10 January, 2017

सैनिक-माजी सैनिक व कुटूंबियांचे प्रश्न वेळेत सोडवावेत
                                                        -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
हिंगोली, दि. 10 : नैसर्गिक किंवा अन्य आपत्तीच्यावेळी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत भारतीय सैनिक हे सदैव देशाचे रक्षण करण्यासाठी सुसज्ज असते. कोणत्याही परिस्थितीत सशस्त्र सेना दल नेहमी बहुमोल कामगिरी करते. या कामगिरीचा संवेदनशीलपणे विचार करुन सेना दलातील या सैनिकांचे तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचे विविध प्रश्न सर्व संबंधित विभागांनी वेळेत सोडविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय माजी सैनिक-विधवा व उत्कृष्ट ध्वजदिन निधी सकंलन करणाऱ्यांचा सत्कार तसेच लाभार्थ्यांना धनादेश वाटप कार्यक्रमात श्री. भंडारी बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि) आर. आर. जाधव, ले. कर्नल (नि) सुरेश कातनेश्वरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी श्री. भंडारी म्हणाले की, देशसेवा केल्यानंतर सैन्यातून निवृत्त झालेल्या सैनिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. माजी सैनिकांसाठी आरोग्य शिबीराचे वेळोवेळी आयोजन करण्यात यावे. इएसआय रुग्णालय नांदेड येथे असल्यामुळे जिल्ह्यातील माजी सैनिक किंवा त्यांच्या कुटूंबियांना तेथे जाण्यास वेळ जातो. याकरीता येथील जिल्हा रुग्णालयात इएसआय रुग्णालयाचा एक कक्ष सुरु करता येईल का याचा विचार होणे आवश्यक आहे. माजी सैनिकांनी शासनाच्या विविध योजनाचा आपल्यासाठी तसेच आपल्या गावासाठी मिळावा याकरीता पुढाकार घ्यावा. तसेच सर्व शासकीय योजनासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याने सर्व माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबीयांनी आपाले आधार कार्ड काढून घ्यावे असे ही आवाहन श्री. भंडारी यांनी यावेळी केले.
      जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) आर. आर. जाधव प्रास्ताविकात ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्टपूर्ती करणाऱ्या सर्व विभागांचे अभिनंदन करत म्हणाले की, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जात असून माजी सैनिकांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी शिष्‍यवृत्‍तीच्या योजना राबविल्या जातात. याचा माजी सैनिकांच्या पाल्यांनी लाभ घ्यावा. 
             यावेळी ध्‍वजदिन निधी संकलनात उद्दिष्टपुर्ती करणाऱ्या विविध विभागांचा प्रशस्‍तीपत्रक देऊन, तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांना सन 2016-17 मध्ये मंजूर  झालेल्या शिष्यवृत्ती धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. तसेच 03 जूलै, 2005 रोजी ऑपरेशन रक्षक मध्ये शहीद झालेले जिल्ह्यातील शहीद रणवीर गणपत भिकाजी यांच्या वीर माता-पिता श्री. भिकाजी रणवीर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमास माजी सैनिक त्यांचे कूटंबीय यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

                                                                        *****



No comments: