04 September, 2026

पावसाच्या खंडाने पिकांवर ताण; जिल्हाधिकाऱ्यांची शेतावर जाऊन पाहणी

वडद व बोंडाळा येथे शेतावर जाऊन सोयाबीन, कापूस पिकांची घेतली सद्यस्थितीची माहिती

उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व कार्यक्षमतेने वापर करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन

हिंगोली, दि. 4 (जिमाका) : ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेल्या ओढीमुळे व अल निनोच्या प्रभावामुळे हिंगोली तालुक्यातील पिकांवर पाण्याचा ताण निर्माण झाला आहे. विशेषतः सोयाबीन व कापूस पिकांवर त्याचा परिणाम जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोली तालुक्यातील वडद व बोंडाळा येथे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी केली. पिकांची सद्यस्थिती, पावसाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची त्यांनी यावेळी माहिती घेतली.


वडद येथे शेतकऱ्यांच्या शेतावर सोयाबीन व कापूस पिकांची पाहणी करताना पावसाच्या खंडामुळे पिकांवर आलेला ताण जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिला. काही ठिकाणी पाण्याअभावी सोयाबीन व कापूस पिके सुकण्यास सुरुवात झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांची अवस्था, उपलब्ध सिंचनाची साधने, जमिनीतील ओलावा आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पिकांची माहिती जाणून घेतली. पावसाचा खंड लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.


दरम्यान, बोंडाळा येथे ‘कापूस उत्पादकता अभियान’ अर्थात ‘कापूस क्रांती’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘क्लोजर लागवड पद्धती’च्या प्रात्यक्षिक प्लॉटचीही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पाहणी केली. या लागवड पद्धतीमुळे कापूस पिकातील उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली. आधुनिक व शास्त्रोक्त लागवड तंत्रज्ञानाचा वापर, पिकांचे योग्य व्यवस्थापन तसेच उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली.


पावसाचा खंड हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय असला तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध आणि कार्यक्षम वापर करावा. पिकांची सद्यस्थिती लक्षात घेऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. पिकांवरील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी उपलब्ध जलस्रोतांचा योग्य पद्धतीने वापर आणि पीक व्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर भर देण्याचे त्यांनी सांगितले.



कृषी विभागाने पावसाच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून शेतकऱ्यांना वेळोवेळी आवश्यक सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, यावरही यावेळी भर देण्यात आला. या पाहणी दौऱ्यावेळी कृषी उपसंचालक प्रसाद हजारे, तालुका कृषी अधिकारी शिवसंदीप रणखांब यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

*****************

No comments: