31 May, 2023

 

जिल्हा रुग्णालयात जागतिक तंबाखू नकार दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

 

 




हिंगोली (जिमाका), दि. 31 : जागतिक तंबाखू नकार दिनाच्या निमित्ताने  आज दि. 31 मे, 2023 रोजी जिल्हा रुग्णालयातर्फे तंबाखू विरोधी  पोस्टर  स्पर्धा घेण्यात आली व विजेत्या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी  यांच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आली, त्यानंतर तंबाखू विरोधी साप-सिडी  खेळाच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती  करण्यात आली. तसेच जिल्हा रुग्णालयातून तंबाखू विरोधी घोषणा देत रॅली काढण्यात आली. तसेच दिलीप धामणे व कुलदीप केळकर यांनी उपस्थितांना मारगदर्शन केले. त्यानंतर उपस्थितांना तंबाखू विरोधी शपथ देण्यात आली. अशा विविध कार्यक्रमानी जागतिक तंबाखू नकार दिन साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, अतिरिक्त  जिल्हा  शल्यचिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, निवासी  वैद्यकीय अधिकारी  डॉ. गोपाल कदम, डॉ. भगवान  पुंडगे, डॉ. दिपक मोरे, डॉ. चव्हाण, डॉ. खान, डॉ.मयूर निंबाळकर, ज्ञानेश्वर चौधरी, असि. मेट्रन  क्षीरसागर, साळुंखे, कुलदीप केळकर, आनंद साळवे, घोषणा कोराम, दिलीप धामणे, अरबाज खान तसेच शासकीय नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  कुलदीप केळकर (मानसशास्त्रज्ञ) व आनंद साळवे (सोशल वर्कर) यांनी परिश्रम घेतले.

 

*****

 

 शासकीय कार्यालय व विविध आस्थापनांमध्ये हेल्मेट सक्ती

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : राज्य परिवहन आयुक्तांनी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, नगरपालिका व सर्व शासकीय आस्थापना, शाळा, कॉलेज, महाविद्यालय, विद्यापीठ, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी  तसेच  वरील आस्थापनेत  येणाऱ्या सर्व दुचाकीस्वारांविरुध्द संरक्षक शिरस्त्राण (हेल्मेट)  सक्ती केली आहे.

हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकी चालक व मागे बसलेल्या व्यक्तीविरुध्द मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 129/177, 255 (1) नुसार तसेच कलम 194(3) अन्वये संबंधित आस्थापना प्रमुख यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करुन त्यांच्याकडून एक हजार रुपये दंड तसेच वाहनधारकाची अनुज्ञप्ती 3 महिन्यासाठी निलंबित करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.

त्यामुळे हिंगोली जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, नगरपालिका व सर्व शासकीय आस्थापना, शाळा, कॉलेज, महाविद्यालय, विद्यापीठ, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी तसेच वरील आस्थापनेत येणाऱ्या दुचाकी वाहन चालक, मालक यांनी शासकीय कार्यालय व विविध आस्थापनेच्या कार्यक्षेत्रात दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटसह प्रवेश करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. अन्यथा आपणाविरुध्द मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे अनंता जोशी , उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

 

जवळा (बु.) येथील बाल विवाह थांबविण्यास प्रशासनाला यश

                                                 

                हिंगोली (जिमाका), दि.31 : जिल्ह्यात बाल विवाह समुळ नष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात बाल विवाह निमुर्लन समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006, ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. याच उद्देशाने जिल्ह्यातील मौजे जवळा (बु.) ता. सेनगाव जि. हिंगोली येथील एका अल्पवयीन मुलीचा बाल विवाह होणार असल्याबाबत चाईल्ड लाईन (1098) ला गोपनीय माहिती मिळाली. त्या दरम्यान मौजे जवळा बु. येथील  या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार नरसी पोलीस स्टेशन येथील सहायक पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या सहकार्याने जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, चाईल्ड लाईन समन्वयक स्वप्नील दिपके यांनी घटनास्थळी भेट देवून उपस्थित सर्वांना बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 विषयी माहिती सांगितली. ज्यामध्ये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते. तसेच बाल विवाहाची कारणे व दुष्परिणाम या विषयी सविस्तर मार्गदर्शन करुन बाल विवाह थांबविण्यात आला. बालिकेच्या आई-वडिलाकडून मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही, असा लेखी जबाब लिहून घेण्यात आला.

यावेळी जवळा बु. येथील सरपंच आश्विनीताई शिंदे, पोलीस पाटील एकनाथ देवकर, ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी घनशाम इंगळे, अंगणवाडी सेविका कमल ढोकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रामरतन शिंदे, उपसरपंच रामेश्वर इंगोले आणि बालिकेच्या कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. या बालिकेला पुढील कार्यवाहीसाठी बाल कल्याण समिती, हिंगोली समोर हजर करण्यात आले. त्यानंतर बालिकेच्या वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत बाल कल्याण समिती हिंगोली कडून दर महिन्याला बालिकेबाबत पाठपुरावा करण्यासंदर्भात सूचना महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास देण्यात येतात व त्यानुसार बालिकेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आणि सामाजिक स्थिती/सद्यस्थिती बाबत वेळोवेळी माहिती बाल कल्याण समितीला कळविण्यात येते. तसेच बालिकेच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत नियमित पाठपुरावा घेतला जातो, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

*****

 

शासन आपल्या दारी’’ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी

लाभ धारकांची यादी निश्चित करावी

                                                        - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर




हिंगोली (जिमाका), दि. 31 : जिल्ह्यातील  सर्व विभागाच्या प्रमुखांनी आपल्या विभागांतर्गत असलेल्या योजना अधिकाधिक सकारात्मक भावनेने पोहोचविण्यासाठी  कटिबध्द असले पाहीजे. या अभियानाच्या निमित्ताने  राज्याचे  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांचा दि. 8 जून रोजीचा प्रस्तावित दौरा व इतर मान्यवरांची उपस्थिती  लक्षात  घेता  शासन आपल्या दारी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सर्व  विभागप्रमुखांनी  लाभ धारकांची  यादी  निश्चित करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.  

शासन आपल्या दारी या अभियानानिमित्त आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रतिनिधी डॉ. नितीन राठोड, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी  नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी  दिलीप कच्छवे, जिल्हा नियोजन अधिकारी  सुधाकर जाधव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

सर्वसामान्यांची  कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होण्यासाठी  शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवत असते. गरजूंसाठी  तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकास  प्रक्रियेलाही  त्यातून  गती  मिळत असते. हेच लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे लाभ  मिळावेत  यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान  शासकीय  योजनांच्या  लाभधारकांचे  मनोबल, आत्मविश्वास आणि  शासकीय  योजनांप्रती  सकारात्मकता निर्माण करण्याच्या  दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. या अभियानाच्या  निमित्ताने  विविध  विभागाने  योजनानिहाय लाभार्थ्यांची माहिती तयार करुन ती तात्काळ जिल्हाधिकारी  कार्यालयास  उपलब्ध  करुन  द्यावी. तसेच शासनाच्या विविध  विभागांच्यावतीने  राबविल्या जाणाऱ्या  शासकीय  योजना  आणि  लाभार्थी यांचा समन्वय साधून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन  करावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी  पापळकर यांनी बैठकीत दिले.   

यावेळी  मुख्यमंत्री  कार्यालयाचे  प्रतिनिधी  डॉ. नितीन राठोड यांनी हिंगोली येथील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सर्व विभागांनी आपापल्या विभागाचे नोडल अधिकारी  नेमून  त्यांच्यावर लाभार्थ्यांची  सोय करण्याची  जबाबदारी सोपवावी. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कामे करावेत, अशा सूचना केल्या.

*****

 

जिल्हाधिकारी  कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना

जयंतीनिमित्त अभिवादन

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांच्या हस्ते त्यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी  नायब तहसीलदार डी. एस.जोशी, मधुकर खंडागळे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक रंजना कोठाळे, मिलींद वाकळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

******

30 May, 2023

 

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय )

 

 

350 वा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या उद्घाटनास

पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार संदेश

 

मुंबई, दिनांक 30 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्धल 1 तारखेपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार 2 जून रोजी सकाळी 8.30 वाजता सोहळ्याचा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला संदेश देणार असून त्याचे प्रक्षेपण कार्यक्रमात केले जाणार आहे.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती तसेच इतर लोकप्रतिनिधी व मान्यवर, मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. मंगळवार 6 जून रोजी देखील सकाळी 8.30 वाजता रायगड किल्ल्याच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय 1 जून ते 6 जून या काळात किल्ले रायगड व्यतिरिक्त पाचाड, तसेच गेट वे ऑफ इंडिया येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 2 जून ते 7 जून या काळात पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने देखील सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

सोहळ्यानिमित्त राज्यात वर्षभर विविध कार्यक्रमाच्या आयोजनासोबतच सांस्कृतिक कार्य विभागाने छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय अध्ययन केंद्र, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्राची निर्मिती, राज्यात अकृषिक विद्यापीठस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र, तज्ज्ञ समितीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित साहित्य आणि संदर्भ साहित्याचे डिजिटायझेशन हे उपक्रम पार  पडणार आहेत.

 

*****

 

जागतिक तंबाखू विरोधी दिन

 

जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी 31 मे रोजी सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस. या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देणारा हा लेख.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून तंबाखू नियंत्रणासाठी वेगवेगळे विषय घेऊन वर्षभर कार्य केले जाते. तंबाखूचे होणारे शारीरिक, मानसिक, पर्यावरण विषयक आणि सामाजिक तोटे लक्षात घेऊनच जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी तंबाखूला रोखण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असते. यावर्षी 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त  जागतिक आरोग्य संघटनेतर्फे ‘‘आपल्याला अन्न हवे आहे, तंबाखू नाही’’ ही थीम निवडण्यात आली आहे. वर्ष 2023 च्या जागतिक तंबाखू विरोधी मोहिमेचे उद्दिष्ट तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांसाठी पर्यायी पीक उत्पादन आणि विपणनाच्या संधीबद्दल जागरुकता वाढवणे आणि त्यांना शाश्वत, पौष्टिक पिके घेण्यास प्रोत्साहित करणे आहे. तसेच युवा आणि प्रोढ वर्गाने देखील पुढाकार घेऊन तंबाखूला नाकारुन आपले जीवन आरोग्यदायी जगावे हा देखील एक हेतू आहे. यावर्षी देखील आपण सर्वांनी मिळून ‘‘आपल्याला अन्न हवे आहे, तंबाखू नाही’’ या विषयावर अधिक कार्य करावयाचे आहे.

तंबाखूचे सेवन केल्याने तोंडाचा कर्करोग होतो आणि संपूर्ण जगामध्ये भारत देशात सर्वाधिक मुख कर्करोगाचे रोगी आढळून आलेले आहेत. तंबाखू ही इतर सर्व रोगांची जननी आहे. आज संपूर्ण भारत देशात 28.6 टक्के प्रौढ तंबाखूचे सेवन करत आहेत. तर महाराष्ट्र राज्यात प्रौढ व्यक्तीचे तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण जवळपास 26.6 टक्के आहे. मुलांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 5.1 टक्के युवक (13 ते 15 वयोगट) हे तंबाखूचे सेवन करत आहेत. सिगारेटच्या धूम्रपानाने हवा दूषित होते आणि तंबाखू सेवन केल्याने वातावरण प्रदूषित होते. या सर्व बाबी लक्षात घेऊनच सलाम मुंबई फाऊंडेशनच्या माध्यमातून 2007-08 मध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियान सुरु करण्यात आलेले आहे.

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम :

देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम, हुक्का, तंबाखू मिश्रित पान, तपकीर यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.

तंबाखू सेवनामुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे, केसांना दुर्गंधी येऊन केस गळणे, डोळ्याखाली काळी वर्तुळे होणे, नजर कमी होणे, वास ओळखण्याची क्षमता कमी होणे, तोंडाला दुर्गंधी येणे, दात कमजोर होणे, चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, चेहरा निस्तेज होणे, अशक्तपणा येणे, कमजोरी येणे, हाडे कमजोर होणे, उच्चरक्तदाब होणे, गैंगरिन, लकवा, दमा, कॅन्सर, मधुमेह यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढत आहे. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे.

तंबाखू सोडण्यासाठी काही उपाय :

            तंबाखू सेवनास भाग पाडणाऱ्या लोकांपासून दूर राहणे, तंबाखू ऐवजी बडीसौंफ, लवंग, चणे, शेंगदाणे असे पदार्थ चघळणे. आपले मन कामात गुंतवणे, आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणे.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम :

केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगाने राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून व्यसन करणारे लोक व मुले व्यसनाला बळी पडून अकाली मृत्यू कमी व्हावेत यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जनजागृतीमुळे या व्यसनाचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेचा 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनावर धोक्याच्या सुचना देणे याचा अंतर्भाव होतो. शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्येष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील. व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

व्यसनाधिनतेचे परिणाम आपल्या आजूबाजूला व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना सांगुन त्यांना व्यसनापासून रोखणे व त्यांना त्यापासून परावृत्त करणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध एल्गार केला आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला तर नक्कीच भारतीय नागरिकांचे व भारताचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यास मदत होईल हीच अपेक्षा.  

 

                                                                                                            --- चंद्रकांत कारभारी

                                                                                                                 माहिती सहायक

                                                                                                                 जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

*****

 

निकषाची पूर्तता करुन जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त करावेत

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण आढावा बैठकीत निर्देश

 

  • तंबाखू विरोधी स्वाक्षरी मोहिमेचा जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या हस्ते शुभारंभ

 



हिंगोली (जिमाका), दि. 30 : शिक्षण विभागांनी निकषाची पूर्तता करुन जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितींची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या अधयक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  आरोग्य विभागाचे डॉ. मयूर निंबाळकर, डॉ. श्वेता आचार्य, कुलदीप केळकर, आनंद साळवे, दिलीप धामणे, धम्मदीप नरवाडे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अभिजित संघई, सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालय प्रमुख, अधिकारी  उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी प्रत्येक कार्यालय प्रमुखांचा प्रत्यक्ष तंबाखू नियंत्रणबाबत कार्यवाहीचा आढावा घेतला. यामध्ये आरोग्य व पोलीस विभागाने कार्यवाही केल्याचे निदर्शनास आले आहे. इतर विभागानेही नियमितपणे कार्यवाही करावी. त्याचबरोबर नगर परिषद, राज्य परिवहन, कृषी, बांधकाम, समाजकल्याण आदी विभागांनी आपल्या स्तरावर तंबाखू विरोधी कायद्याचे उलंघन होत असल्यास 200 रुपयापर्यंत दंड आकरण्याबाबत सूचना देण्यात आल्या. नगर परिषद व पोलीस विभाग यांनी शाळांच्या आवारातील तंबाखूची विक्री हटविण्याबाबत कार्यवाही करावी, त्याचबरोबर पोलीस विभागाने तंबाखूबाबत केलेल्या कार्यवाहीचा मासिक अहवाल जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षास पाठवावा, अशा सूचना केल्या.  

जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली तंबाखू विरोधी स्वाक्षरी मोहिम

आज  दि. 30/05/2023 रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या आढावा बैठकीनंतर तंबाखू विरोधी स्वाक्षरी मोहिम घेण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तंबाखू विरोधी फलकावर स्वाक्षरी करुन केले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी उमांकांत पारधी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, उप मुख्याधिकारी हेंबाडे, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, डॉ. मयूर निंबाळकर, डॉ. श्वेता आचार्य, अभिजित संघाई, आनंद साळवे, कुलदीप केळकर, दिलीप धामणे, धम्मदिप नरवाडे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर उपस्थित सर्व कार्यालय प्रमुखांनी तंबाखू विरोधी फलकावर स्वाक्षऱ्या करुन मोहिमेमध्ये सक्रीय सहभाग नोंदविला.

******

 

महाराष्ट्र राज्य नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्रावर 144 कलम लागू


 

            हिंगोली (जिमाका), दि. 30 : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 ही हिंगोली जिल्ह्याच्या ठिकाणी दि. 04 जून, 2023 रोजी सकाळी 10.00 ते दु. 12.00 व दुपारी 3.00 ते सांय. 5.00 या वेळेत घेण्यात येणार आहे.

            ही परीक्षा हिंगोली जिल्ह्यातील आदर्श महाविद्यालय अकोला रोड हिंगोली भाग-अ, आदर्श महाविद्यालय अकोला रोड हिंगोली भाग-ब, सेक्रेट हार्ट इंग्लीश स्कूल शास्त्रीनगर हिंगोली, जिल्हा परिषद कन्या प्रशाला शिवाजीनगर हिंगोली, सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय हिंगोली या पाच परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. या 05 केंद्रावर 1 हजार 200 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.

या परीक्षा केंद्र परिसरात दि. 04 जून, 2023 रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच परीक्षा केंद्रावर सकाळी 8.00 ते सांय. 6.00 या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे निर्बंध असतील.

परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परिसरामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बूथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परिक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्त कामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल.

या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

 

विजेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी  नागरिकांनी खबरदारी घ्यावी

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 30 :  विजेच्या उपाययोजनाबाबत विभागीय आयुक्तांनी दि. 30 मे, 2023 रोजी घेतलेल्या औरंगाबाद विभागाच्या बैठकीत वीज पडून नागरिकांचा मृत्यू तसेच पशुधनाच्या होणाऱ्या नुकसानीबाबत आढावा घेतला. तसेच दरवर्षी होणाऱ्या अशा घटना टाळण्यासाठी जिल्हास्तरावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  

दरवर्षी अंगावर वीज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक तसेच जनावरे मरण पावतात अथवा दुर्घटनाग्रस्त होतात. त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी खालीलप्रमाणे खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.  

                           

आकाशात विजा चमकत असल्यास हे करा :

1)      आकाशात विजेचा कडकडाट होत असताना शेतकऱ्यांनी तसेच नागरीकांनी तात्काळ शेताजवळील घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.  

2)     जवळ आसरा नसेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. तसेच विजेपासून बचावासाठी दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे गुडघ्यामध्ये झुकवा व डोके जमिनीवर टेकणार नाही याची काळजी घ्या.

3)      झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे.

4)    वीजवाहक वस्तूपासून दूर रहा, उदा. विजेचे खांब, टेलीफोन खांब, लोखंडी पाईप ई. पासून दूर राहावे.

5)     वीज पडल्यास प्राथमिक उपचारासाठी मुख्यतः हृदय व श्वसन प्रकियेत अडथळा येतो. त्यामुळे विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाच्या बाजूने मालीश करावी. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी.

6)     विजा चमकत असल्यास संगणक, विद्युत उपकरणे बंद करुन ठेवावीत.

7)     वादळी वाऱ्यासह, पावसाची शक्यता देखील असल्याने शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी यानुसार आपापल्या कामाचे नियोजन करावे.

 

आकाशात विजा चमकत असल्यास हे करु नका :

1)      पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करु नका. बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तात्काळ बंद करावा.   

2)     विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली आश्रय घेऊ नका.

3)      दोन चाकी, सायकल यावर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा.

4)    धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करु नका. 

 

*******

 

खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट योग्य नियोजन करुन वेळेत पूर्ण करावेत

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


हिंगोली (जिमाका), दि. 30 : सर्व बँकानी योग्य नियोजन करुन सन 2023-24 च्या खरीप पीक कर्जाचे जून अखेरपर्यंत जास्तीत पिक कर्जाचे वितरण करुन वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 29 मे, 2023 रोजी जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक शशीकांत सांवत, आरबीआयचे नरसींग कल्याणकर, एसबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक धनाजी बोईले,  विविध बँकेचे अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, चालू वर्षात खरीप पीक कर्जाचे वितरण 13.91 टक्के झाले आहे. सर्व बँकानी जून अखेर पर्यंत जास्तीत जास्त पीक कर्जाचे वितरण करुन वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावेत. यासाठी गावात शिबिराचे (कॅम्प) आयोजन करण्यात यावेत. तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री स्वनिधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यासह विविध योजनेच्या प्रलंबित प्रकरणाचा तात्काळ निपटारा करावा. तसेच आरसेटी मार्फत प्रशिक्षण दिलेल्या लाभार्थ्यांना त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कर्ज देण्यात यावे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी नवीन शाखेची मागणी आहे, त्या ठिकाणी नवीन शाखा सुरु करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. 

गत सन 2022-23 या वर्षामध्ये 988.81 कोटी रुपयाचे पीक कर्ज वितरण करुन 81.58 टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व बँकाचे अभिनंदन केले.

******

 

पिंपराळा येथील बाल विवाह थांबविण्यास प्रशासनाला यश

                                                 

                हिंगोली (जिमाका), दि.30 : जिल्ह्यात बाल विवाह समुळ नष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात बाल विवाह निमुर्लन समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006, ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. याच उद्देशाने जिल्ह्यातील मौजे पिंपराळा. ता. वसमत जि. हिंगोली येथील एका अल्पवयीन मुलीचा बाल विवाह होणार असल्याबाबत चाईल्ड लाईन (1098) ला गोपनीय माहिती मिळाली. त्या दरम्यान मौजे पिंपराळा येथील  या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार कुरुंदा पोलीस स्टेशन येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल बी.आर.बाभळे, व्ही.एन.दळवे यांच्या सहकार्याने जिल्हा बाल संरक्षण कक्षातील वाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, चाईल्ड लाईन टीम मेंबर सुरज इंगळे यांनी घटनास्थळी भेट देवून उपस्थित सर्वांना बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 विषयी माहिती सांगितली. ज्यामध्ये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते. तसेच बाल विवाहाची कारणे व दुष्परिणाम या विषयी सविस्तर मार्गदर्शन करुन बाल विवाह थांबविण्यात आला. बालिकेच्या आई-वडिलाकडून मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही, असा लेखी जबाब लिहून घेण्यात आला.

यावेळी पिंपराळा येथील सरपंच अनिता कदम, पोलीस पाटील संजय कदम, ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी आर.आर.तेलघोटे, अंगणवाडी सेविका द्वारका पंडित आणि बालिकेच्या कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. या बालिकेला पुढील कार्यवाहीसाठी बाल कल्याण समिती, हिंगोली समोर हजर करण्यात आले. त्यानंतर बालिकेच्या वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत बाल कल्याण समिती हिंगोली कडून दर महिन्याला बालिकेबाबत पाठपुरावा करण्यासंदर्भात सूचना महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास देण्यात येतात व त्यानुसार बालिकेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आणि सामाजिक स्थिती/सद्यस्थिती बाबत वेळोवेळी माहिती बाल कल्याण समितीला कळविण्यात येते. तसेच बालिकेच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत नियमित पाठपुरावा घेतला जातो, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

*****

28 May, 2023

 

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना जयंतीनिमित्त  जिल्हाधिकारी  कार्यालयात अभिवादन

 

 


हिंगोली (जिमाका), दि. 28 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या हस्ते त्यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी   जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, उद्योग निरीक्षक पी. व्ही. मेंढे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

******

27 May, 2023

 गेली ७ ते ८ वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली काढल्याबद्दल  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व सहा. आयुक्त शिवानंद मिणगिरे यांचा दिशा समितीच्या बैठकीत अभिनंदन


         हिंगोली (जिमाका),दि.२७ : कळमनुरी तालुक्यातील मौजे पिंपळदरी येथील सैन्यामध्ये असलेल्या जवानाचा कार्यरत असताना मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या वृद्ध आईला जगण्याचा आधार म्हणूून सामाजिक न्याय विभागाकडून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेतून ४ एकर शेती मोफत देण्यासाठी शासन स्तरावरुन अट शिथील करुन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी स्वतः जमीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला व मागील 7 ते 8 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावला. त्याबद्दल दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे या दोघांचेही दिशा समितीच्या बैठकीत अभिनंदन केले .

****

26 May, 2023

 

जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण

                                                                                         


                    

            हिंगोली (जिमाका), दि.26 : जिल्ह्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार जिल्हा महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. दरवर्षी जिल्ह्यातील बालकांच्या संदर्भात नियमित विविध उपक्रम राबविण्यात येतात. अशाच प्रकारचे जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून शहरी भागामध्ये रस्त्यावर राहत असलेल्या मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. जी मुले कुटुंबापासून दूर गेली आहेत आणि रस्त्यांवर राहत आहेत किंवा जी मुले रस्त्यांवर काम करतात आणि कामानंतर कुटुंबात परत जातात त्यांना रस्त्यावरील मुले मानली जातात. हलाकीची परिस्थिती असलेले कुटुंब उदारनिर्वाहासाठी तसेच काही जमातीमधील कुटुंब भिक्षा मागण्याच्या उद्देशाने शहरी भागामध्ये येतात. त्या मुलांचा भिक्षा मागण्यासाठी व बालकामगार म्हणून उपयोग केला जातो. अशी मुले शिक्षणापासून वंचित राहतात. ही मुले गुन्हेगारीकडे वळू नये, त्यांना शिक्षण, आरोग्य तसेच इतर शासकीय योजना मिळाव्यात व सामाजिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासन स्तरावरुन विविध प्रयत्न केले जातात. त्यांना रस्त्यावर आणणारा मार्ग हा त्यांच्या निवडीचा नव्हता अशा बालकांपर्यंत पोहचण्यासाठी बाल संरक्षण कक्षामार्फत जिल्ह्यातील रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

या सर्वेक्षणात आढळून आलेल्या बालकांना बाल बाल कल्याण समिती, हिंगोली समोर सादर करण्यात येईल व बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये आवश्यकतेनुसार बालकांना शासकीय योजनेचा लाभ देण्यात येईल.

यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, कायदा तथा परिविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, रेशमा पठाण, माहिती विश्लेषक शेख रफीक शेख जिलानी, डाटा एन्ट्री ऑपरेटर राहुल सिरसाट, क्षेत्रबाह्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत, लेखापाल शितल भंडारे इत्यादी कर्मचाऱ्यांच्या टिमच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये हॉटस्पॉट ठरवून बालकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, हिंगोली यांनी दिली आहे.

*****

 

प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आंबाळा येथील बाल विवाह थांबविण्यात यश

                                                 

                हिंगोली (जिमाका), दि.26 : जिल्ह्यात बाल विवाह समुळ नष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात बाल विवाह निमुर्लन समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006, ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. याच उद्देशाने जिल्ह्यातील मौजे आंबाळा. ता. जि. हिंगोली येथील एका अल्पवयीन मुलीचा बाल विवाह होणार असल्याबाबत चाईल्ड लाईन (1098) ला गोपनीय माहिती मिळाली. त्या दरम्यान मौजे आंबाळा येथील  या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार तसेच हिंगोली पोलीस स्टेशन (ग्रामीण) येथील बिट जमादार ए.एस.उंबरकर यांच्या सहकार्याने जिल्हा बाल संरक्षण कक्षातील वाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक स्वप्नील दिपके यांनी घटनास्थळी भेट देवून उपस्थित सर्वांना बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 विषयी माहिती सांगितली. ज्यामध्ये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते. तसेच बाल विवाहाची कारणे व दुष्परिणाम या विषयी सविस्तर मार्गदर्शन करुन बाल विवाह थांबविण्यात आला. बालिकेच्या आई-वडिलाकडून मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही, असा लेखी जबाब लिहून घेण्यात आला.

यावेळी आंबाळा येथील सरपंच नामदेव ग्यानदेव इंगोले, पोलीस पाटील मुरलीधर नारायण इंगोले, ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी विवेक वसंतराव सावळे, अंगणवाडी सेविका- लताबाई सुदाम भिसे आणि बालिकेच्या कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. या बालिकेला पुढील कार्यवाहीसाठी बाल कल्याण समिती, हिंगोली समोर हजर करण्यात आले असून सदर बालिकेला व तिच्या आई-वडील यांना जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे व सामाजिक कार्यकर्ता रेशमा पठाण यांच्याकडून समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर बालिकेच्या वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत बाल कल्याण समिती हिंगोली कडून दर महिन्याला बालिकेबाबत पाठपुरावा करण्यासंदर्भात सूचना महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास देण्यात येतात व त्यानुसार बालिकेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आणि सामाजिक स्थिती/सद्यस्थिती बाबत वेळोवेळी माहिती बाल कल्याण समितीला कळविण्यात येते. तसेच बालिकेच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत नियमित पाठपुरावा घेतला जातो, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

*****

 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

इच्छूक उमेदवारांनी 10 जून रोजी मुलाखतीस हजर रहावे

 

            हिंगोली (जिमाका), दि.26 : संघ लोकसेवा आयोग (युपीएससी), नवी दिल्ली यांच्यामार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारासाठी दि. 3 सप्टेबर, 2023 रोजी घेण्यात येणाऱ्या कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परीक्षेसाठी दि. 19 मे, 2023 रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूज (रोजगार समाचार) मध्ये जाहिरात पसिध्द झाली होती. संघ लोकसेवा आयोगाकडे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 6 जून, 2023 अशी होती. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी www.upsconline.nic.in या संकेतस्थळाचा वापर करावा. कंम्बाईंड डिफेन्स सर्विसेस (सीडीएस) या परीक्षेद्वारा कायमस्वरुपी व अल्पमुदतीचे कमीशन साठी निवड करण्यात येते.

            कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 19 जून, 2023 ते दि. 1 सप्टेंबर, 2023 या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक 61 चे आयोजन करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क (मोफत) सोय करण्यात आलेली आहे.

            हिंगोली जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, हिंगोली येथे दि. 10 जून, 2023 रोजी मुलाखतीस हजर रहावेत. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे (डीएसडब्ल्यू) यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन (Other-PCTC Nashik CDS-61) कोर्ससाठी संबंधित या परिशिष्टांची प्रिंट काढून व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन जावेत.

            अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्रमांक 0253-245032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरुन संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****