12 March, 2025

पाणलोट व वृक्ष लागवड चळवळ काळाची गरज- जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली, (जिमाका), दि.12: जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी गावाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार पाणलोट उपचार पध्दतीचा अवलंब करून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये मुरवला पाहिजे. यासाठी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्राची कामे करावीत. तसेच गावांच्या लोकसंख्येनुसार ग्रामस्थांनी प्रती व्यक्ती दोन झाडे लावावीत. पाणलोट विकास चळवळ व वृक्ष लावगड करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणावर अभियान राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी केले. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत पाणलोटविषयक कामाचे महत्त्व विशद करून या कामात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी जनजागृती व प्रसिध्दी करण्यासाठी मंगळवारी सेनगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे केंद्र शासनामार्फत वॉटरशेड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेला जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. त्यावेळी श्री. गोयल बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रफुल खिराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम म्हणाले की, भविष्यामध्ये केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना दिला जाणारा लाभ हा शेतकरी ओळखपत्र असल्याशिवाय मिळू शकणार नाही. यासाठी गावातील 100 टक्के शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र तयार करून घ्यावीत, असे आवाहन केले. कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. पी. पी. शेळके यांनी शेतकऱ्यांनी जमिनीची माती तपासणी करून घ्यावी. यामुळे जमिनीला कोणत्या घटकाची आवश्यकता आहे याची माहिती मिळू शकेल व त्यानुसार पीक पध्दतीमध्ये बदल करता येईल, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेनगावचे तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे यांनी केले. या वॉटरशेड यात्रेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व वॉटरशेड सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच गावामध्ये पाणलोट क्षेत्रात काम करणाऱ्या जलयोध्दा व धारिणीताई यांनाही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणत्राचे वितरण करण्यात आले . ग्रामस्थांना पाणलोट विषय कामाची माहिती मिळण्यासाठी केंद्र शासनाने पाठविलेल्या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून पाणलोटविषयक चित्रफित दाखविण्यात आली तसेच ग्रामस्थांना मृद व जलसंवर्धनाची कामे करावी, यासाठी मृद व जलसंवर्धनाची शपथ दिली. ‘पाणी की पाठशाला’मध्ये पाणलोटावर शाहीर धम्मानंद इंगोले यांनी विविध गिते व पथनाट्य सादर केले. शाळेतील मुलांनी पाणलोटावर पथनाट्याचे सादरीकरणे केले. तसेच गावातील महिलांनी पारंपारिक वेषभूषेत गिताच्या माध्यमातून लोककलेचे सादरीकरण केले. यावेळी मान्यवारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व कार्यक्रमाच्या औचित्याने पाणलोट क्षेत्राशी संबंधित काही नवीन कामाचे भूमीपूजन व पूर्ण झालेल्या कामाची पाहणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार मुरलीधर राठोड यांनी मानले. कार्यक्रमाला महंत नेहरू महाराज (पोहरादेवी तीर्थक्षेत्र), सरपंच कविता चव्हाण, उपसरपंच विलास ससेदे, उपविभागीय कृषि अधिकारी प्रदीप कच्छवे, गट विकास अधिकारी सेनगाव, जलसंधारण अधिकारी विशाल चव्हाण, जलसंधारण अधिकारी विठ्ठल काळबांडे, जलसंधारण अधिकारी श्री. बारहत्ते कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, पाणलोट विकास पथक सदस्य व कृषि विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. ******

No comments: