07 August, 2026

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करा

 


जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांनी अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 7 : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात दि. 9 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करून नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या आहेत.

‘हर घर तिरंगा’ अभियान तसेच ‘वंदे मातरम्’ या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व विभाग, कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये आणि संबंधित यंत्रणांनी अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा.

 

विविध उपक्रमांचे आयोजन

‘विभाजन विभीषिका स्मृतिदिन’ निमित्त राज्यस्तरीय कार्यक्रम व नाट्य आयोजन, प्रदर्शन, शॉर्ट फिल्म तसेच शाळा-महाविद्यालयीन स्तरावर परिसंवाद व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच शाळा व महाविद्यालयीन स्तरावर ‘MyGov’ पोर्टलवरील ‘प्रभातफेरी’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

‘वंदे मातरम्’ या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार कार्यक्रम, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत प्रदर्शन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

तिरंगा ई-बाईक रॅली व तिरंगा रॅली

 

अभियानांतर्गत तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंगा रॅली तसेच ‘सेल्फी विथ तिरंगा’ यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होऊन तिरंग्यासोबतचे सेल्फी https://harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, महानगरपालिका, जिल्हा परिषद, शाळा-महाविद्यालये तसेच विविध संस्थांनी अभियानातील उपक्रमांचे नियोजन करून ते यशस्वीपणे राबवावेत. अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासोबतच स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात जनसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

अभियानासंदर्भात अधिक माहितीसाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या स्तरावर संपर्काची व्यवस्था करण्यात आली असून, स्वयंसेवक नोंदणी, सेल्फी अपलोड तसेच अभियानाशी संबंधित सविस्तर माहितीसाठी https://harghartiranga.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.

 

*******

मराठी भाषा विभागासह अधिनस्त कार्यालयांची सात संकेतस्थळे नव्या स्वरूपात कार्यान्वित

 

 नागरिक, संशोधक, विद्यार्थी व साहित्यप्रेमींनी नव्या संकेतस्थळांचा लाभ घ्यावा

 

हिंगोली (जिमाका), दि. 7 : मराठी भाषा विभाग तसेच विभागाच्या अधिनस्त कार्यालयांची एकूण सात संकेतस्थळे महाराष्ट्र शासनाच्या मानक डोमेन संरचनेनुसार नव्या स्वरूपात कार्यान्वित करण्यात आली आहेत. नागरिक, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या नव्या संकेतस्थळांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन मराठी भाषा विभागाने केले आहे.

मराठी भाषा विभाग तसेच विभागाच्या अधिनस्त भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या एकूण सात संकेतस्थळांच्या हस्तांतरणाची कार्यवाही महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित यंत्रणेमार्फत करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या मानक डोमेन संरचनेनुसार संकेतस्थळांसाठी नवीन डोमेन निश्चित करण्यात आले आहेत.

संकेतस्थळांच्या हस्तांतरणाच्या तांत्रिक प्रक्रियेदरम्यान आवश्यक प्रणालीगत बदल करण्यात येत असल्यामुळे संबंधित संकेतस्थळे काही कालावधीसाठी तात्पुरती अनुपलब्ध होती. आता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व सात संकेतस्थळे नव्या स्वरूपात नियमितपणे कार्यान्वित करण्यात आली आहेत.

नवीन संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे :

1. मराठी भाषा विभाग – https://marathi.maharashtra.gov.in

2. भाषा संचालनालय – https://directorate-marathi.maharashtra.gov.in

3. राज्य मराठी विकास संस्था – https://rmvs-marathi.maharashtra.gov.in

4. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ – https://sahitya-marathi.maharashtra.gov.in

5. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ – https://marathivishwakosh.maharashtra.gov.in

6. विश्वकोश प्रथमावृत्ती (खंड 1 ते 20) – https://vishwakosh-marathi.maharashtra.gov.in

7. मराठी परिभाषा कोश – https://shabdakosh-marathi.maharashtra.gov.in

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, विश्वकोश, परिभाषा तसेच विविध संदर्भसाहित्याशी संबंधित माहिती नागरिकांना अधिक सुलभ व एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी ही संकेतस्थळे उपयुक्त ठरणार आहेत. या संकेतस्थळांद्वारे नागरिकांना विविध शासकीय माहिती, संदर्भसाहित्य आणि मराठी भाषेशी संबंधित विविध उपयुक्त सामग्री सहज उपलब्ध होणार आहे.

सर्व नागरिक, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच संबंधितांनी नव्या संकेतस्थळांची नोंद घेऊन त्यांचा अधिकाधिक उपयोग करावा, असे आवाहन मराठी भाषा विभागाने केले आहे.

******

इमाव, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

 



हिंगोली (जिमाका), दि. 7 : इतर मागासवर्ग (इमाव), विमुक्त जाती-भटक्या जमाती (विजाभज) व विशेष मागास प्रवर्गातील (विमाप्र) विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत इयत्ता बारावीनंतर व्यावसायिक तसेच अव्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जातो. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

राज्यातील इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत रिक्त असलेल्या जागांवर व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. प्राप्त अर्जांची छाननी दि. 1 सप्टेंबर 2026 ते 7 सप्टेंबर 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेश प्रणाली या ऑनलाइन पोर्टलवर दि. 7 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत अर्ज भरावा. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट तसेच आवश्यक कागदपत्रे संबंधित शासकीय वसतिगृहात विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, हिंगोलीचे सहाय्यक संचालक प्रदीप धर्माधिकारी यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी गृहपाल, मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली यांच्याशी संपर्क साधावा.

 

*******

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर विशेष मुलाखत

 



हिंगोली(जिमाका), दि. ७: राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ संदर्भातील सविस्तर माहिती देणारी सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांची विशेष मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांमधून प्रसारित होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार,  ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित होईल.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत  १२ ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत (रविवार, दि. १६ ऑगस्ट वगळून) दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही ही मुलाखत ऐकता येणार आहे.

या मुलाखतीचे सूत्रसंचालन पूनम चांदोरकर यांनी केले आहे. 

*******

06 August, 2026

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शासकीय इमारतींचे रेट्रोफिटिंग करण्यावर भर , सीबीआरआयच्या तज्ज्ञांकडून अधिकारी, अभियंत्यांना कार्यशाळेत मार्गदर्शन

 


हिंगोली (जिमाका), दि. 6 : जिल्ह्यात वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने केंद्रीय इमारत संशोधन संस्था, रुडकी, उत्तराखंड आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त विद्यमाने अधिकारी व अभियंत्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, केंद्रीय इमारत संशोधन संस्थेचे मुख्य वरिष्ठ वैज्ञानिक अजय चौरसीया तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश जोशी, उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, जिल्ह्यात भूकंपाच्या घटना घडत असल्याने भविष्यात होणारी संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. जुन्या इमारतींचे बळकटीकरण, भूकंपरोधक इमारतींची उभारणी तसेच रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून विद्यमान इमारती अधिक सुरक्षित करण्याबाबत या कार्यशाळेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

भूकंपग्रस्त गावांचा केंद्रीय इमारत संशोधन संस्थेमार्फत सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार शासकीय इमारतींचे रेट्रोफिटिंग करण्यात येणार आहे. या कामाचे प्रात्यक्षिक वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीचे रेट्रोफिटिंग करून दाखविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.

नागरिकांनीही भूकंपरोधक बांधकामाचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून विद्यमान घरांची सुरक्षितता वाढविता येते. या तंत्रज्ञानामुळे भूकंपाच्या वेळी जीवितहानी टाळण्यास मोठी मदत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार माफक खर्चात आपल्या घरांचे रेट्रोफिटिंग करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

कार्यशाळेत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी कमी खर्चात घर अधिक सुरक्षित कसे करता येईल, याबाबत व्हिडिओ व सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. भूकंपरोधक इमारतींची उभारणी, विद्यमान इमारतींचे रेट्रोफिटिंग, त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, बांधकाम साहित्याचे योग्य प्रमाण आणि वापरण्याची पद्धत याबाबत सीबीआरआयचे तज्ज्ञ वरिष्ठ वैज्ञानिक अजय चौरसिया यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

भूकंपप्रवण भागातील इमारतींची सुरक्षितता वाढविण्यासाठी अभियांत्रिकीच्या शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करणे, जुन्या इमारतींची तपासणी करणे आणि आवश्यकतेनुसार त्यांचे संरचनात्मक बळकटीकरण करणे या बाबींवरही कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला.

कार्यशाळेस जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, अभियंते तसेच संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******* 







मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर अभियानाला हिंगोली जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद




हिंगोली(जिमाका), दि. ६ : जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर अभियानाला जिल्हाभरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अभियानाच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण ११ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये १ हजार ९२८ नागरिकांनी आरोग्य तपासणी, तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला तसेच आवश्यक उपचारांचा लाभ घेतला.

नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांमध्ये विविध आजारांची तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, आवश्यक औषधोपचार, समुपदेशन तसेच पुढील उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सेवा सुलभपणे उपलब्ध झाल्या.

दरम्यान, सुरक्षित रक्तसाठा उपलब्ध राहावा तसेच नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने अभियानांतर्गत ३ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये १४२ स्वेच्छा रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय अधिकारी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाशी संलग्न रुग्णालये, आरोग्य कर्मचारी, रक्तपेढ्या, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच स्वेच्छा रक्तदाते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत भविष्यातही अशा लोकाभिमुख आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याकडून सांगण्यात आले.

*******

समुदाय आधारित संस्थांच्या महिला संचालक मंडळासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

 

हिंगोली (जिमाका), दि. ६ : स्मार्ट प्रकल्पांतर्गत टीएसए (Palladium) यांच्या माध्यमातून समुदाय आधारित संस्थांच्या महिला संचालक मंडळासाठी जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांच्या प्रशिक्षण सहभागृहात करण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा प्रदीप कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेची प्रस्तावना जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्टचे नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड यांनी केली.

या कार्यशाळेत समुदाय आधारित संस्थांच्या महिला संचालक मंडळांना व्यवस्थापन कौशल्य विकास या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. विभागीय अंमलबजावणी कक्ष स्मार्ट, लातूरचे कृषी व्यवसाय सहयोगी मंगेश लाभांडे यांनी व्यवस्थापन कौशल्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच अन्न सुरक्षा विषयावर विभागीय अंमलबजावणी कक्ष स्मार्ट, लातूरचे अन्न सुरक्षा अधिकारी सचिन कच्छवे यांनी मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील विविध समुदाय आधारित संस्थांच्या महिला संचालक मंडळाच्या सदस्यांनी सहभाग घेतला. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी बाळासाहेब झिंजाडे, जिल्हा समन्वयक गजानन खिरोडकर यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी व समुदाय आधारित संस्थांचे संचालक उपस्थित होते.

महिला संचालक मंडळाच्या माध्यमातून समुदाय आधारित संस्थांचे प्रभावी व्यवस्थापन, संस्थात्मक क्षमता वाढविणे, व्यवसायवृद्धी तसेच मूल्यसाखळीच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा उपयुक्त ठरली.

कार्यशाळेच्या समारोपावेळी पुरवठा व मूल्यसाखळी तज्ज्ञ तथा कृषी व्यवसाय सल्लागार जी. एच. कच्छवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*******