15 September, 2026

नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा; गुणवत्तेला प्राधान्य द्या– जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली, दि. १५ (जिमाका) : बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे जुन्या तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. विकासकामांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने शिवलीला पॅलेस येथे मंगळवारी (दि. १५) भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, बी. के. शिंदे यांच्यासह शाखा अभियंते, उपअभियंते व कंत्राटदार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गुप्ता म्हणाले, जिल्हा परिषदेच्या बांधकाम, पाणीपुरवठा व जलसंधारण विभागात ६७ अभियंते कार्यरत आहेत. अनेक पदे रिक्त असतानाही अभियंत्यांनी विकासकामे मार्गी लावली आहेत. आगामी काळात विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. मात्र, निधीसोबतच कामाची गुणवत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहे.
उपलब्ध डेटाच्या आधारे कामांचे प्रभावी निरीक्षण करता येते. त्यामुळे अभियंत्यांनी मूलभूत ज्ञानासोबत नवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. शासनही आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासावर भर देत आहे. त्याचा प्रभावी वापर अभियंत्यांनी करावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी राजेंद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संदेश देशमुख यांनी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
नवीन कामे करताना केवळ काम पूर्ण करण्यापेक्षा त्याची गुणवत्ता महत्त्वाची आहे. तलाव, बंधारे तसेच इतर विकासकामे दर्जेदार होण्यासाठी अभियंत्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी सांगितले.

 *अभियंता दिन सन्मानाचा* 
अभियंता दिन हा अभियंत्यांप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी अभियंत्यांच्या कार्याचा सन्मान करणे महत्त्वाचे आहे. इमारती, रस्ते आणि इतर विकासकामांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सांगितले.

 *अभियंता दिनी २० जणांचे रक्तदान* 
अभियंता दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात सुमारे १८ ते २० अभियंत्यांनी रक्तदान केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीतील डॉ. रेश्मा चव्हाण, डॉ. तेजस्विनी तुरुकमाने, रामेश्वर गरुड, संदीप सोळुंके, अजय जाधव, अंगद जाधवर, गंगाधर बांगर व संतोष ठाकरे यांनी रक्तसंकलन केले.

No comments: