19 February, 2025

जय शिवाजी, जय भारत पदयात्रेला हिंगोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

• उत्साहपूर्ण वातावरणात घुमला ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा • वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वाढविली शान • रक्तदान शिबिराचे जिल्हाधिकारी श्री. गोयल यांच्या हस्ते उद्घाटन • जिल्हाधिकारी श्री. गोयल यांच्या हस्ते 'एक पेड माँ के नाम' अंतर्गत वृक्षारोपण हिंगोली (जिमाका), दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या जय शिवाजी, जय भारत पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरु झालेल्या या पदयात्रेत विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या तालावर विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने केलेल्या सादरीकरणाने यावेळी उपस्थितांची मने जिंकली. तसेच यावेळी जय भवानी, जय शिवाजी या घोषणेने सर्व परिसर दुमदुमून गेला. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा उत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. उल्हास पाटील, कार्याध्यक्ष बिरजू यादव, सचिव सागर पाटील, कल्याण देशमुख यावेळी उपस्थित होते. 'जय शिवाजी, जय भारत' पदयात्रेमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास दीड ते दोन हजार विद्यार्थी, नागरिक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी या पदयात्रेत सहभागी झाले होते. यामध्ये अनेक विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, वारकरी आदी पारंपारिक वेशभूषा केल्या होत्या. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात विविध शाळा, महाविद्यालयांच्या लेझीम, झांज पथकांचे सादरीकरण सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या सळसळत्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पदयात्रेला सुरुवात झाली. अश्वारूढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील विद्यार्थी आणि चित्ररथ या पदयात्रेच्या अग्रस्थानी होते. ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पोस्ट ऑफिस, महात्मा गांधी चौक, महावीर चौक, इंदिरा गांधी चौक मार्गे परत छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे आल्यानंतर पदयात्रेचा समारोप करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह सर्व उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पदयात्रेपूर्वी शासकीय विश्रामगृह परिसरात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते एक पेड नाम अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यावेळी आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी जय शिवाजी, जय भारत पदयात्रेत युवा वर्गाने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. या पदयात्रेत घोडदळ, माजी सैनिक, शिवशंभो ढोलपथक, महिला, बंजारा नृत्य (महिला), शिवरथ, वारकरी भजनी मंडळ, लेझीम पथक, शाळकरी मुले देखावा, नगरपालिका चित्ररथ, लाठी काठी, एनसीसी पथक, शासकीय विविध योजनेचे देखावे, कौशल्य विकास विभागाचे कौशल्य रथ, बँड पथके सहभागी झाली होती. *****

No comments: