27 February, 2025

चाईल्ड हेल्प लाईनकडून शाळेत जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 27 : येथील पेन्शनपुरा भागातील डॉ. इक्बाल उर्दू शाळा व बावनखोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चाईल्ड हेल्प लाईनकडून जनजागृती करण्यात आली. यावेळी चाईल्ड हेल्पलाईन 1098 कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये बाल विवाह म्हणजे काय, विवाहाचे योग्य वय, बाल विवाह होण्याची कारणे, बाल विवाहाचे दुष्परिणाम याची माहिती दिली. बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार बाल विवाह केल्यास अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. या सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाही याबाबत योग्यती खबरदारी घ्यावी तसेच मुलीच्या वयाची 18 वर्ष व मुलाच्या वयाची 21 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी बालकांना चांगला व वाईट स्पर्शाबाबत माहिती देण्यात आली. चाईल्ड हेल्प लाईन 1098 ही बालकांसाठी तात्काळ मदत करणारी हेल्पलाईन आहे. 1098 या टोल फ्री क्रमांकावर मिळालेली माहिती गोपनीय असते. बालकाला मदतीची गरज भासल्यास त्यांनी 1098 या टोल फ्री क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. पठाण, श्रीमती गायकवाड, शिक्षिका श्रीमती लांडगे तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. ******

No comments: