09 March, 2018

जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू



जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू
हिंगोली, दि. 09 :  जिल्ह्यात येणाऱ्या कालावधीत दिनांक 18 मार्च रोजी  गुडीपाडवा  सण साजरा करण्यात येणार आहे. सध्या  विधानसभेचे  अर्थसंकल्पीय  अधिवेशन सुरु  असून 10 वी व 12 वी परीक्षा सुरु आहेत.  तसेच शिक्षकांचे  आंदोलन , मराठा आरक्षण, भारीप  बहुजन  महासंघ  यांना मा . न्यायालयाचे आदेशाने  आंदोलनात  जाळपोळीची नुकसान भरपाई करणे  संबंधी  नोटीस  पाठविण्यात  आल्याने त्याचे प्रतिक्रिया  उमटत  आहे तसेच  त्रिपुरामध्ये  अज्ञात  लोकांनी लेनीन  यांचा पुतळा  पाडल्यामुळे  विविध  जातीय  संघटनांमध्ये  प्रतिक्रीया  उमटत त्यामुळे  सध्या असंतोषाचे  वातावरण आहे .
शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव , शेतकऱ्यांना  वीज जोडणी , लोडशेडींग अशा वेगवेगळ्या  प्रश्नांमुळे मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको अशा विविध  प्रश्न हाताळण्यासाठी  व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्याकरिता  संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दिनांक 9 मार्च रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 23 मार्च 2018 रोजीचे  24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील याउद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000000
      


           

      

महिला आर्थिक विकास महामंडळमार्फत




  हिला आर्थिक विकास महामंडळमार्फत
  जागतिक महिला दिनानिमित्त मुद्रा बँक योजना मेळावा संपन्न
            हिंगोली,दि.09: जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समिती आणि  महिला आर्थिक विकास महामंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिम्मित मुद्रा बँक योजनेचा मेळावा व तेजस्विनी संमेलन सोहळा महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालय येथे संपन्न झाला. महिला आर्थिक विकास महामंडळ, हे ग्रामीण व शहरी भागात काम करीत असुन माविमद्वारे महिलांचे बचत गट स्थापन करणे, महिलांचे सक्षमीकरण, गटातील महिलांना बँक कर्ज मिळवून देणे, विविध व्यवसाय उभारण्यास मदत करणे, बचत गटातील महिलांचे जीवनमान उंचविण्याचे कार्य करीत  आहे. या कार्यक्रमास शहरी व ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या संख्यंने सहभागी झाल्या होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या बचत गटातील महिलां, पशुसखी, प्रेरक, cmrc व्यवस्थापक, उद्योजक महिला, सहयोगिनी, यांना यावेळी प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आले.
            यावेळी - अतिरिक्त जिल्हाधिकारी जे. जी. मिणियार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गणेश वाघ,  प्रकल्प अधिकारी एमसीईडीचे प्रसंन्न रत्नपारखी, आय.डी.बी.आय.बँकचे कल्याण वि. कदम, आयसीआयसीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापक  आश्रू भोसले, विभागीय व्यवस्थापक मस्के पंडित,  सहाय्यक प्रकल्प अधिकारी नगर परिषद अनिल इंगोले, सुकाणू समिती, उपाध्यक्षा श्रीमती रेणुका ढगे, माजी मानव विकास अधिकारी राऊत आणि माविमच्या जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती संगीता भोंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी श्री मिनियार म्हणाले की, यांनी महिलांनी चूल व मूल या मधेच गुंतून न राहता इतरही क्षेत्रात प्रगती करावी शासनाच्या अनेक योजना महिलां करिता कार्यान्वित असुन त्याचा लाभ घ्यावा.  प्रधानमंत्री मुद्रा बँक योजने अंतर्गत विनातारण कर्ज मिळण्याची सुविध प्राप्त झाली असून महिलांनी या योजने अंतर्गत कर्ज करुन स्वत:चा व्यवसाय सुरु करावा.
            यावेळी गणेश वाघ यांनी महिला व बालविकास विभागाच्या योजनांची माहिती दिली. तर एमसीईडीचे रत्नपारखी यांनी व्यवसाय व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. श्री. राऊत यांनी उद्योग संधी व व्यवसाय कोशल्य यावर मार्गदर्शन केले. श्री. कल्याण कदम यांनी मुद्रा योजनेची सविस्तर माहिती देऊन या योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा असे यावेळी  आवाहन केले. श्री. श्रीराम वाघमारे यांनी नाब्फिंस च्या कर्ज प्रस्ताव , परतफेड, नियमावली याबद्दल माहिती दिली. श्री भोसले सर यांनी आयसीआयसीआय बँक कर्ज व परतफेड विषयी माहिती दिली.  00000

08 March, 2018


महिला सक्षम झाल्यास समाज आणि राष्ट्र बलवान होऊ शकते
                                          अप्पर जिल्हाधिकारी जे.जी. मिनियार
हिंगोली,दि.8: आज 8 मार्च, जगभरात महिला दिवस साजरा केला जातो. महिलांच्या सामाजिक आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याकरीता महिलांना समान न्याय, हक्क, अधिकार व सन्मान देवूनच महिला सक्षम झाल्यास समाज आणि राष्ट्र बलवान होऊ शकते, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जे.जी. मिनियार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डि.पी.सी. सभागृहात जिल्हा प्रशासन व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) पी. एस. बोरगावकर, पोलीस उपअधिक्षक (गृह) श्रीमती सुजाता पाटील, तहसिलदार श्रीमती प्रतिभा गोरे, तहसिलदार गजानन शिंदे, जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा श्रीमती छाया कुलाल, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक श्रीमती रेणुका तम्मलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म. बा.) गणेश वाघ, ॲडव्होकेट श्री. घुगे, डॉ. गोपाल कदम, डॉ. श्रीमती देशमुख, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी महिला उपस्थित होत्या.
यावेळी श्री. मिनियार पुढे म्हणाले की, जागतिक महिला दिनानिमित्त महिलांची एकूणच परिस्थिती आणि त्यांचे समाजातील स्थान याबद्दल नेहमी चर्चा चालू असते. महिला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. महिला सक्षमीकरणात सर्वात महत्वाची बाब म्हणजे तिला माणुस म्हणुन जगण्याची संधी देऊन तिला तिचे व्यक्तिमत्व विकसित करण्यास समाजातून प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर महिला सर्व क्षेत्रात अव्वल आहेत. मात्र प्रत्येक स्त्रीने आर्थिक स्वावलंबी असणे आवश्यक आहे. मात्र प्रत्येक महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. महिलांच्या सामाजिक आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याकरीता महिलांना समान न्याय, हक्क, अधिकार व सन्मान मिळणे आवश्यक आहे.
यावेळी सुजाता पाटील म्हणाल्या की, महिलांवरील अत्याचार थांबवून महिलांना जागरुक करून समाजात सक्षम करणे आवश्यक आहे. समाजामध्ये महिलांना शिक्षण देऊन पुरुष आणि महिला यांच्यातील दरी कमी करण्याबरोबरच कायद्याच्या शिक्षणाविषयी महिलांनी वळावे. असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
तहसिलदार प्रतिभा गोरे म्हणाल्या की, महिलांकडे पुरुषांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलून समाजामध्ये होत असलेले बालविवाह थांबवण्याचे काम अधिकाऱ्यांबरोबरच महिलांचे सुध्दा आहे. तसेच पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये समानता येऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य, यामध्ये भेदभाव न करता बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण करणे आवश्यक आहे.
निवडणूक उपजिल्हाधिकारी श्री. रणविरकर म्हणाले की, महिलांनी मतदार नोंदणी करून ज्या महिलांचे नावे मतदार यादीत नाही अशा महिलांना मार्गदर्शन करून प्रत्येक महिलांची मतदार नोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिला मतदारांची मतदार नोंदणीची टक्केवारी वाढविण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.
 सामान्य उपजिल्हाधिकारी श्री. बोरगावकर म्हणाले की, पुर्वी महिलांना समाजामध्ये दुय्यम प्रतीचे स्थान होते. महिलांना सतीप्रथा, बालविवाह, केशवपन, एवढ्या समस्यांना सामारे जावे लागत असत. परंतू महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षि कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणाविषयी कार्य करुन महिलांची स्थिती सुधारली. संविधानात महिलांविषयी महत्वाचे कलम आहे. ज्यामध्ये कलम 13, कलम 14, कलम 15-1, कलम 15-3, कलम 21, 23, 39-अ, कलम 51 तसेच महिलांच्या आरक्षणाविषयी झालेल्या घटनादुरूस्ती 73 व 74 बाबत ही मार्गदर्शन केले.
तसेच महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी महिलांना पुरुषांनी निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्याचे आवाहन ही यावेळी त्यांनी केले.
10 ते 19 वर्षाच्या किशोरवयीन मुलींसाठी प्रश्नोतराच्या स्वरुपात मार्गदर्शन करून महिलांना सकस आहार देण्याचे आवाहन डॉ. गोपाल कदम यांनी यावेळी केले. यावेळी श्रीमती डॉ. देशमुख यांनी महिलांच्या प्रजननाबाबत आणि गरोदर असल्यावर घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. ॲडव्होकेट श्री. घुगे यांनी महिलांसाठी असलेल्या कायद्याविषयी जनजागृती करणे आवश्यक असून महिलांनी देखील कायद्याबाबत माहिती करुन घ्यावे, असे आवाहन केले.
यावेळी निवडणूक विभागाकडून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या शालेय विद्यार्थींनींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संरक्षण अधिकारी श्रीमती सुर्यवंशी तर आभार नायब तहसिलदार श्री. गळगे यांनी मानले.
***** 


हिंगोली जिल्हा ‘सोशल मिडिया महामित्र’ संवाद सत्र संपन्न
          हिंगोली,दि.8: सोशल मिडिया महामित्र उपक्रमातंर्गत जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तीन क्षेत्रातील एकुण 820 सोशल मिडिया महामित्र सहभागी झाले होते. या पैकी तीस महामित्रांना संवाद चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. या संवाद चर्चेकरीता समाज माध्यमाच्या अनुषंगाने ठरविण्यात आलेले विषय देण्यात आले. या संवादचर्चेतून तीन महामित्रांची निवड करण्यात आली.
            या संवादचर्चेसाठी परिक्षक म्हणुन जिल्हा परषिदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, उपजिल्हाधिकारी, (सामान्य प्रशासन) पी. एस. बोरगावकर, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी,  प्रा. ए. आर. शास्त्री,  प्रा. सुरेंद्र साहू, प्रा. ए. एस. पांपटवार यांनी तर अनुलोमचे शिवाजी पातळे, सुदाम गवळी आणि शंकर सुर्यवंशी यांनी सहकार्य केले.
            प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी सर्व मान्यवरांचे तसेच संवादचर्चेकरीता सहभागी झालेल्या महामित्रांचे स्वागत केले. संवाद चर्चेत सहभागी झालेल्या सर्व महामित्रांना मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र वार्षिकी-2017 ग्रंथ आणि सन्मानपत्र वितरीत करण्यात आले.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                  
****

07 March, 2018

पारधी विकास योजने अंतर्गत ॲप ॲटो योजनेकरीता अर्ज करण्यास मुदतवाढ



पारधी विकास योजने अंतर्गत ॲप ॲटो योजनेकरीता अर्ज करण्यास मुदतवाढ

हिंगोली,दि.07: पारधी विकास  योजना सन 2016-17 हिंगोली जिल्ह्या अंतर्गत पारधी जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार  युवक/युवतींना मालवाहू ॲपे ॲटो पुरवठा करणे या योजनेसाठी लाभार्थ्यांकडून आवेदन अर्ज दिनांक 29 /12/2017 पर्यंत  मागविण्यात आले होते . परंतू विहित कालावधीमध्ये  पात्र  लाभार्थ्यांचे अर्ज पुरेशा  प्रमाणात  प्राप्त  न झाल्यामुळे व प्राप्त अर्जांची पडताळणी  केली असता बऱ्याच अर्जांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत. सबब यापूर्वी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी  नव्याने अर्ज न करता त्रुटीच्या कागदपत्रांची पूर्तता करावी व नवीन इच्छूक लाभार्थ्यांनाही अर्ज सादर करण्यास दि. 15 मार्च, 2018 पर्यंत मुदतवाढ  देण्यात येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयात उपलब्ध असून इच्छूक लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प, कळमनुरी, हिंगोली यांचे नावे येाजनेचा लाभ घेण्यासाठी परिपूर्ण  कागदापत्रांसह आवेदन अर्ज विहित मुदतीत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. पारधी समाजाच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना मालवाहू ॲपे ॲटो  पुरवठा करणे (हिंगोली जिल्ह्याकरिता) विहित मुदतीनंतर आलेले व अपूर्ण  असलेले आवेदन अर्ज स्विकारले जाणार नाहीत असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प, कळमनुरी, हिंगोली यांनी  कळविले आहे.
00000



मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध
हिंगोली,दि.07: 65 वी  वाहिनी  स.सी. बल, येल्की  येथील  कर्मचाऱ्यांचा  गोळीबार सराव घ्यावयाचा असल्याने मौजे वगरवाडी  ता. औंढा , जि. हिंगोली  सर्वे नं. 25 व 29  मध्ये  गोळीबार सराव  मैदान उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे विनंती केली आहे. त्यानूसार महाराष्ट्र जमीन  महसूल  अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील  कलम 33(1) (ख)  व (प)  नुसार मौजे  वगरवाडी  ता. औंढा , जि. हिंगोली  येथील फायरींग रेंज सर्वे नं.25 व 29 या परिसरात  दिनांक 7 मार्च ते 10 मार्च  पर्यंत गोळीबार  सराव  करण्यास  परवानगी  देण्यात येत आहे . 
सदर दिनांकास खालील अटीवर  गोळीबार  सरावासाठी  मैदान उपलब्ध  करुन देण्यात येत आहे. सदर ठिकाण  धोकादायक  क्षेत्र म्हणून  घोषित करण्यात आले आहे  परिसरात  गुरांना न सोडणे व कोणत्याही  व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना  पोलीस अधिकारी यांनी  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  संबंधित  गावी सर्व संबंधितांना  द्याव्यात. तसेच तहसिलदार औंढा ना. व पोलीस  स्टेशन हट्टा  यांनी मौ. वगरवाडी  फायरींग बट व परिसरात  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  या आदेशाची प्रसिध्दी करावी, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे .
0000

28 February, 2018

2 मार्च रोजी जिल्ह्यात मद्य विक्री बंद



2 मार्च रोजी जिल्ह्यात मद्य विक्री बंद
हिंगोली, दि. 28 :-  जिल्ह्यात  दिनांक 2 मार्च रोजी धुलीवंदन हा सण  साजरा केला  जात आहे .  त्याअनुषंगाने  या काळात  जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था  राखण्यासाठी  मुंबई दारुबंदी  कायदा 1949 चे कलम 142 अन्वये  जिल्हाधिकारी  यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा  वापर करुन असे आदेशित  करण्यात  येते की ,  हिंगोली  जिल्ह्यातील  सर्व किरकोळ  व ठोक  मद्य विक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार पूर्णत: बंद ठेवण्यात यावेत. 
वरील आदेशाचा भंग करणाऱ्या  अनुज्ञप्तीधारकाविरुध्द मुंबई  दारुबंदी कायदा 1949 कलम 54 व 56 अंतर्गत कडक  कारवाई  करण्यात येईल  यांची सर्व अनुज्ञप्तीधारकांनी  नोंद घ्यावी .
0000000