24 January, 2025

खानापूर (चित्ता) येथे बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृती.

हिंगोली (जिमाका), दि. 24 : येथील शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने खानापूर चित्ता येथील जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय सेवा योजना शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत दि. 23 जानेवारी रोजी बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 विषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनो महिला सबलीकरण व बाल विवाह एक समस्या या विषयावर व्याख्यान देताना एक सक्षम महिला म्हणजे काय, दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका पाडतांना महिला ह्या समाजाच्या आधारस्तंभ बनले आहेत. कधी प्रेमळ कन्या तर कधी वात्सल्यपूर्ण माता तर कधी सक्षम सहचारिणी अशी विविध नाती अत्यंत कुशलतेने आणि कोमलतेने त्या निभावत आहेत. महिलाही आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सबल होत असतांना आपल्याला दिसत आहे. परंतु सामाजिक असमानता, कौटुंबिक हिंसा, अत्याचार आणि आर्थिक परावलंबीत्व यातून स्त्रियांची सुटका होण्यासाठी महिला सबलीकरणाची गरज आहे. याची खात्री महिलांनी बाळगणे गरजेचे आहे. मी स्त्री आहे, अबला आहे असा विचारसुध्दा करु नका या आंतरिक असमानतेमुळे काहीही घडणार नाही. तुमचे अधिकार प्राप्त तुमच्यामध्ये सामर्थ्य असणे गरजेचे आहे. महिला सबलीकरण ही काळाजी गरज आहे. सबल महिलेतूनच समाज सक्षम होत आहे. त्याच बरोबर बाल विवाह म्हणजे काय, बालविवाहाची कारणे, दुष्परिणाम व प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार मुलीच्या वयाची 18 वर्ष व मुलाच्या वयाची 21 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे, असे विवाह बेकायदा ठरतात आणि अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीकरिता ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीचे अध्यक्ष सरपंच व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. या सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाहीत, याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही श्रीमती कोरडे यांनी यावेळी सांगितली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, बालक म्हणजे काय व बालकांकरीता तात्काळ मदत करणारी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 या टोलफ्री क्रमांकावर माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता याची गोपनीयता राखली जाते. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बालविवाह होणार असल्याबाबतची माहिती मिळताच चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर माहिती द्यावी. बालकांसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय यंत्रणेबाबत व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत विविध योजनांची माहिती देखील यावेळी देण्यात आली. बालकांसंदर्भात कायदे व हक्क, चाईल्ड हेल्पलाईन 1098, दत्तक विधान व अनाथ प्रमाणपत्राबाबतची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) श्री. जरीबखान पठाण यांनी दिली, यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बालविवाह जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांकडून व गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीकडून बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेची शपथ घेतली. या कार्यक्रमासाठी शिवाजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. किशोर इंगोले, प्रा.डॉ. सुनिल कांबळे व महाविद्यालयाचे प्रा. संजय चव्हाण, प्रा. आशिष इंगळे, विद्यार्थी प्रतिनिधी विनायक जाधव व सर्व स्वयंसेवक, चाईल्ड हेल्पलाईनचे सुपर वायझर श्रीकांत वाघमारे व केस वर्कर तथागत इंगळे, शाळेतील विद्यार्थी, किशोरवयीन मुले-मुली व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. ******

No comments: