20 June, 2024

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज आमंत्रित

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज आमंत्रित हिंगोली (जिमाका), दि. 20 : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या 13 डिसेंबर 2023 शासन निर्णयान्वये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु करण्यात आली आहे. तरी गरजू व पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण व व्यावसाईक शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असणाऱ्या व वसतिगृहात प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वार्षिक शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी वसतिगृहाप्रमाणे निवास, भोजन व अन्य सुविधाअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यात थेट रक्कम या योजनेतून जमा करण्यात येते. या योजनेंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी दिनांक 01 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक श्री. गायकवाड यांनी केले आहे. योजनेचे निकष : विद्यार्थी शासकीय वसतिगृहास प्रवेश घेण्यास पात्र तसेच महाराष्ट्राचा रहिवासी असावा. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थी हा इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गातील असावा. विद्यार्थ्यांने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. या योजनेसाठी इतर मागास बहूजन कल्याण विभाग शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास वर्ग विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक राष्ट्रीयकृत शेड्यूल्ड बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी स्थानिक रहिवाशी नसावा. नगर पालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालय, शैक्षणिक संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. इयत्ता 12 वीमध्ये किमान 60 टक्के गुण असणाऱ्यांना पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी लाभ घेता येईल. व्यावसायिक शिक्षण प्रथम, व्दितीय, तृतीय, चतुर्थ वर्षात किंवा पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थीच या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेमध्ये दिव्यांग (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास वर्ग घटकातील) विद्याथ्यांना 3 टक्के आरक्षण असेल, त्यांना गुणवत्तेची टक्केवारी 50 टक्के इतकी राहील. या योजनेसाठी खास बाब सवलत लागू राहणार नाही. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : जातीचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचा पुरावा, आधार कार्ड, बँक पासबूक सत्यप्रत, उत्पनाचे प्रमाणपत्र 2.50 लाखाच्या आत व फॉर्म नंबर 16, विद्यार्थी दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र, भाड्याने राहत असल्याबाबत भाडे चिठ्ठी व भाडे करारपत्र व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र नोटरी केलेले, स्वयंघोषणापत्र, इयत्ता 12 वी व पदवी परीक्षेचे गुणपत्रक, महाविद्यालयाचे बोनाफाईट, विद्यार्थिनी विवाहीत असल्यास पतीचा उत्पनाचा पुरावा, बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असल्याचा पुरावा, विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र जोडावे. स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, विद्यार्थी राहत असल्याचा पुरावा (भाडेकरारनामा), महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र, सत्र परीक्षेच्या निकालाची सत्यप्रत, विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहास प्रवेशासाठी अर्ज सादर केलेला असावा व शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. अर्जाचा विहीत नमुना सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, हिंगोली या कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेला असून, गरजू विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ******

No comments: