02 May, 2025

बालविवाह निर्मूलनासाठी जिल्हा कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 02 : बालविवाहाला आळा घालण्यासाठी बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून त्याबाबत नियमित अहवाल सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह निर्मूलन कृती दल, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आढावा बैठक, बालकल्याण समिती, पोषण आढावा बैठक आज घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) गणेश वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गड्डापोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके, उपशिक्षणाधिकारी नितीन नेटके, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर, रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. सचिन हटकर, डॉ. प्रकाश जाधव, डॉ. बालाजी भाकरे, परसराम हेंबाडे, युनिसेफ एसबीसी ३ चे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक बाळू राठोड, प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, रेशमा पठाण, समुपदेशक सचिन पठाडे, क्षेत्रीय कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत, चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक संदीप कोल्हे, सुरज इंगळे, तथागत इंगळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक मंगल कार्यालये, धार्मिक स्थळांच्या दर्शनी भागावर बालविवाहास समर्थन न करण्याबाबत सूचनाफलक लावावेत. यामध्ये बालविवाह केल्यास किंवा बालविवाहास समर्थन दिल्यास असलेली शिक्षेची तरतूद नमूद असावी, येत्या शैक्षणिक वर्षात शाळेत 2024-2025 या वर्षात दाखल असलेल्या विद्यार्थ्यांपैकी पुढील वर्गात प्रवेशित विद्यार्थी, पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेले विद्यार्थी, शालाबाह्य झालेले विद्यार्थी ही माहिती 15 जूनपर्यंत शिक्षण विभागाने सादर करावी. मिशन सक्षम बालिका, बालविवाह मुक्त हिंगोली जिल्हा अभियान राबविण्यासाठी नव्याने 100 गावांची निवड करावी. बालविवाह निर्मूलनासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15 ऑगस्ट रोजी पालक मंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार करावा. प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागावर चाईल्ड हेल्प लाईन नंबर रंगविण्यात यावा, अशा सूचना दिल्या. या बैठकीमध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षाने राबविलेले विविध जन जागृती कार्यक्रम, कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या गृहभेटी, मिशन वात्सल्य पोर्टल, एनसीपीसीआर पोर्टल, घर पोर्टल, पीएम केअर पोर्टल, गती शक्ती पोर्टल व केअरींग पोर्टल या सर्व पोर्टलवरती भरण्यात येणाऱ्या माहिती याबाबत आढावा घेण्यात आला. प्रतिपालकत्व आणि प्रायोजकत्व या योजनेअंतर्गत 650 बालकांना सन 2024-25 या वर्षाचा प्रायोजकत्व योजनेचाही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील नवीन अंगणवाडीचे बांधकाम, मोडकळीस आलेल्या अंगणवाड्याचा आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी जिल्ह्यातील नवीन बांधावयाच्या अंगणवाडीचा तसेच मोडकळीस आलेल्या अंगणवाडीचा सर्व्हे करुन प्रस्ताव तयार करावा. यासाठी डोंगरी विकास व मानवविकास योजनेतून निधी देण्यात येईल. याबरोबरच अंगणवाडीच्या ठिकाणी स्वच्छता गृहाची सोय आहे का याची शहानिशा करावी. स्वच्छता गृहाची सोय नसलेल्या ठिकाणी तशी सोय करावी. गरोदर मातांना वितरण करण्यात येणाऱ्या पोषण आहाराची पोषण ट्रॅकवर शंभर टक्के नोंदणी करावी, अशा सूचना दिल्या. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर यांनी जिल्ह्यातील बाल विवाह समूळ नष्ट करण्यासंदर्भात आखलेल्या नवीन योजना, बाल संगोपन योजनेसाठी आलेल्या लाभार्थ्यांचे करण्यात आलेले सामाजिक तपासणी अहवाल, जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयामध्ये बाल विवाहविषयक जनजागृतीची माहिती दिली तसेच बालकांसाठी असणारी कायदे व यंत्रणा, जिल्हा कृती दल बैठक, चाईल्ड हेल्पलाईन CHL (२०१८) कामकाज आढावा व बाल कल्याण समितीचा त्रैमासिक आढावा बैठकीत सादर केला. यावेळी युनिसेफच्या मोनाली धुर्वे यांनी बालविवाह कृती आराखडा, विधी सल्लागार विद्या नागशेटीवार यांनी बाल कल्याण समितीचा, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, समुपदेशक सचिन पठाडे यांनी पीपीटीच्या माध्यमातून जिल्हा बाल संरक्षण कक्षाने केलेल्या कामाचे सादरीकरण केले. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments: