30 June, 2024

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ, दोन जुलै पर्यंत करा अर्ज

*माता मृत्यू, बालमृत्यू दरात घट करण्यासाठी आहे ही योजना* हिंगोली (जिमाका), दि. ३० : माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित केले जात आहे. त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे. माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू केलेली आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी मंत्रालय महिला व बालकल्याण विभाग नवी दिल्ली द्वारे २ जुलै पर्यंत ऑनलाइन लाभार्थी नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात पहिले अपत्य व दुसरे अपत्य मुलगी असलेल्या पात्र लाभार्थ्यासाठी २ जुलै पर्यंत विशेष ऑनलाइन फॉर्म भरण्याची मोहीम सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी सांगितले आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2.0 राज्यात ९ ऑक्टोंबर २०२३ पासून लागू झालेली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील आशा वर्कर व आरोग्य सेविकामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व आरोग्य संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये ऑनलाईन नवीन लाभार्थी नोंदणी व पोस्टाचे इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आय पी पी बी) खाते उघडणे बाबत अभियान राबविण्यात येऊन जन जागृती करण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील देशमुख यांनी केले आहे . *कोणाला दिला जातो लाभ?* या योजनेचा लाभ पहिल्या जिवंत अपत्यासाठी ५ हजार रुपयांचा दोन टप्प्यात तसेच दुसरे अपत्य मुलगी असल्यास ६ हजार रुपयांचा लाभ एकाच टप्प्यात थेट आधार लिंक व डीबीटी ( एन पी सी आय) लिंक असलेल्या खात्यात जमा केली जाते. ही योजना शासकीय सेवेत, खाजगी सेवेत किंवा ज्या मातेला सहा महिन्याची प्रसूती रजा मंजूर आहे अशा माता वगळून इतर सर्व मातांना देय आहे. *ग्रामीण भागात जनजागृती व्हावी* आशा वर्कर व आरोग्य सेविका यांच्यामार्फत महिलांना मातृत्व वंदना योजने अर्ज सादर करण्याबाबत सांगितले जाते. मातृत्व वंदना योजनेअंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने महिलांना लाभ दिला जातो याबाबत जनजागृती केली जात आहे. *लाभासाठी हे आहेत निकष* योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत असावे. यासाठी तहसीलदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे लागेल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांना जात प्रमाणपत्र जोडावे लागेल. दिव्यांग महिलासाठी किमान ४० टक्के दिव्यांगात्वाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल बीपीएल शिधापत्रिका धारकासाठी त्यांच्या नावाचे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थी ई-श्रम कार्ड धारक करणाऱ्या महिला, किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला, शेतकरी मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला आदी निकष आहेत. *******

No comments: