09 May, 2025

शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्या - खासदार नागेश पाटील आष्टीकर

• दिशा समितीच्या बैठकीत केंद्र शासनाच्या विविध योजनांचा घेतला आढावा हिंगोली (जिमाका), दि. 09: केंद्र शासनाच्या निधीतून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य, शैक्षणिक, वीज, पाणीपुरवठा, कृषी विषयक व दळणवळण यासह पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) आढावा बैठक खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, समितीचे अशासकीय सदस्य सर्वश्री. संदीप ससे, दयानंद पतंगे, अविनाश मुळे, सुंदरराव पाटील, भास्कर खोडके, सतीश पाचपुते, गोपू पाटील, श्रीमती शशिकला भंवर, शारदा पोपळघट, आश्विनी इंगोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागामध्ये चांगल्या आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण, मध्यान्ह भोजन उपलब्ध होण्यासाठी वेळोवेळी आढावा घेण्यात यावा, असे खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणाले. तसेच जिल्ह्यात केंद्रीय निधीतून सुरु असलेल्या सर्व रस्त्यांची कामे दर्जेदार होतील, याची खबरदारी घ्यावी. सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना द्यावा, सिंचन सुविधांचे बळकटीकरण करावे. माळसेलू व चोंडी रेल्वे स्टेशनची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे त्यांनी सांगितले. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध होतील, यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे. तसेच बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. फळबाग लागवड हा शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न देणारा पर्याय आहे. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर फळबाग लागवडीसाठी प्रयत्न करावेत. गावोगावी होणाऱ्या शेती शाळांमध्ये याबाबत माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व गरीब गरजवंत व सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा. यामध्ये कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. घरकुलाचे काम प्राधान्याने पूर्ण करुन गरजवंताना लाभ मिळवून द्यावा. घरकुलासाठी तलाठ्यामार्फत अर्ज घेऊन लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करुन द्यावी. सर्व निराधार योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासह विविध योजनांचे लाभ गावात शिबीरे घेऊन लाभार्थ्यांना वेळेत मिळवून द्यावेत. जिल्ह्यात सतत वीज खंडित होणे, वीज जोडणी, ट्रान्सफर, वीज उपकेंद्र निर्मिती ही सर्व कामे वेळेत झाली पाहिजेत. पाणंद रस्त्याच्या कामाच्या तक्रारी आहेत. चालू असलेले व पूर्ण झालेल्या कामाची चौकशी करावी. राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावेत. जलजीवन मिशनचे काम तातडीने पूर्ण करुन जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये पाणी पुरवठा सुरु करावा. सर्व अभियंत्याची बैठक घेऊन प्रत्येक गावात आहे त्या परिस्थितीत पाणी पुरवठा सुरु करण्याबाबत कार्यवाही करावी. ज्या गावात जलजीवन मिशनच्या कामाची तक्रारी आहेत. तसेच पूर्ण झालेल्या गावातील कामाची चौकशी करावी. जल जीवन मिशनच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कार्यवाही करून ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या निधीचा योग्य वापर होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी नियोजनबद्ध काम करावे, असे त्यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी यंत्रसामुग्रीसाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून द्यावा. तसेच जिल्ह्यात कर्करोगावरील उपचारासाठी आवश्यक सुविधा निर्माण करावी. यासाठी लागणारे मनुष्यबळ व आवश्यक साधनसामुग्रीसाठी प्रस्ताव द्यावा. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. खासदार पाटील यांनी यावेळी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, पंडीत दीनदयाल उपाध्याय वीज सवलत योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना, फळबाग लागवड योजना, कांदा चाळ योजना, मृद व स्वास्थ्य कार्ड योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, ई-नाम योजना, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन, समग्र शिक्षा अभियान यासह विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी समिती सदस्यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्न व अडचणी मांडल्या. यावर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न, अडचणी, तक्रारी व कामाचे तातडीने निराकरण करुन तात्काळ मार्गी लावावेत, अशा सूचना सर्व यंत्रणेला दिल्या. जिल्ह्यातील महिलांचे कर्करोगाची लक्षणे जाणून घेण्यासाठी जिल्ह्यात संजीवनी अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानात संशयित आढळून आले आहेत. यावर त्यांच्यावर पुढील तपासणी व उपचाराची कार्यवाही सुरु आहे. जल जीवन मिशनच्या कामांचा आढावा घेऊन त्यांना कामे लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यातील वीज, पाणी, आरोग्य यासह विविध यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले. प्रारंभी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी सादरीकरणाद्वारे केंद्र शासनाच्या विविध योजनेच्या सद्यस्थितीची माहिती दिली. तसेच त्यांनी शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले. ******

No comments: