01 August, 2024

राज्यात 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 पीकविमा अर्ज दाखल, लाखो शेतकऱ्यांनी एक रुपयात भरला आपला पीकविमा - धनंजय मुंडे

• 15 जुलैला मुदतवाढ दिल्यानंतर 21 लाख 90 हजार अर्जांची वाढ ! • पीक विम्यापोटी राज्य शासन भरणार 4725 कोटींचा हिस्सा हिंगोली (जिमाका), दि. 01 : खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत 31 जुलै अखेर राज्यातून 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 अर्ज पोर्टलवर दाखल झाले आहेत. याव्दारे लाखो शेतकऱ्यांनी आपले पीक केवळ 1 रुपया विमा हफ्ता भरून संरक्षित केले असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पीकविमा पोर्टलच्या वतीने सुरुवातीला 15 जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे बरेच शेतकरी तेव्हा विमा भरण्यापासून वंचित राहिल्याने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विनंती करून 31 जुलैपर्यंत मुदतवाढ करून घेतली होती. 15 जुलैनंतर 21 लाख 90 हजार अर्जांची वाढ झाली आहे. दरम्यान राज्यात एकूण 97टक्के पेरणी पूर्ण झाली असून पीकविमा योजनेच्या माध्यमातून एकूण 1 कोटी 10 लाख 55 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे. तर एकूण विमा संरक्षित रक्कम ही 53 हजार 886 कोटी इतकी आहे. एकूण विमा हफ्ता हा सुमारे 7959 कोटी इतका निश्चित असून, त्यापैकी शेतकरी हिस्सा एक रुपया प्रमाणे 1 कोटी 65 लाख, राज्य हिस्सा एकूण 4725 कोटी आहे. त्यामध्ये राज्य शासनाचा स्वतःचा हिस्सा 3232 कोटी व शेतकऱ्यांच्या वतीने राज्य शासनाने भरावयाचा हिस्सा 1492 कोटी इतका निश्चित करण्यात आला तर केंद्र सरकारचा हिस्सा 3233 कोटी इतका निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये सुमारे 1 कोटी 71 लाख विमा अर्ज दाखल झाले होते तर संपूर्ण हंगामात वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्यापोटी आतापर्यंत 7280 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 4271 कोटी पिक विम्याचे वाटप पूर्ण झाले असून, आणखी 3009 कोटी रुपयांचे वितरण सध्या सुरू आहे. अंतिम पीक कापणी अहवालाचे काम 100 टक्के पूर्ण झाल्यानंतर या रकमेत आणखी वाढ होणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ******

No comments: