20 March, 2025
ग्राहकांनी नेहमी सजग व जागरुक राहण्याची गरज - जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली (जिमाका), दि. 20 : प्रत्येक क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे नागरिकांनी नेहमी सजग व जागरुक राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहकांमध्ये जागृती आणण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जागतिक ग्राहक दिनाचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेंद्र अग्रवाल, ग्राहक तक्रार निवारण समितीचे सदस्य आर. व्ही. धबडे, मानवाधिकार संरक्षण समितीचे अध्यक्ष एम. एम. राऊत, सनदी लेखापाल महेश बियाणी, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, ग्राहकांमध्ये जनजागृती होण्यासाठी दरवर्षी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. त्यामुळे नागरिकांनी प्रत्येक उत्पादनाची गुणवत्ता तपासून खरेदी करावी. सेवा पुरवणाऱ्या संस्थांकडून योग्य सेवा पुरवल्या जात नाहीत. नागरिकांनी वस्तू खरेदी केल्यानंतर पक्के बिल घ्यावे. तसे केल्यास शासनाकडे महसूल जमा होतो. त्यामुळे विविध सेवा, योजना पुरविताना शासनाकडून चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा पुरवल्या जाऊ शकतात. त्यासाठी दरमहा शाळेमध्ये सायबर सह विविध विषयावर कार्यशाळा घेण्यासाठी नियोजन करुन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी केंद्र शासनाने जनतेची गा-हाणी (पब्लिक ग्रिव्हान्सेस) पोर्टल आणि राज्य शासनाने आपले सरकार पोर्टलची निर्मिती केली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारची तक्रार असेल तर पोर्टलवर करावी. त्याचे वेळीच निराकरण करण्यात येईल, असे सांगितले.
सायबर सुरक्षा विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांनी ऑनलाईन खरेदी करताना, कर्ज घेतांना तसेच फेसबूक, इन्स्टाग्रामचा दुरुपयोग करुन फसवणूक होत आहेत. त्यामुळे समाज माध्यमाचा वापर काळजीपूर्वक करावा. सायबर फसवणुकीत होणारे धोके सद्यस्थितीत गुंतागुंतीचे आहेत. त्यामुळे सद्सदद्विवेकबुद्धीचा वापर करावा. आमिषांपासून दूर राहावे. पासवर्ड मजबूत ठेवावे. विनाकारण कोणत्याही साईट्स शोधू नये, अनोळखी कॉल्सपासून सावध राहावे. सायबर चोरांनी आर्थिक फसवणूक केल्यास १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन केले. तसेच सायबर फसवणूक होत असल्याचे आपल्या लक्षात येताच जवळच्या सायबर शाखेशी किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे सांगितले.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य श्री. आर. व्ही. धबडे यांनी बोलताना म्हणाले, शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी व ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग स्थापन केले आहे. दैनंदिन जीवनाशी हा कायदा सुसंगत असून याची जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगून आपली फसवणूक झाल्यास, वस्तू व सेवा देण्यात त्रुटी आढळून आल्यास आपणाकडे असलेल्या पक्क्या बिलासह जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार द्यावी, त्याचे वेळीच निराकरण करण्यात येईल, असे सांगितले.
सनदी लेखापाल महेश बियाणी यांनी शासनाने जुनी पेन्शन बंद करुन एनपीएस प्रणाली लागू केली. या एनपीएस प्रणालीबाबत सविस्तर माहिती दिली.
ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश अग्रवाल यांनी ग्राहकांची पिळवणूक थांबविण्यासाठी ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदू माधव जोशी यांच्या अथक प्रयत्नातून ग्राहक तक्रार निवारण कायदा अस्तित्वात आला आहे. त्या कायद्यामध्ये असलेल्या सहा अधिकार सांगून कायद्याचे महत्त्व विशद केले. तसेच ग्राहकांनी खरेदी करतांना उत्पादने गुणवत्तापूर्ण असल्याची खात्री करुनच खरेदी करावेत, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विजय निलावार यांनी केले व शेवटी जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील सर्व उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन व ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदु माधव जोशी आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment