18 February, 2025

मराठी संस्कृतीचा अभिजात सोहळा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर पहिलेच आणि 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्ली येथे होत असल्यामुळे हा एक प्रकारचा मराठीजनांसाठी दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. त्यामुळे या साहित्य संमेलनाची जगभरात पसरणारी कीर्ती ही दिल्लीच्या व्यासपीठावरून सर्वदूर पसरेल, यात काही शंकाच नाही. असे सांगत आहेत… हिंगोलीतील कवी दिलीप धामणे. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी येथे संपन्न होत आहे. हे संमेलन मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या अभिमानाचा उत्सव ठरणार आहे. मराठी साहित्याच्या वैभवशाली परंपरेला नवा सन्मान मिळवून देणाऱ्या या संमेलनात देशभरातील साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत आणि वाचक एकत्र येणार असून, साहित्याच्या नव्या दिशांचा शोध, वैचारिक मंथन, आणि सर्जनशीलतेचा मुक्त आविष्कार येथे पाहायला मिळणार आहे. मराठी भाषा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता संपूर्ण देशात आणि जगभर विस्तारत आहे. तिच्या व्यापकतेचा आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रवाहाचा साक्षात्कार घडवणारे परिसंवाद, चर्चासत्रे, कवीसंमेलने, पुस्तक प्रदर्शन, ग्रंथदिंडी आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समृद्ध संगम या संमेलनात अनुभवता येईल. साहित्यिक दृष्टिकोन, नव्या लेखकांना मिळणारी संधी आणि विविध विषयांवरील विचारमंथन करणारे हे संमेलन केवळ एक कार्यक्रम न राहता मराठी संस्कृतीचा एक अभिजात सोहळा ठरणार आहे. दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीत होणाऱ्या या ऐतिहासिक संमेलनाला उपस्थित राहून आपण मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या अभिमानाचा जागर करूया. मराठी साहित्याचा सन्मान आणि भविष्यातील वाटचाल अधिक भक्कम करण्यासाठी हा सोहळा प्रत्येक मराठीप्रेमीने अनुभवायलाच हवा. ७० वर्षांनंतर देशाच्या राजधानीत होणाऱ्या या ऐतिहासिक साहित्य संमेलनाचे यजमानपद पुण्यातील सरहद संस्था भूषवित असून, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. मराठी भाषेच्या अभिजाततेचा गर्भित संदेश देणारे ‘हे मराठी बाहू, झुंजत राहू’हे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अधिकृत गीत असून संमेलन गीत ‘आम्ही असू अभिजात’ हे आहे. दिल्लीतील हा भव्य सोहळा साहित्यप्रेमींसाठी संस्मरणीय ठरणार आहे. - दिलीप धामणे, हिंगोली भ्रमणध्वनी क्र 8208456793 *******

No comments: