02 May, 2025
पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 02 : राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देत पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमाद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.
विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली सात वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे. सन 2021-22 पासून जिल्हास्तरीय पशूसंवर्धन विषयक विविध योजनांसाठी सुद्धा सदर संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे.
यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन 2021-2 पासून पुढील 5 वर्षापर्यंत म्हणजे सन 2025-26 पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळु शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.
त्यानुसार नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, एक हजार मांसल कुक्कुट पक्षाच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25 अधिक 3 तलंगा गट वाटप या योजनासाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2025-26 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबीमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर किंवा AH-MAHABMS (Google play Store वरील मोबाईल अॅपवर उपलब्ध) या अँड्राईड मोबाईलवरील ॲपवर दि. 1 जून, 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारले जातील.
या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून, अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःचे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा, अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1962 वर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत तसेच नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन विभाग (पंचायत समिती, जिल्हा परिषद), जिल्हा पशुसवंर्धन उपआयुक्त कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment