07 September, 2026

सण, उत्सव शांततेत साजरे करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्वच्छता व सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्या

 सण, उत्सव शांततेत साजरे करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्वच्छता व सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्या

हिंगोली, दि. 7 (जिमाका) : जिल्ह्यात सण, उत्सव साजरे करताना सामाजिक सलोखा, शांतता आणि स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-2026 मध्ये सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांनी परिसराच्या स्वच्छतेसह विविध सामाजिक व विधायक उपक्रमांचे प्रभावीपणे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

गणेश मंडळांनी शासनाच्या पोर्टलवर आवश्यक नोंदणी करूनच गणेशोत्सवाचे आयोजन करावे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, नियमित विद्युत पुरवठा, नालेसफाई तसेच नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात गणेशोत्सव व आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा,  निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, सर्व तालुक्यांतील पोलीस अधिकारी, शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.




नियमांचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करा – मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड

गणेश मंडळांनी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून शांततेत व उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा. मंडळाची अधिकृत नोंदणी करून अधिकृत वीज जोडणी घ्यावी. विद्युत रोषणाईसाठी आवश्यक प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. तसेच आग प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. गणेश विसर्जन व मिरवणुकीतील वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तपासणी तसेच वाहनचालकांची आरोग्य तपासणी करून त्याबाबतची आवश्यक माहिती पोलीस विभागाला द्यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची मंडळांनी दक्षता घ्यावी. मिरवणुका शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडाव्यात. मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच आवश्यक प्रमाणपत्रांची माहिती पोलीस विभागाला उपलब्ध करून द्यावी. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती तसेच रस्त्यांवरील विद्युत दिवे सुरू राहतील, याबाबत संबंधित यंत्रणांकडून दक्षता घेतली जाईल, असेही श्री.गायकवाड म्हणाले.

डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करा – पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा

जिल्ह्यात यावर्षी एक हजार 489 गणेश मंडळांची स्थापना होणार असून, अनेक गावांमध्ये पोळा सण साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व धर्मीयांमध्ये एकोपा व सामाजिक सलोखा कायम ठेवत सण, उत्सव उत्साहात आणि शांततेत साजरे करावेत, असे पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी सांगितले.




गणेशोत्सव हा लोकसंस्कृती व परंपरांचे जतन करणारा उत्सव आहे. त्यामुळे निसर्गाची व पर्यावरणाची हानी होणार नाही, तसेच सामाजिक सलोख्याला बाधा येणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य द्यावे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशांसह शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस अधीक्षक श्री. लोढा यांनी दिला.

सण, उत्सवांच्या काळात गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सांस्कृतिक नेतृत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे सामाजिक शांतता, पर्यावरण आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन होईल, यासाठी सर्वांनी जबाबदारीने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.


यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जेष्ठ पत्रकार नंदकुमार तोष्णीवाल, डॉ.सतीश पाचपुते, मधुकर मांजरमकर आदींनी त्यांच्या भावना मांडल्या. गणेश समितीच्या  मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आदींच्या अडचणी, समस्या यावेळी जाणून घेतल्या.

00000

No comments: