22 February, 2025
विशेष लेख - संत नामदेव - संत चोखोबा याचे गुरुशिष्य नातेसंबंध
'नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी' हे सामाजिक प्रबोधनाचे ध्येय असणाऱ्या संत महर्षि नामदेव महाराजांचे जन्मगाव नर्सी हे आहे. हे गाव मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात आहे. हिंगोलीपासून पश्चिमेला चौदा कि.मी. अंतरावर असलेल्या या गावाला संत नामदेवांच्या जन्मस्थळामुळे नर्सी नामदेव असे म्हटले जाते. या गावात संत नामदेव महाराजांचे मोठे मंदिर आहे. आणि त्या मंदिर परिसरात संत नामदेवांचेच भव्य स्मारक प्रस्तावित आहे.
या मंदिराजवळच संत नामदेवांचे पट्टशिष्य व सहकारी संत चोखामेळा यांची जीर्ण अवस्थेतील समाधी आहे. खुद्द संत नामदेवांनीच पंढरपूरच्या समाधीनंतर या गावी चोखोबांची दुसरी समाधी बांधली होती.
संत नामदेवांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 साली झाला. तर त्यांचा मृत्यू 3 जुलै 1350 साली झाला. आणि संत चोखामेळा यांचे जन्म साल अज्ञात असून त्यांचा मृत्यू 1338 साली झाल्याची नोंद आहे. संत चोखोबाच्या मृत्यूनंतर संत नामदेव बारा वर्षे जिवित होते. संत चोखामेळा हे संत नामदेवांचे शिष्य व विश्वासू सहकारी होते. नामदेवांच्या संतमेळ्यातील एक महत्त्वाचे संत कवी होते. तत्कालीन सर्व जाती-धर्मातील संतांचा योग्य समन्वय राखण्याचे संत नामदेवांचे कौशल्य चोखोबांनी आत्मसात केले होते. त्या विभिन्न संतांचा योग्य मेळ घालणारे चोखोबा म्हणूनच चोखामेळा या नावाने ओळखले जातात. ते मेहूण ता. देऊळगाव राजा जि. बुलडाणा इथले रहिवासी होते. म्हणजेच मेहूण हे चोखोबांचे जन्मगाव आहे.
संत नामदेव विठ्ठलभक्त होते. ते आपल्या नर्सी गावावरुन परिवारासह पंढरपुरात राहायला गेले होते. पंढरपूरची नियमित वारी करणारे चोखोबा संत नामदेवांच्या संपर्कात आले. नामदेवांचा त्यांच्यावर चांगला प्रभाव पडला. संत नामदेवांचा प्रभाव व विठ्ठल भक्तीचे आकर्षण यामुळे चोखोबा सुध्दा आपले मूळ गाव सोडून पंढरपूरच्या आसपास असलेल्या मंगळवेढा या गावी परिवारासह राहायला आले. 80 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या नामदेवांनी आपल्या आयुष्याची वीस वर्षे पंजाब राज्यात खर्ची घातली. भरपूर ग्रंथरचना करणाऱ्या नामदेवांनी 2500 मराठी अभंग, 125 शौरसेनी भाषेतील अभंग तर 62 पंजाबी गुरुमुखी लिपीतील अभंग इतके काव्य लेखन केले. तर चोखोबा व परिवाराने एकूण 300 अभंगांचे लेखन केलेले आहे.
संत नामदेव हे संत, कवी, कुशल संघटक व उत्तम कीर्तनकार होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती-जमातीमधील स्त्री-पुरुषांना एकत्र करुन त्यांच्यात समतेची भावना जागवली.
'नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी' ही त्यांची प्रतिज्ञा होती. नामदेव महाराजांची ही प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी संत चोखोबा जीवनभर झटले. म्हणूनच चोखोबांविषयी नामदेवांना फार लळा व जिव्हाळा होता. संत नामदेवांच्या सामाजिक परिवर्तनाचे ध्येय चोखोबा ओळखून होते. म्हणूनच संत नामदेव महाराजांनी निर्माण केलेल्या भक्ती यात्रेत चोखोबाचे सगळे कुटूंब सामील होते. "सामाजिक परिवर्तन के आंदोलन में चोखामेला पहले संत थे, जिन्होने भक्तिकाल के दौर में सामाजिक गैर-बराबरी को लोगों के सामने रखा। अपनी रचनाओं में वे दलित समाज के लिए खासें चिंतित दिखाई पडते है!
संत नामदेव हे संत चोखोबांचे गुरु व सहकारी होते. नामदेव आपल्या या सहकारी शिष्याचा आदर व सन्मान करत होते. नामदेवांना चोखोबांचा फार अभिमान वाटत होता. नामदेवांसारख्या गुरुने चोखोबांसारख्या आपल्या शिष्याविषयी अभंग लेखनातून आदरभाव व्यक्त करावा, ही बाब गुरु-शिष्य या नात्याची इतिहासातील विलक्षण घटना आहे. संत नामदेवांनी चक्क संत चोखोबावर अभंग लिहिले याची बऱ्याच वारकरी व संत साहित्याच्या अभ्यासकांना सुध्दा कल्पना नाही. नामदेवांना चोखोबांविषयी किती जिव्हाळा होता हे नामदेवांच्या पुढील अभंगावरुन लक्षात येते. संत नामदेव लिहितात -
चोखा माझा जीव, चोखा माझा भाव ।
कुलधर्म देव। चोखा माझा ।।
काय त्याची भक्ती, काय त्याची शक्ती ।
मोही आलो व्यक्ती । तयासाठी ।।
माझ्या चोखियाचे, करिती जे ध्यान।
तया कधी विघ्न। पडो नदी ।।
नामदेवे अस्थि, आणिल्या पारखोनी ।
घेत चक्रपाणी। पितांबर ।।
संत नामदेव
संत तुकारामांनीही चोखोबांचा अभंगातून गौरव केलेला आहे, हे विशेष आहे.
"तुका म्हणे तुम्ही, विचारांचे ग्रंथ। तारिले पतित । तेणे किती । " खुद्द तुकोबाराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात. ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची कैफियत विठ्ठलापुढे तळमळीने मांडणारे संत म्हणजे चोखामेळा होय.
संत चोखोबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात असतांना अंगावर दरड कोसळून झाला. त्यांच्या मृत्यूनंतर संत नामदेवांनी चोखोबाची हाडे गोळा करुन पंढरपुरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली. एवढेच नव्हे तर चोखोबाची काही हाडे आपल्या नर्सी या जन्मगावी आणून तिथेही त्यांची समाधी बांधली होती. त्या समाधीचे अवशेष आजही त्या गावात अस्तित्वात आहेत. नर्सी इथल्या संत नामदेवांच्या मंदिराजवळ ते चोखोबाच्या समाधीचे अवशेष आजही पाहायला मिळतात.
चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही आणण्याचे काम संत ज्ञानेश्वर व संत नामदेवांनी केले. त्या आध्यात्मिक लोकशाहीला बळकट करण्याच्या महत्वपूर्ण कार्यात संत चोखोबांचे अख्खे कुटूंब सहभागी झाले होते. पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, मेहुणा बंका आणि मुलगा कर्ममेळा या सर्वांनी अभंग लेखन केलेले आहे.
उस डोंगा परि, रस नोहे डोंगा।
काय भुललासि, वरलिया रंगा ।।
यासारखे चोखोबांचे कित्येक अभंग बऱ्याच मराठी माणसांच्या ओठी आहेत.
संत ज्ञानेश्वरांनी अल्पवयातच समाधी घेतल्याने व संत नामदेवांच्या पंजाबला जाण्यामुळे वारकरी संप्रदायाची धुरा त्या काळात एकट्या चोखोबांवर पडली होती. संत नामदेवांच्या मार्गदर्शनाने चोखोबांनी वारकरी संप्रदाय सामाजिकदृष्ट्या अधिक विविधांगी केला. अठरा पगड जातींच्या संत कवींचा त्यांनी उत्तम समन्वय घडवून आणला. संत नामदेवांना अभिप्रेत असलेला जातीय सलोखा टिकवून ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य चोखोबांनी केले. पंढरपुरचे विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे दैवत सर्व जातींच्या महासमन्वयाचे प्रतीक आहे. विठ्ठलाचे हे सामाजिक समतेचे तत्त्वज्ञान संत नामदेव, चोखोबा आणि त्यांच्या संप्रदायातील सर्व संत कवी मंडळी अंगिकारत असत. संत चोखोबांनी सामाजिक समतेचा हा संदेश भक्ती मार्गाच्या माध्यमातून तत्कालीन समाजात जाणिवपूर्वक प्रसारित केला. कारण तत्कालीन सामाजिक विषमतेचे चटके त्यांनी स्वतः भोगले, सोसले व अनुभवले होते. ती वेदना व त्यांचे आक्रंदन चोखोबांनी अपल्या अभंगातून उत्कटपणे मांडले आहे. "हीन मज म्हणती देवा, कैसी घडो तुमची सेवा." अशा शब्दात आपली वेदना चोखोबा व्यक्त करीत होते.
चोखोबांच्या मृत्यूची बातमी संत नामदेवांना समजली तेव्हा त्यांच्या अस्थि गोळा करुन त्यांनी विठ्ठल मंदिरात चोखोबांची समाधी बांधली. आणि एवढेच नव्हे तर त्यातील काही अस्थि त्यांनी नर्सीला आणून त्यावर समाधी बांधली. ती समाधी आज रोजी जीर्ण अवस्थेत आहे. परंतु अस्तित्वात आहे. संत नामदेव वीस वर्षे पंजाबात राहून नंतर महाराष्ट्रात आले. पंढरपुरात त्यांचे निधन झाले. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचे योग्य नेतृत्व केले.
2020 हे वर्ष संत नामदेवांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीचे वर्ष होते. महाराष्ट्र व पंजाबात नामदेवांच्या या जयंती महोत्सवाची तयारी जोरात सुरु होती. परंतु कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या लॉकडाऊन काळात हा जयंती महोत्सव झाला नाही, परंतु त्या निमित्ताने संत नामदेवांच्या जन्मगाव नर्सी मधील नामदेव मंदिराची उभारणी झाली. आणि अजुनही संत नामदेवांचे प्रस्तावित स्मारक भव्यदिव्य होत आहे. आणि सोबतच संत नामदेवांचे जिव्हाळ्याचे सहकारी शिष्य संत चोखामेळा यांच्या त्या जीर्ण समाधीचेही स्मारक व्हावे, चोखोबांचे स्मारक व्हावे हे संत नामदेव यांनाही अभिप्रेत होते. महाराष्ट्र, केंद्र सरकार, आमदार, खासदार, स्वयंसेवी संस्थांनी व संत नामदेव महाराज संस्थानाने, संत नामदेवांच्या चाहत्यांनी पुढाकार घेतल्यास संत नामदेवांच्या स्वप्नातील चोखोबांचे स्मारक व्हायला वेळ लागणार नाही. म्हणजे संत नामदेवांचे मंदीर व त्यांचे स्मारक होणे जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच संत चोखामेळा यांचे स्मारक होणेही महत्त्वाचे आहे. इतका या दोन संतांचा वैयक्तिक व वैचारिक जिव्हाळा होता. म्हणूनच नर्सी नामदेव जि. हिंगोली येथील संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या समाधी व मंदिर परिसरातील संत चोखामेळा यांच्या जीर्ण समाधीला उजाळा देणे व त्यांचे साजेसे स्मारक तयार होणे आवश्यक आहे. कोणीतरी पाठपुरावा करावा व हे कार्य घडवून आणावे अशी अपेक्षा आहे. कारण संत चोखोबा हे संत नामदेव महाराजांचे उजवा हात होते. संत नामदेवांच्या भव्य स्मारकासोबत संत चोखोबांचे जीर्ण अवशेष असलेल्या ठिकाणी त्यांचेही स्मारक झाले तर ती खरी संत नामदेवांना आदरांजली ठरेल. आणि तेच खरे संत नामदेवांना अभिवादन ठरेल.
संत चोखामेळा संबंधीत पुस्तके :-
1) चोखोबाचा विद्रोह - शंकरराव खरात
2) संत चोखामेळा - लीला पाटील
3) श्री संत चोखामेळा चरित्र - बाळकृष्ण लळीत
4) श्री संत चोखामेळा चरित्र आणि अभंग (परीवारातील लोकांचेही) – शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.
5) श्री संत चोखामेळा व परीवार चरित्र व समग्र अभंग गाथा प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी
6) संत चोखामेळा : विविध दर्शन अँलिनार झेलियट, वा.ल. मंजूळ
7) श्री संत चोखामेळा : समग्र अभंग गाथा व चरित्र प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी
8) वारकरी संप्रदाय - शंकर वासुदेव अभ्यंकर
9) संत चोखामेळा (मराठी चित्रपट)
- प्रा.डॉ. शत्रुघ्न जाधव, हिंगोली
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment