30 January, 2025
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी जागरुक राहण्याची गरज - मराठी भाषेचा अभिजात दर्जा आणि संवर्धन या विषयावरील व्याख्यानात वक्त्यांचा सूर
हिंगोली (जिमाका), दि. 30 : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी जागरुक राहून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्याख्यानातून व्यक्त केले.
येथील कै. रं. रा. बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात हिंगोली ग्रंथोत्सव-2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अशोक अर्धापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेचा अभिजात दर्जा आणि संवर्धन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. विलास खरात म्हणाले, माणसाला प्रत्येक भाषा अवगत झाली पाहिजे, असे सांगून मराठी भाषा ही समृध्द आणि श्रीमंत आहे. त्यामध्ये अनेक शब्दसंग्रह आहेत. मराठी भाषा ही विविध अलंकारांनी नटलेली आहे. मराठी भाषेला नुकताच केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला आहे. यांत्रिकीकरणाच्या युगात मराठी भाषेतील अनेक शब्द लुप्त होत चालले आहेत. त्यामुळे भाषेचे संवर्धन व जतन होणे गरजेचे आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रा. डॉ. शत्रुघ्न जाधव यांनी मराठी भाषेला पूर्वेतिहास आहे. आपल्या पूर्वजांनी मराठी भाषेचे संवर्धन करुन ठेवले आहे. काही दिवसापूर्वीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या दर्जामुळे शासन, प्रशासन यांनी भाषेची धोरणात्मक उपक्रम राबविण्यासाठी व या भाषेच्या उत्थानासाठी दर्जा दिला आहे. सध्या इंग्रजी शाळेत मुलांना शिक्षणासाठी पाठविण्यात येत आहे. त्यामुळे नागरी आणि शहरी भागात मराठी भाषेची भिती निर्माण झाली आहे. मराठी भाषा ही श्रीमंत आणि संपन्न आहे. आपल्या घरात नेहमी मराठी भाषा बोलली पाहिजे. मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात अशोक अर्धापूरकर यांनी मराठी भाषा ही अगोदरपासूनच वैभवशाली भाषा आहे. मराठी भाषा ही पूर्वीपासून चालत आलेली आहे. या भाषेचे मूळ रुप शोधण्याची गरज आहे. भाषा शुध्दीकरणाचे प्रयोग चालू असले पाहिजेत. मराठी भाषेपासून भरकटत चाललेल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मराठी भाषेच्या सर्वंधनासाठी सर्वांनी जागरुक राहण्याची गरज असल्याचे सांगितले.
या व्याख्यानाचे सूत्रसंचालन कल्याण वसेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. जी. पी. मुपकलवार यांनी केले. या व्याख्यानास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment