19 February, 2025

विशेष लेख : माझ्या मराठीची बोलू कौतुके....

येत्या 21 ते 23 फेब्रुवारी रोजी देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे 1954 नंतर दुस-यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनाकडे विशेष महत्त्व म्हणून पाहण्यात येत आहे. याचे कारण म्हणजे मराठीला दीर्घ प्रयत्नानंतर सरकार दरबारी मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा (क्लासिकल लँग्वेज). तशी मराठी ही मुळात अतिशय प्राचीन अशी भाषा आहे. जिला साधारणतः अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे निश्चितच याचा फायदा हा मराठी भाषेला व तिच्या अभ्यासकांना होणार आहे. मराठीच्या विकासाला व वृद्धीला चालना मिळणार आहे. मराठी भाषेच्या एकूणच इतिहासाकडे पाहिले असता असे लक्षात येते की मराठीला हजारो वर्षांची सातत्यपूर्ण अशी साहित्य परंपरा आहे. प्राचीन काळापासून ते आधुनिक व अगदी अलीकडील काळापर्यंत सकस असे दर्जेदार साहित्य मराठीत निर्माण झालेले आहे. म्हणूनच की काय संत ज्ञानेश्वरांनी माझ्या मराठीची बोलू कौतुके । परी अमृतातेही पैजा जिंके | ऐसी अक्षरे रसिके मेळविन | असे म्हटले आहे. त्यामुळे मराठी ही मूलतः अभिजात म्हणजेच क्लासिकल भाषा होती. कालानुरुप ती बदलत गेली. तिची अनेक रूपे निर्माण झाली. आज जगातील अग्रगण्य अशा दहा भाषांमध्ये मराठीचा समावेश करण्यात येतो. संपूर्ण जगभर अंदाजे 12 ते 14 कोटी लोक मराठी भाषेचा वापर करतात. ही संख्या खूप मोठी असून मराठीला असलेला वाव यातून अधोरेखित होतो. मराठीला समृद्ध करणाऱ्या अनेक बोलींची भर यामध्ये घालता येईल. व-हाडी, कोकणी, अहिराणी, मराठवाडी, झाडीबोली, मालवणी, डांगी, कोल्हापुरी, पुणेरी ह्या प्रमुख तर महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील भूप्रदेशानुरूप, लोकसंख्येनुरूप, व्यवसायानुरूप, इत्यादीप्रमाणे मराठीच्या 52 बोलीभाषा आहेत. याची अजून खोलात व विस्ताराने नोंद प्रसिद्ध भाषातज्ञ गणेश देवी यांनी त्यांच्या पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडियामध्ये केलेली आहे. इतक्या विस्तृतपणे मराठी भाषेकडे पाहता येते. असे असूनही मराठीच्या संवर्धन व भविष्याबद्दल महाराष्ट्रात चर्चा केली जाते. यामध्ये पुढील काळात मराठी टिकेल की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो. परंतु या प्रश्नाला फारसा अर्थ राहत नाही. कारण जोपर्यंत एखादी भाषा बोलणारे, ती वापरणारे लोक असतात तोपर्यंत ती भाषा जगत, वाढत व विस्तार पावत असते. त्यामुळे याबद्दल फारशी चिंता करण्याचे कारण नाही. मात्र एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे ज्या काही मोठ्या भाषा आहेत त्यांच्यापुढे ज्या समस्या किंवा आव्हाने आहेत त्याच समस्या किंवा आव्हाने मराठीपुढे देखील आहेत. उदा. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची भाषेची क्षमता. एखादी भाषा किती प्रमाणात तंत्रज्ञान आत्मसात करते यावर तिचा वेगवेगळ्या क्षेत्रातील वापर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. इंग्रजीसारख्या भाषेने तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे तंत्र मोठ्या प्रमाणात आणि लीलया विकसित केलेले आहे. म्हणूनच ती इतक्या मोठ्या झपाट्याने जग व्यापून टाकत आहे. तो टप्पा मराठीने गाठण्यासाठी प्रथम तिला तंत्रज्ञानाची भाषा होणे गरजेचे आहे. यावर साहित्य संमेलनात नक्कीच प्रकाश टाकला जाईल. आजच्या या कृत्रिम बुद्धिमत्ता व सतत बदलत्या तंत्रज्ञान युगात भाषेचे स्वरूप हे झपाट्याने बदलत आहे. आज विकसित झालेलं तंत्रज्ञान हे काहीच दिवसांत एकतर मागे पडत आहे किंवा बदलत तरी आहे. गेल्या एका वर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात जी क्रांती झालेली आहे ती गेली शेकडो वर्षे काय हजारो वर्षे मानवाने साधलेल्या प्रगतीपेक्षा कितीतरी पट अधिक व वेगवान आहे. चँटजीपीटी किंवा डीपसिक हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्म्स आहेत. हे दोन्हीही मराठीचा वापर करतात. आपण त्यांना मराठीत प्रश्न विचारू शकतो व त्यांची उत्तरे मराठीत मिळवू शकतो. आता 'एआय'च्या मदतीने आपण अनेक गोष्टी करू शकतो. त्यासाठी इंग्रजीप्रमाणे मराठीचा देखील वापर सहजरित्या आणि विस्तृतपणे करता येतो. उदा. अनुवादासाठी अनेक कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या साधनांचा वापर सर्रास केला जातो. याचाच अर्थ असा की तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठीचा वापर ब-यापैकी वाढलेला दिसून येतो. त्यामुळे मराठीच्या संवर्धनाची फारशी चिंता करण्याचे कारण नाही. परंतु मराठीच्या बदलत्या स्वरूपाकडे जसे भाषांची संहिता-मिश्रण (कोड मिक्सिंग) किंवा सरमिसळ लक्ष देणे गरजेचे आहे. तसे पाहिले तर जगातील सर्वच मोठ्या भाषांचे स्वरूप तंत्रज्ञानामुळे बदलत आहे. इंग्रजीसारख्या भाषेची सर्वसमावेशकता ही प्रचंड असल्यामुळे तिच्या वाढीचा वेग मोठा आहे. त्याचप्रमाणे मराठीने देखील इतर भाषांतील शब्द सामावून घेण्याचा वेग वाढवला पाहिजे. सध्या अनेक इंग्रजी, हिंदी, उर्दू इत्यादी भाषांमधील शब्द हे मराठीत चांगल्या प्रकारे रुळलेले व स्थिरावलेले पाहायला मिळतात. परंतु तंत्रज्ञानाच्या विशेष करून 'एआय'च्या क्षेत्रात मराठीच्या नानाविध बोली व तिच्या व्याकरणाचे क्लिष्ट स्वरूप हे मोठे आव्हान आहे. यावर अनेक संशोधक सध्या काम करत आहेत. यातून नक्कीच मार्ग निघेल. मराठीला पुढे घेऊन जाण्यासाठी दुसरा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जातो तो म्हणजे मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. जो की अगदी रास्त आहे. म्हणजेच मराठी भाषेत ज्ञान निर्मिती झाली पाहिजे. एखाद्या भाषेत ज्ञान निर्मिती होणे म्हणजे काय तर त्या भाषेत नवे विचार नव्या संकल्पना मांडल्या जाणे व नवीन संशोधन केले जाणे. त्यासाठी त्या भाषेचा वापर हा शिक्षण, तंत्रज्ञान, साहित्य, विज्ञान, कायदा, प्रशासन, न्यायव्यवस्था, इत्यादी क्षेत्रांमध्ये होणे गरजेचे असते. मराठीमध्ये विपुल अशा प्रकारची साहित्य संपदा उपलब्ध असल्यामुळे तिच्यामध्ये सहज ज्ञानभाषा होण्याची क्षमता आहे. उदा. संत साहित्य. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, जनाबाई, एकनाथ इत्यादी संतांचे साहित्य ज्यामध्ये जीवन तत्वज्ञान आढळून येते. तंत्रज्ञानाच्या व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने मराठीला ज्ञानभाषा बनवणे अधिक सोयीचे जाईल. मराठीला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, त्याचा उपयोग करता येईल. जसे की देशभरातील अनेक विद्यापीठांमध्ये किंवा संशोधन संस्थांमध्ये मराठी भाषेची अध्यासन व संशोधन केंद्र स्थापन करता येतील व त्यातून नवसंशोधनाला चालना दिली जाईल. तसेच मोठे भाषा प्रकल्प देखील हाती घेतले जातील व यातून ज्ञान निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करता येईल. तंत्रज्ञानाचा वापर करून मराठीतील दर्जेदार साहित्याचे जतन, विस्तार व जागतिक पातळीवर प्रसार-प्रचार करता येईल. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन यांसारख्या भाषेतील मूलभूत ज्ञानसाहित्य हे मराठीत आणता येईल व मराठीतील जीवन उपयोगी व अखिल मानव जातीला कल्याणकारी असलेले संत साहित्य व विचार त्या भाषांमध्ये त्या लोकांपर्यंत पोहोचवता येतील. एकूणच मराठी ही तंत्रज्ञानाची नवउन्मेषाची भाषा झाली तर तिला प्रचंड मोठे क्षेत्र वाढीसाठी व विकासासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळेच मराठीला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा व दिल्ली या ठिकाणी होणारे साहित्य संमेलन यातून मराठीच्या वृद्धीला व मराठी प्रेमींना निश्चितच बळ मिळेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. - दत्ता सावंत सहयोगी प्राध्यापक, इंग्रजी विभाग, तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव, जि. हिंगोली, संपर्क: 9130002008 (dattagsawant@gmail.com)

No comments: