18 February, 2025
हिंगोली जिल्ह्यातील लेखन, साहित्याची परंपरा आणि प्रवाह.... - प्रा. डॉ.संध्या रंगारी.
आपल्या शब्दस्त्रांचा कुशलतेने वापर करत क्रांतिसाठी अनुकूल मनोभूमी तयार करण्याची, समाजप्रबोधनाचा जागर घालत परिवर्तनाची पहाट आणण्याची ताकद केवळ कवितेमध्ये असते. कविता हा प्रत्येक बदलाचा प्रथम उद्गार झाली आहे. कवी - लेखक हा समाजातील सर्वाधिक संवेदनशील आणि समाजाप्रती बांधिलकी जपणारा जबाबदार घटक आहे. विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा साहित्यिकांचा प्राण असतो. दृष्टेपणाचे सहावे इंद्रिय लाभले असले तरी साहित्यिकांचे पाय मातीचेच असतात. त्यामुळे लेखन कृतीला देश - काळ- वर्तमानाच्या अन् काही 'स्व'च्याही मर्यादा पडतात. अशा धुक्याच्या काळात आपल्या पूर्वसुरींच्या प्रतिभेचे सांडलेले सुवर्णकण संदर्भ म्हणून साठवत, 'स्व'च्या मर्यादा ओळखून त्या स्वीकारत बलस्थानांचा शोध घ्यावा लागतो. आत्मपरीक्षणाची, आत्मटिकेची तयारी ठेवावी लागते. हिंगोली जिल्ह्यातील साहित्यिकांच्या अभिव्यक्तीसंदर्भात संख्यात्मक नव्हे तर गुणात्मकदृष्ट्या विचार करता असे दुवे अल्प, स्वल्प आहेत असे निदर्शनास येते.
हिंगोली जिल्ह्यातील समाज, संस्कृती, धर्म आणि लोकजीवन यांचा स्वभाव परंपरावादी, सनातनी, जातीव्यवस्थाबद्ध, सरंजामी आहे. नकाशावर अतिमागास असलेल्या या जिल्ह्यातील खेड्यापाड्यात अभिसरणाची गती अतिमंद आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना जातीय ध्रुवीकरणाचा विळखा वाढलेला दिसतो.
१९९० नंतरच्या जागतिकीकरणाच्या कालावधीत धर्म, राजकारण, अर्थ, सत्ता या चौकटीतील अर्थकारणाचे अर्थ बदलले आहेत. कवी, लेखक विचारवंतांच्या हत्या फॅसिस्ट शक्ती प्रबळ झाल्याचे दर्शवतात. माणसाची जगण्याची भाषा बदललेली आहे. समाज दुभंगलेला आहे. मानवता शबलीत करणाऱ्या या संभ्रमित काळात मानवी जीवनाचे सर्व अंगानी निरीक्षण करत
'सत्य असत्याशी मन केले ग्वाही,
मानियले नाही बहुमता'
हे ब्रीद जपणारे विवेकी, बुद्धीवादी , विज्ञानवादी साहित्यिक समाजाला योग्य दिशा दाखवू शकतात. खरे तर 13 व्या शतकातच नामदेवांनी कीर्तनाच्या माध्यमातून विचार प्रसार करत जनप्रबोधनाचा मार्ग सुकर करून ठेवला आहे.
"नाचू कीर्तनाचे रंगी |
ज्ञानदीप लावू जगी ..||
हा निग्रह प्रकट करत त्यांनी अध्यात्माच्या पातळीवर बहुजनांना सामावून घेणाऱ्या विरत्व आणि वैराग्याची शिकवण देणाऱ्या भागवत धर्माची भगवी ध्वजपताका महाराष्ट्राची सीमा ओलांडत पंजाबपर्यंत फडकवत ठेवली. केवळ हिंगोली जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाला आकार देणारी त्यांची आत्मपर, अंतर्मुख अभंगवाणी अमृताची खाणी ठरली. आपल्या ठाई असलेल्या संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी सदाचार, नीती, बंधुभाव ही तत्वे लेखणी अन् वाणीतून संस्कारित करत ज्ञानाची, भक्तीची, मुक्तीची ज्योत प्रज्वलित केली. त्यांच्या सक्रिय सहवासाने केलेली हिंगोली जिल्ह्याची ही सांस्कृतिक जडणघडण आपणाला टिकवता आली नाही, हे आपले करंटेपण आहे. असे असले तरी संतश्रेष्ठ नामदेवांच्या कवितेमुळे हिंगोली जिल्ह्याची नाममुद्रा साहित्य जगतात ‘अक्षर’ ठरली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सामाजिक - सांस्कृतिक - धार्मिक जनजीवनात सर्वसमावेशकतेचे तत्व रुजवू पाहणारा हा असा पक्का पाया नामदेवाच्या रूपाने मध्ययुगातच लाभल्यामुळे येथील हिंदू, बौद्ध, जैन, शीख, मुस्लिम, आर्य समाज यांच्यातील द्वेष, धार्मिक तेढ कमी होऊन सर्व धर्मातील संवादी तत्व स्वीकारत मानवी मूल्य जपत जुलमी निजामी राजवटीला सामोरे जात समाज एकत्रित राहिला. पण तो 'एक' झाला नाही. महानुभाव, वारकरी, नाथ, वीरशैव, सुफी इत्यादी संप्रदायातील करुणा, सौहार्द स्वीकारत येथील लोकमानस घडत गेला आहे. हिंगोली जिल्ह्याचे कार्यक्षेत्र आणि व्याप्ती इतकी व्यापक असून या परिसरात बोलली जाणारी मुख्य भाषा मराठी आहे. भाषेमुळे समाज एकत्र बांधला जातो. निजामी राजवटीमुळे उर्दू, हिंदी, फारशीचा प्रभाव जनजीवनावर आढळून येतो.
सातव्या शतकात शब्दरूपाने आणि अकराव्या शतकात शिलालेखांद्वारे 'मराठी' चे अस्तित्व अधोरेखित झाल्याचा निर्वाळा अभ्यासक देतात. मराठी बोलणाऱ्यांचं राष्ट्र ते महाराष्ट्र असा समाजवाचक शब्द रूढ झाला. हैदराबाद संस्थानात मराठी बोलणाऱ्यांचा स्वतंत्र सुभा म्हणून मराठवाडा तयार झाला. मराठवाड्यातील 'परभणी' जिल्ह्याचे विभाजन होऊन 'हिंगोली ' जिल्ह्याची निर्मिती झाली. मराठी माणसांच्या जिवंतपणाचे रहस्य मराठी भाषेत दडलेले आहे. भाषा मृतप्राय झाली की समाजाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहते. समाज जीवनात होणारे बदल भाषेतून आणि लेखकांच्या लेखन कृतीतून प्रतिबिंबीत होतात. नवनवीन शब्दांची भर पडत गेली की भाषा वृद्धिंगत होते. हिंगोलीतील मराठी माणसाचा ओबडधोबड स्वभाव, कयाधूच्या काठावर वसलेली गावे, फुललेली शेती, संस्कृती, जनजीवन, विचार, भावना, बोलीची प्रारूपे यांच्या सर्जक सृजनशील हातांनी शब्द फुलांच्या माळा करून मराठीला सौंदर्य प्रदान केले आहे. स्त्रियांच्या तोंडी असणारी लोकगीते, ओव्या यांची गाणी झाली. गाव शिवारातल्या गप्पागोष्टी, लोककथा, दृष्टांतकथा, मंदिरासंबंधीच्या (औंढा नागनाथ) आख्यायिका यांनी मराठीचे दालन समृद्ध केले. मराठी ही येथील माणसाच्या अस्मितेचा, अभिमानाचा वैभवी मानबिंदू राहिली आहे. हैदराबाद संस्थानात शासनकर्त्यांच्या भाषेवरून युद्ध पेटले. तेव्हा ना. गो. नांदापूरकरांनी लेखणीचे अस्त्र परजून घेत 'माझी मराठी' म्हणत भाषिक मानसिकतेच बंड पुकारणारे क्रांतिगीत लिहिले.
“ माझी मराठी असे मायभाषा
हिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे
गोडी न राहे सुधे माजी आता
पळाली सुधा स्वर्गाकडे
आकंठ प्यालो हिचे दूध अंगी
पहा रोमरोमातूनी या खुणा
तोडा चिरा दुग्धधाराच येती
न हे रक्त वाहे शरीरातूनी
माझी मराठी मराठाच मीही
असे शब्द येतील हो त्यातूनी”
शासन, राज्यकर्ते, प्रशासन अन् लोक व्यवहाराची भाषा मराठीच असली पाहिजे या आग्रहाची साक्ष हे स्फूर्तीगीत देते. जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी क्रांतिचा पर्याय समोर ठेवणारी ही सृजन संजीवक भाषिक कृती बदलत्या सत्तांतराची नोंद घेत होती. मायबोलीची कहाणी (1947) , माहेरची मराठी ( 1953), मराठीचा मोहर ( 1956), मराठीची माया (1958 ) इत्यादीतून त्यांची भाषेवरील निष्ठा अन् प्रेम दिसून येते. त्यांनी लोकगीतांचे केलेले संकलन आणि 'मुक्त मयुरांची भारते' हे संशोधनाचा वस्तुपाठ निर्माण करणारे अनमोल लेणे होय. भाषा, साहित्य, शास्त्र, संस्कृती विषयीचे हे संवेदन म्हणावे लागेल.
1948 नंतर कथालेखन करणारे प्रा. तु. शं. कुलकर्णी यांनी कथा, कविता, समीक्षा या वाग्ङमय प्रकारात लेखन केले. फडके, खांडेकर शैलीचक्रात अडकलेल्या कथेला मुक्त करणारे हैदराबाद संस्थानातील ते एकमेव सिद्धहस्त लेखक होत. तृणाची वेदना (1955), ग्रीष्मरेखा (1960 ), अखेरच्या वळणावर ( 1982), कानोसा (1992) या कृती कालपटलावर ऐतिहासिक ठरल्या.
स्वातंत्र्योत्तर कालखंडात साहित्य आणि समाज यांचे अनुबंध बदलत गेले. 1960 नंतर दलित साहित्य, ग्रामीण साहित्य , जनवादी साहित्य , प्रादेशिक साहित्य, मुस्लिम साहित्य, आदिवासी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, भटके व विमुक्तांचे साहित्य असे प्रवाह अस्तित्व ठळक करत प्रवाहित झाले. गावगाड्यातील मानवी स्वभावाची लय, हेल आणि पाणी पकडणारी बोली, वैचारिक लेखनातील प्रमाणता, ललित गद्यातील लालित्य, काव्यात्मकता अन् विचार, लोक व्यवहारातील अर्थपूर्ण भाषा , शासकीय कार्यालयीन भाषा, व्यापार उद्योगाची बोली यांनी लेखकांना अन् लेखकांनी भाषेला विकसित केले.
कोंकणीला स्वतंत्र भाषेचा दर्जा मिळाला. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या मराठीच्या मागणीने जोर धरला. अखेर सत्तासंघर्षातील राजकीय मुत्सद्देगिरीतून लोकांनुनयाची गरज लक्षात घेता अमृत महोत्सवी वर्ष अखेरीस मराठी भाषा 'अभिजात' झाली. अर्थात निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून राजकीय डावपेचात अमृताशी पैजा लावणारी मराठी भाषा जिंकली की धुरीण राजकारणी? याचे संवेदन साहित्यातून येणे अजून शेष असले तरी राजकारणीही भाषेचा वापर कौशल्यानेच करतात, हे सिद्ध झाले.
मराठी अभिजात झाली म्हणजे काय झाले ? अभिजात म्हणजे ज्ञानाची, शास्त्राची भाषा हा विचार ग्राह्य धरला तर 'ज्ञानदेवे रचिला पाया' म्हटले तेव्हापासूनच श्रुंगाराच्या माथ्यावर पाय देऊन उभी राहिलेली तत्त्वज्ञानात्मक ज्ञानेश्वरी अभिजात होती. मराठी भाषा हे ज्ञानाचे एक रूप आहे, हे साहित्य मीमांसकांनी सिद्ध केलेले आहेच. तर्कनिष्ठ, बुद्धीनिष्ठ, वस्तुनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, ईहवादी, शास्त्रसंमत भाषा वैचारिक ग्रंथसंपदेतून अनुभूतीस येते. मानवाच्या सर्व वर्तन व्यवहाराचे मूळ तॄष्णेत दडले आहे. हे निखालसपणे सांगणारे, दुःखमुक्तीचा ज्ञानदायी मार्ग दाखवणारे बौद्ध वाङ्मय खरे अभिजात होय. शास्त्र काव्याच्या कसोटीवर 100% खरे उतरणारे मानवी जीवनाचा अभ्युदय करणारे फुले-शाहू-आंबेडकरवादी साहित्य अभिजात होय.' ‘जात’ हे तत्व नाकारत अभिजनांची भाषा ती अभिजात भाषा हे विधान मोडून काढत आंबेडकरवादी साहित्याने मानवी मूल्यांवर अधिष्ठित असलेली संविधानिक संस्कृती आणि भाषा निर्माण केली. भारतीय समाज एक नाही हे वास्तव स्वीकारत जातीअंतासाठीचे प्रयत्न आणि विज्ञानवादी दृष्टिकोन रुजविण्याचा मानस या आधारे खरी राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाचा विचार दिला. काही बुद्धीवंतांनी बौद्धिक दिवाळखोरी प्रकट करत 'अभिजनांची भाषा तीच अभिजात' म्हणत विद्यापीठीय अभ्यासक्रमांतून 'नॉन अकॅडमीक' ठरवत दलित साहित्याला परिघावर ठेवले. शुद्धतेच्या, पावित्र्याच्या या सोवळेपणापायी मराठीचे आशयक्षेत्र विस्तारण्याऐवजी संकुचित झाले. याला शासनाची उदासीनता जितकी जबाबदार आहे तितकेच विद्वत पंडित, विद्यावाचस्पतींचा कद्रूपणाही कारणीभूत आहे. भारतीय समाज व्यवस्था पितृसत्ताक आहे. आणि प्रामुख्याने बोली जतन संवर्धन करत त्या जिवंत ठेवण्याचे कार्य स्त्रियांनी केले. हाही मुद्दा अलक्षित ठेवला गेला.
हिंगोली जिल्ह्याचा विचार करता विजय गं. वाकडे , शाहीर अनुसयाबाई शिंदे, प्रा. विलास वैद्य, प्रा.केशव सखाराम देशमुख, डॉ. शत्रुघ्न जाधव, अशोक अर्धापूरकर, बबन शिंदे इत्यादी कवी लेखक आपला आशयघन भाषिक हस्तक्षेप नोंदवत आहेत. भ. मा. परसवाळे यांची उपरोध आणि उपहासात्मक शैली अस्वस्थ करणारी आहे. त्यांची कविता मानवतावादी, समसृष्टीचे मूल्यभान देणारी विचार कविता आहे. त्यांच्या लेखणी आणि अनोख्या चित्रशैलीमुळे हिंगोली जिल्ह्याचे नाव भारतीय पातळीवर उजागर केले आहे. आई या कवितेमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले फ. मु. शिंदे हे देखील महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून भारतीय जनमानसात रुजलेले दिसतात. वेदना, विद्रोह, उपरोध, उपहास, सजग सामाजिक अन् राजकीय भान अन् स्वतंत्र शैली या वैशिष्ट्यांमुळे भ. मा. परसवाळे आणि फ. मु. शिंदे यांची दखल युगप्रवर्तक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण ठरावी अशी आहे.
अलीकडे जातीय विखार तीव्र झाला आहे. सर्व क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. शेतकरी आत्महत्यांनी टोक गाठले तरी ग्रामीण लेखक जोंधळ्यात चांदणे शोधताना दिसतात. आंदोलने, मोर्चे यांनी समाजजीवन ढवळून निघाले. एस. सी. विरुद्ध ओबीसीचा फार्स रचला गेला. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला. पण गुणवत्ता ढासळली. बहिस्थ परीक्षा पद्धती मुक्त विद्यापीठे बढती मिळविण्याची साधने झाली. शिक्षणाचा मूळ उद्देश हरवून गेला. स्वतःला परिवर्तनवादी, प्रोग्रेसिव्ह (प्रागतिक ) म्हणवून घेणारे गटातटात अडकले. जाती निरपेक्ष नेतृत्व उभं राहू शकलं नाही. गांधीवादी सर्वोदयी संपले. अहिंसावाद केवळ विचार पातळीवर उरला आहे. फुले - शाहू - आंबेडकरी चळवळी नामशेष झाल्या. दिशादर्शक नेतृत्व उभे करता आले नाही. स्वतःला स्त्रीवादी म्हणवून घेणाऱ्या लेखिकांना अवकाश मिळूनही स्वतःच्या लेखनाचा अन्वयार्थ लावता आला नाही. त्यामुळे त्यांना दिशा गवसली नाही. या विलक्षण वेगाने बदलत्या सामाजिक वास्तवाला कवेत घेऊ पाहणारे लेखन येणे अपेक्षित आहे.
काही लेखक दोन-तीन पुस्तकानंतर थांबले आहेत. काहींचे लेखन मंदावले आहे. काही कारकुनी करत वर्षातून दोनदा पाळणा हलविण्यात धन्यता मानत आहेत. काही आत्ममग्नतेच्या कोशात गुरफटले आहेत. काही 'सेल्फी' होत फेसबुकीष्ट झाले आहेत. तर काहींनी विचारसरणीचे शिक्के मारून घेत स्वतंत्र राहुट्या उभारल्या आहेत. काहींना समीक्षकांनी तारले. काहींना उपेक्षिले. काहींना खपवले. काही लेखकांना प्रकाशकांनी विकत घेत ओटीत घेतले. काहींनी स्वतःचे स्तुती पाठक जोपासले. तर काहींना अजूनही पूर्वसूरींच्या अंधानुकरणातून बाहेर पडण्याचा रस्ता सापडला नाही. तर काहींनी पुरस्कार मिळवण्याची कला अवगत केली. येथे मी मंचीय कविता, फेसबुकीय कविता, आभासी पटलावरची कविता, ऑनलाइन कविता या कृतींचा विचार केला नाही. अलीकडे संमेलने आणि वाद हे समीकरण प्रस्थापित होऊ पाहते आहे. पूर्वी संमेलनात यशवंतराव चव्हाणांसारखा कलासक्त, अभ्यासू, जाणकार, दर्दी कृष्णाकाठचा संपन्न बैरागी, साहित्यिकांची कदर करणारा असा एखादाच दृष्टा राजकारणी बोलाविला जात असे. आताची संमेलने पूर्णतः राजकीय होऊ घातली आहेत. आतले राजकारण अन् अर्थकारण लपवत हा राजकीय इव्हेंट मॅनेज करणारे अभिजन दृढ्ढाचार्य त्यात अग्रेसर आहेत. असा एकूणच प्रदूषित सभोवताल असला तरीही मी निराश नाही. लेखक हा एकल परंतु प्रबळ विरोधी पक्ष असतो. तो उद्दाम, नॄशंस व्यवस्थेवर अंकुश ठेवू शकतो. आतून शतखंडित होऊ पाहणाऱ्या मानवाला सावरणारे हात फक्त सृजनांचे असू शकतात, यावर माझा विश्वास आहे. मानवाचे विचार स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी शासनाची मोहर उमटलेली ही राजपत्रित अभिजात मराठी नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञावंतांना बळ देत, रसद पुरवत, कोरीव कातिव अक्षरलेणी घडविण्यासाठी सहाय्यक ठरेल या अपेक्षेसह थांबते.
प्रा. डॉ. संध्या रंगारी
(मराठी विभाग)
नारायणराव वाघमारे महाविद्यालय, आखाडा बाळापूर, ता. कळमनुरी , जि. हिंगोली - ४३१७०१.
ई-मेल: rameshkadam1475@gmail.com
मो.नं.9423140715
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment