09 March, 2025

कर्करोगाची लक्षणे असलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करावे-जिल्हाधिकारी अभिनव गोयल

* जिल्ह्यात जागतिक महिला दिनी संजीवनी अभियानाला सुरुवात हिंगोली(जिमाका), दि. ०९: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. याचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात 20 मार्चपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात आशामार्फत घरोघरी जाऊन कर्क रोगाची लक्षणे असलेल्या महिलांचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी संजीवनी अभियानाच्या जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात नव संजीवनी अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जळगाव येथील कर्करोग तज्ञ डॉ.निलेश चांडक,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील देशमुख, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग फोपसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. शैलेजा कुप्पास्वामी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. गोयल पुढे बोलताना म्हणाले, संजीवनी अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी आशांना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रश्नावली कशी भरावी याची माहिती द्यावी. प्रशिक्षणानंतर सर्व आशांनी घरोघरी जाऊन ३० वर्षावरील महिलांचे सर्वेक्षण करावे. कर्करोगाची लक्षणे असलेल्या संशयित महिलांची व्हीआयए आणि सीबीई टेस्ट करावी. अशा रुग्णांची यादी तयार करावी. कर्करोगाचे निदान झालेल्या महिलांचे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेतून उपचार करण्यासाठी मदत करावी किंवा कर्करोगाची निदान करण्याची सुविधा उपलब्ध असलेल्या संभाजीनगर किंवा नांदेड येथील रुग्णालयाकडे संदर्भित करावे. तसेच प्राथमिक स्तरावर असलेल्या बाधित महिलांना आपल्या स्तरावर उपचार करावेत आणि ही मोहीम यशस्वी करावी. तसेच नुसार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक त्या सुविधा अद्यावत राहावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी कर्करोग तज्ञ डॉ. निलेश चांडक यांनी कर्करोगाची निदान त्वरित करणे गरजेचे असल्याचे सांगून ते कसे करावेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात सेनगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सतीश रुणवाल यांनी जिल्हाधिकारी अभिनव गोयल व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या संकल्पनेतून आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आजपासून हिंगोली जिल्ह्यात संजीवनी अभियान राबविण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील 30 वर्षावरील सर्व महिलांची कर्करोगाबाबत आशा स्वयंसेविकामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात आढळलेल्या संशयित महिलांची डॉक्टरकडून तपासणी करण्यात येणार आहे. ज्या महिलांची कर्करोग निदान चाचणी करणे आवश्यक आहे, अशा महिलांची यादी उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी तयार करण्यात येणार असून या संशयित महिलाची स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर यांच्या देखरेखीखाली विशेष आरोग्य शिबिराच्या आयोजन ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय या ठिकाणी करून निदान करण्यात येणार आहे. तसेच निदान झालेल्या रुग्णांना उपचारासाठी संदर्भीत करून पाठपुरावा केला जाणार आहे. सर्व रुग्णांची नोंद एनसीडी पोर्टलवर घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. संदीप काळे, डॉ. डी. व्ही. सावंत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गंगाधर काळे, स्त्री रुग्णालयाच्या डॉ. अरुणा दहिफळे, डॉ. सचिन राठोड, डॉ. कल्पना सूनतकरी, डॉ. बालाजी भाकरे, डॉ. फजल खान, डॉ. प्रशांत पुठावार, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, कुलदीप केळकर, सचिन करेवार, आनंद साळवे व तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित होते. ******

No comments: