20 March, 2025
महिला व बाल विकास विभागाची मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनाच नाही, नागरिकांनी फसव्या जाहिरातींना बळी न पडण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 20 : सध्या समाज माध्यमावर 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजने'च्या नावाने संदेश प्रसारित केले जात आहे. महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अस्तित्वात नाही. ही फसवी जाहिरात असून नागरिकांनी समाज माध्यमावर येणाऱ्या अशा फसव्या पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
दि. 1 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे आणि त्या बालकाचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील दोन मुलांना बाल सेवा अंतर्गत दरमहा 4 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचे अर्ज तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध करण्यात आल्याचे चुकीचे मेसेज व्हायरल होत आहे. अनाथ किंवा एकल पालक बालकांसाठी महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कार्यालय एस. 7, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांनी कोणत्याही फसव्या संदेशांना बळी पडू नये व आर्थिक व्यवहार करु नयेत. तसेच अनाथ किंवा एकल पालक बालकांसाठी महिला व बाल विकास विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनाकरीता कार्यालयांमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment