21 February, 2025

विशेष लेख - लोककला

भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्या अनुषंगाने प्राचीन काळापासून लोककला जागृत निर्माण झाली आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांच्या भाषेत निर्माण केलेली कला त्याला आपण लोककला म्हणतो. ही कला अविकसित ग्रामीण भागातून निर्माण झाली आहे. जसे की चित्रकला, साहित्य, नृत्य व संगीत या कलांचा समावेश होतो. विशेष म्हणजे लोककला ही कोणत्याही एका व्यक्तीची नसून तीन अनेक लोकांच्या मुखातून व्यक्त झालेली कला आहे. लोककला एकाच व्यक्तीकडून न होता समुहाकडून सादर केल्या जातात. आस्वादही समुहाकडून घेतला जातो. लोककला समूह मनाशी आधारित लोकमाणसांशी संबंधित मनोरंजनाचा प्रकार आहे. यामध्ये लिखित साहित्य आपणास फारसे आढळून येत नाही. कलेतूनच आपणास निसर्ग प्रेम, श्रध्दाळू मन व नाते संबंधाचे चित्रन केले जाते. कला, धर्म, रुढी, परंपरा, सण, उत्सव यांच्याशी संबंधित असतात. लोककला खडतर व कष्टमय जीवनातून आपणास जीवनामध्ये थोडासा विरंगुळा व्हावा म्हणून निर्मिती केलेली जात असत व त्याचा आस्वाद घेतला जाई. लोककला ही कोणत्याही एका विशिष्ट एका जातीची नसते. तिचे प्रतिबिंब भारतातील अनेक जातीतून आपणास पाहावयास मिळतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात लोककला सण उत्सव जास्त प्रमाणात जोपासले जातात. उदा. दसरा, दिवाळी , पोळा आदी. सणाच्या प्रसंगी राहत असलेल्या निवासाच्या भिंतीवर विविध रंगाचा उपयोग करुन चित्रे काढली जातात. ते लोककलेचे प्रतीक मानले जाई. मंदिराच्या भिंतीवर बाह्य किंवा आतील भिंतीवर धार्मिक चित्र काढली जातात. मंदिराच्या भिंतीवर रामायण व महाभारतातील प्रसंग चित्रित केले जात. सार्वजनिक प्रकारची नृत्ये व गीते सादर केले जात. या कलेमध्ये कुठलेही क्लिष्टपणा नसे. ज्या बोली भाषेतून ही कला सादर होत असे त्या बोलीभाषेतून द्विअर्थ निघत असे. त्यामुळे या लोककलेतून लोकांचे मनोरंजन सतत होत असे. द्विअर्थी भाषेतूनच तमाशा व लावणी ही महाराष्ट्रातील परंपरा जोपासली जाते. यामधूनच चित्रपट निर्मिती होत असे. प्रसिध्द मराठी चित्रपट अभिनेता दादा कोंडके जी चित्रपट निर्मिती केली त्याचे द्विअर्थ शब्द निघतात. त्यावरुन लोककला चित्रपटाच्या माध्यमातून जोपासली जाई. मंदिरावरती जी चित्रपट रेखाटली जात त्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगावर एक चित्रण केलेले आहे. त्यामध्ये शंकर आणि पार्वतीचे चित्र रेखाटले आहे. पार्वती ही रुसली आहे व शंकर महादेव पार्वतीला मनवीत आहेत असे भासवणारे चित्र रेखाटले आहे. म्हणजे प्राचीन काळामध्ये सुध्दा रुसवे फुगवे होत होते आणि प्रेमाने मनवले जात होते. आज सुध्दा ही परंपरा आपणास जीवनामध्ये पहावयास मिळते. लोककलामध्ये उपयोगात आणलेले वाद्य , वेशभूषा ही ज्या ज्या पध्दतीने लोककला विकसित होत गेली त्या त्या पध्दतीतील समुहाशी लोककलावंतांनी तयार केलेली असतं. वासुदेव आपणास त्याची वेशभूषा माहीत आहे. ही एक लोककलेतून संदेश देण्याची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक मोहिमा फत्ते केली ती वासुदेवांच्या संदेशावरुन केली जात. वाघ्या मुरळी ही लोककला अशी आहे की मुरळ्या ह्या दान केल्या जात, सोडल्या जात. गोंधळी हा देवीला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालून जागरण करत असे. मसानजोगी आपणास आलेले कार्य चोख बजावत असे. ज्योतीषी व शाहीरी हे सर्व लोककलेतच येतात. तमाशा, लोकनाट्य, लावणी, भारुडे या लोककलेतून लोकांचे मनोरंजन नव्हे तर एक लोककला जोपासणारी परंपरेचा संदेश जात असे. या मनोरंजनातून लोककलावंतांना आर्थिक मदत होऊन त्यांच्या पोटची उपजिविका होत असे. प्रत्येक कलावंत आपापल्या कलेशी एकनिष्ठ समरस झालेला असे. त्यामुळेच तर लोककला ही लोकप्रिय ठरली आहे. तमाशा, लावणी, पोवाडा, जागरण, गोंधळ, भारुड, वासुदेव, रामलीला, दशावतार, लेझीम, वाघ्या-मुरळी, दिंडी, उखाणे, लग्न समारंभात सादर केली जाणारी लोककला, जात्यावरील गाणी ही एक महत्वाची परंपरा आहे. मंगळागौरी, मोटेवरील गाणी यांचा समावेश हा लोकगीत व लोकसंगीतात, लोकनृत्यात निर्माण झाला आहे. याच लोककला व परंपरा पुढील पिढीला माहिती व्हाव्यात व लोककला जिवंत राहण्यासाठी लोककलेला काही अंशी शासकीय अभय मिळाला आहे. त्यांना प्रतिष्ठा देण्यात येत आहे. या लोककला जिवंत राहिल्या तर आपली संस्कृती आपणास कळेल. आपणास त्याची सतत जाण राहील. परंतु शहरीकरण, आधुनिकीकरणामुळे लोककला संपुष्टात येत आहे. लोककलेचे मूळ स्वरुपही लोप पावत आहे. त्याकरिता नव्याने आपणास ही कला सतत अविरत राहण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. प्रा. डॉ. सुखदेव पिराजी बलखंडे कै. बाबूराव पाटील महाविद्यालय, हिंगोली *******

No comments: