17 February, 2025

मराठीचे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करणारे साहित्य संमेलन. ९८ अ. भा. म. सा. संमेलन, दिल्ली

महाराष्ट्राची शान मराठी, मनामनातील अभिमान मराठी। झाडे, वेली, पशु, पाखरे, अन् सह्याद्रीचा आवाज मराठी॥ वरील ओळीतून मराठी भाषेची प्रगल्भता लक्षात येते. जगामध्ये विविध भाषा बोलल्या जातात. परंतु या सर्व भाषांमध्ये मायेची, आपुलकीची, जिव्हाळ्याची भाषा म्हणून प्राचीन काळापासून मराठी भाषा प्रचलित आहे. अशीच सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात घुमणारी मराठी भाषा आता अभिजात भाषा म्हणून गौरविण्यात आली. हे आपणा सर्वांचे अहोभाग्य म्हणावे लागेल. मराठी भाषा आणि साहित्य हे भारतीय संस्कृतीचे अभिमानास्पद घटक आहेत. मराठी भाषेतील साहित्य हे समाजाच्या विचारांना आणि संस्कृतीला दिशा देणारे माध्यम आहे. भारत सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठीचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. येथूनच पुढे जणू साहित्याचा नवा अध्याय सुरू झालेला दिसून येतो. हा दर्जा मिळवण्यासाठी साहित्यिक, साहित्यमंडळे यांचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते, आणि अखेर हा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. "अभिजात भाषा " म्हणून मराठीला विशेष सन्मान प्राप्त झाला असून त्यामुळे साहित्यातील नवनवीन संशोधन, भाषा संवर्धन, आणि साहित्य विस्तारासाठी नवे मार्ग निर्माण झाले आहेत. आज आपण पाहतोय मराठी साहित्याचे जागतिकीकरण झालेले आहे. मराठी साहित्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाही, तर आज ते जागतिक पातळीवर पोहोचत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही मराठी साहित्याचे अनुवाद करणे सहज शक्य होईल सोबतच मराठी साहित्यामध्ये नवनवीन संशोधन आणि प्रकाशन अधिक मोठ्या प्रमाणावर होईल. याच माध्यमातून नव्या पिढीला साहित्य क्षेत्रात योगदान देण्यासाठी प्रेरणा मिळेल. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या पहिल्या संमेलनापासून मराठी साहित्याच्या या महामेळाव्याने विविध साहित्यिक प्रवाहांना चालना दिली. इ.स. १८७८ पासून सुरु झालेली ही साहित्य परंपरा आज ९८ व्या संमेलनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा संमेलनाच्या माध्यमातून अनेक श्रेष्ठ साहित्यिकांनी मराठी भाषेचा आणि मराठी भाषेतील दर्जेदार साहित्याचा दर्जा उंचावला. यामध्ये विविध ज्येष्ठ साहित्यिक, त्यांचे साहित्य, वैचारिक प्रबोधन नवसाहित्यिकाला मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक मेळावा नाही, तर तो मराठी संस्कृतीचा उत्सव आहे. आणि या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी कोणत्याही जाती, धर्माचे, वयाचे बंधन नसते. साहित्यावर प्रेम करणारा प्रत्येक घटक या साखळीमध्ये समावेशित असतो. कारण साहित्य हे केवळ कल्पनांचे संकलन नसून ते समाजाच्या विचारधारेचे प्रतिबिंब असते. संमेलनाच्या माध्यमातून विविध साहित्यिक, अभ्यासक आणि वाचक एकत्र येऊन मराठी भाषा आणि संस्कृतीचा विकास घडवतात. या संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्यिकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळते. मराठी भाषेतील विविध प्रवाह, साहित्य प्रकार, तसेच नवोदित आणि वरिष्ठ साहित्यिकांचा संवाद साधला जातो. मराठी भाषेतील विविध प्रवाह, साहित्य प्रकार, तसेच नवोदित आणि वरिष्ठ साहित्यिकांचा संवाद साधला जातो या संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्यिकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळते. दरवर्षी विविध जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राबाहेर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जातात. यावर्षीचे साहित्य संमेलन हे महाराष्ट्राबाहेर, विशेषतः देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत होणार आहे त्यामुळे हे संमेलन एक ऐतिहासिक टप्पा आहे. यामुळे मराठी साहित्याला दिल्लीसारख्या केंद्रस्थानी जागतिक पातळीवर पोहोचण्याची मोठी संधी उपलब्ध होईल. दिल्लीहून येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा उपक्रम म्हणजे मराठीचे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करणारा उपक्रम असे म्हटले तर वावगे होणार नाही. कारण दिल्ली ही देशाची राजधानी आहे सोबतच दिल्ली ही भारत सरकारचे प्रमुख निर्णय घेतली जाणारी जागा आहे. अशा ठिकाणी साहित्य संमेलन होणे म्हणजे मराठी भाषेला अधिक मान्यता आणि प्रोत्साहन मिळवून देण्याची सुवर्णसंधी आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण दिल्लीतील अखिल भारतीय साहित्य संमेलन अधिक महत्त्वपूर्ण आहे. कारण या संमेलनात साहित्यिकांसोबतच राजकीय नेते, विचारवंत आणि सांस्कृतिक कार्यकर्ते सुद्धा उपस्थित राहतात. यामुळे मराठी साहित्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी हे महत्त्वपूर्ण आहे. दिल्लीतील ९८ वे साहित्य संमेलनाचे एक वेगळेपण देखील सांगता येईल. यंदाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे आयोजित होत आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे कारण दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणे हे मराठीच्या वाढत्या प्रभावाचे द्योतक आहे. महाराष्ट्राच्या बाहेर, राजधानीत होणारे हे संमेलन मराठी संस्कृती आणि साहित्याचा देशव्यापी विस्तार अधोरेखित करणारे ठरणार आहे. यानिमित्ताने मराठी साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक आणि रसिक यांना राष्ट्रीय पातळीवर आपल्या साहित्याचा गोडवा पोहोचवता येणार आहे. राजधानीत होणाऱ्या या साहित्य संमेलनासाठी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून आम्हाला संधी प्राप्त होते, याचा आम्हाला अभिमान आहे. मुळात हिंगोली जिल्ह्याला साहित्याची परंपरा ही संत महात्म्यापासूनच आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील नरसी हे गाव ज्यांची जन्मभूमी आहे असे वारकरी संप्रदायाचे आद्य कवी संत नामदेव महाराजांनी मराठी आणि ब्रज भाषेत कीर्तने रचून समाजामध्ये भक्तीभाव आणि सामाजिक संदेश पेरण्याचे महत्त्वाचे काम केले. आपल्या कवितांमधून ग्रामीण जीवनाचे चित्रण आणि मानवी भावभावनांचे सूक्ष्म वर्णन ज्येष्ठ साहित्यिक फ. मु. शिंदे यांच्याही साहित्याने हिंगोली जिल्हा साहित्य समृद्ध झालेला दिसतो. फ. मुं. शिंदे यांनी मराठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी पार पाडली आहे. जिल्ह्यातील साहित्यिक वारसा समृद्ध करणारे आणखी एक महत्त्वाचे साहित्यिक तु. शं. कुळकर्णी हे मराठीतील कथाकार, कवी आणि चरित्रकार होते. त्यांच्या कथांमध्ये निजाम राजवटीतील सामाजिक, राजकीय स्थित्यंतरांचे प्रतिबिंब आणि मध्यमवर्गीयांच्या जीवनातील कुंठितावस्था यांचे चित्रण आढळते. त्यांच्या कवितांमध्ये यांत्रिकीकरणामुळे मानवी भावविश्वाची कोंडी आणि जीवनातील विफलता यांचे वर्णन आहे. मराठीतील समीक्षक, समाजचिंतक आणि प्रभावी वक्ते म्हणून ज्यांची ओळख साहित्य क्षेत्रात आहे असे नरहर कुरुंदकर यांनी हिंगोली जिल्ह्याची ओळख आपल्या साहित्यातून करून दिली. त्यांनी मराठी साहित्य आणि समाजविषयक विविध विषयांवर लेखन केले. हिंगोली जिल्ह्यातील अशा साहित्यिकांनी मराठी साहित्य विश्वात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि त्यांच्या साहित्यकृतींनी वाचकांच्या मनावर अमिट छाप सोडली आहे. थोडक्यात असे म्हणता येईल की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक मेळावा नाही, तर तो मराठी संस्कृतीचा उत्सव आहे. अभिजात दर्जा आणि दिल्लीत होणारे संमेलन ही दोन्ही महत्त्वाची पर्वणी मराठीच्या सन्मानात भर घालणारी आहे. हे संमेलन केवळ साहित्यिकांसाठी नसून, मराठी भाषा आणि संस्कृती जपणाऱ्या प्रत्येकासाठी अभिमानाचा विषय आहे. ही संमेलन परंपरा पुढील अनेक दशके असाच उत्कर्ष साधत राहो, आणि मराठी भाषा व साहित्याचा लौकिक संपूर्ण जगभर पसरत राहो, हीच अपेक्षा ! - राजकुमार द. मोरगे, हिंगोली. मो. 9834944525 *******

No comments: