23 August, 2024

डेंग्यू, हिवताप आजाराच्या निर्मूलनासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा • जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत डास आळी सर्व्हेक्षण व गप्पी मासे पैदास केंद्र स्थापन

हिंगोली (जिमाका), दि. 23 : कीटकजन्य आजार डेंग्यू व हिवताप निर्मूलनासाठी उपचाराबरोबर प्रतिबंध महत्त्वाचा आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी परिसर स्वच्छ राखणे आवश्यक असल्याने नागरिकांनी प्रामुख्याने पावसाळ्यात याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू, चिकन गूनिया आणि हिवताप आजाराविषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना व अंमलबजावणीमध्ये सक्रिय सहभाग करून घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करून जनजागृती करण्यात येत आहे. वापरण्याचे पाणीसाठे हौद, रांजन, टाकी यांची तपासणी करण्यात येत आहे. डास आळी आढळून आलेल्या भांडीमध्ये डास आळी नाशक औषधे टाकण्यात येत असुन छोटे कंटेनर रिकामी केली जात आहेत. डेंग्यू, हिवताप हा किटकजन्य आजार असून अनेक आजारांपैकी एक गंभीर आजार आहे. गर्भवती महिला व बालकांना यांचा सर्वाधिक धोका संभवतो. वेळीच उपचार घ्यावा. आवश्यक उपायोजना कीटकनाशक, आळी नाशकाची, डासोउत्पत्ती स्थानामध्ये डासअळी भक्षक गप्पी मासे सोडणे, डासांचा उपद्रव पूर्णपणे टाळण्यासाठी पाण्याच्या सर्व टाक्या तसेच पिंप साठे व्यवस्थित झाकून ठेवावे. इमारतीच्या गच्चीवर आणि परिसरात अनावश्यक पाणी साचू देऊ नये. वैयक्तिक सुरक्षिततेसाठी मच्छरदाणीचा वापर करावा, डास प्रतिबंधक यंत्रे, मलम, अगरबत्तीचा वापर, घरांच्या खिडक्यांना बारीक जाळीचे पडदे लावणे, घराच्या व सभोवताली परिसरामध्ये पाण्याची डबके साचू देऊ नये. ते वाहते करावी किंवा त्यामध्ये जळके ऑइल किंवा रॉकेल टाकावे, नारळाच्या करवंट्या, टायर्स, फुलदाण्या, कुलर्स यामध्ये पाणी साचू देऊ नये. आठवड्यातून एक दिवस शनिवार हा कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा. या दिवशी आपल्या घरातील सर्व पाणी साठा स्वच्छ पुसून कोरडे करून त्यानंतरच त्यामध्ये पाणी भरावे. जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. कोरडा दिवस पाळा, डेंग्यू हिवताप आजार टाळा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले आहे. *******

No comments: