07 January, 2025
दर्जेदार आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यावर भर द्या - जिल्हाधिकारी अभिनव गोयल
• जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा
हिंगोली, जिमाका (दि.7) : जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णाला तातडीची आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यावर जि्लहा आरोग्य यंत्रणेने भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांना आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील देशमुख, प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गोपाल कदम यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. आरोग्य संस्थेत नियुक्त वैद्यकिय अधिकारी २४ तास कर्तव्यावर असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प उपक्रमात सहभागी करून घेण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा अधिक दर्जेदार, आणि उत्तम आरोग्यविषयक सोयीसुविधा, वेळेत औषधोपचार मिळावेत. रुग्णांसाठी अत्यावश्यक आरोग्य साहित्य ठेवावे, तसेच स्वच्छता व इतर निकष पूर्ण करून सर्व आरोग्य केंद्रांना पारितोषिक मिळेल, याकडे लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी दिल्या.
एनकॉसमध्ये निवडलेल्या संस्थाचाही आढावा घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढले पाहिजे. महिलांची हेळसांड होणार नाही याकडे स्थानिक डॉक्टर व कर्मचारी यांनी लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या. माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत गरोदर माता व बालक यांची आरसीएच पोर्टलवर १०० टक्के नोंदणी करणे, जोखमीच्या गरोदर माता यांचा पाठपुरावा करून आवश्यक सेवा सुविधा देणे, तीव्र रक्तक्षय असलेल्या गरोदर मातांचे अपडेशन करणे, त्याचबरोबर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील शस्त्रक्रिया गृह चालू करून घ्यावे व पुढील दोन महिन्यात कुटूंब कल्याणचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या
एनसीडीअंतर्गत उच्च रक्तदाब व मधुमेह रुग्णांची पोर्टलवर नोंदणी करून त्यांची १०० टक्के तपासणी करून निदान झालेल्या रुग्णांना उपचाराखाली आणावे. क्षयरोग मुक्त टी कार्यक्रमांतर्गत रुग्णांची तात्काळ तपासणी करून
नियमित लसीकरणातील गळती कमी करण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या. तसेच आरसीएच पोर्टलवर रियल टाईम डाटा 100 टक्के अद्यावत करावा. माता मृत्यू नोंदणी अद्यावत करून मृत्यूची कारणे शोधणे, माता मृत्यूदर, बाल मृत्यूदर कमी करणे, यासह रुग्णांच्या आरोग्याच्या विविध तपासणी करण्यावर भर देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
रुग्णांची आभा कार्ड काढण्याची संख्या वाढवावी. बालस्वास्थ कार्यक्रमात सर्व बालकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या पाहिजेत. ग्रामीण भागातून आलेल्या नेत्ररुग्णांवर ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व शासकिय रुग्णालयात शस्त्रक्रिया व्हाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
आरोग्य यंत्रणेने चांगले काम करून रुग्णांना आरोग्य सेवा दिल्यास जिल्ह्यातील आरोग्य संस्थाच्या बळकटीकरणासाठी जिल्हा नियोजनमधून जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
या बैठकीला सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, डॉ. मंगेश टेहरे,डॉ. शैलेजा कुपास्वामी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, डॉ. सुवर्णा महाले, डॉ. प्रकाश जाधव यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment