व पौष्टिक तृणधान्य तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया राबविण्यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2025-26 मध्ये कार्यक्रमाची अंमलबजाणी करावयाची आहे.
त्यानुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्थासांठी कृषी विभागाकडून चालू खरीप हंगामासाठी पिक प्रात्यक्षिके ही बाब राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व इच्छुक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इत्यांदीनी महाराष्ट्र शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत. पीक प्रात्यक्षिके कार्यक्रमासाठी पात्रता, निकष खालीलप्रमाणे आहेत.
शेतकरी गट हा 31 मार्च, 2024 पूर्वी नोंदणी केलेला असावा. शेतकरी गट हा आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोनती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण जीवोन्नोती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड इत्यादी शासन यंत्रणेकडे नोंदणीकृत असावा. एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येईल. पीक प्रात्यक्षिकासाठी निवडलेल्या गटात 25 पेक्षा जास्त शेतकरी असल्यास संबंधित गटाने एकाच गावातील 25 शेतकऱ्यांची निवड करावी. पीक प्रात्यक्षिकासाठी महाडिबीटी पोर्टलव्दारे नोंदणीकृत शेतकरी गट, कंपनी संस्थाची निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्यात येईल. गटातील शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकाचा लाभ देताना ॲग्रीस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे.
या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्थांनी महाराष्ट्र शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावे, असे आवाहन राजेंद्र कदम. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment