15 May, 2023

 राष्ट्रीय डेंग्यू दिवस :

 

डेंग्यू आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वांनी जागरुक राहू या !  

 

 

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यात दरवर्षी 16 मे हा  दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना या आजाराबद्दल जागरुक करणे आणि त्याची लक्षणे, कारणे आणि उपचारांबद्दल माहिती देण्यासाठी हा दिवस आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे साजरा केला जातो.

डेंग्यू  हा अत्यंत गंभीर आजारांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो लोक या आजाराने ग्रस्त आहेत. तर काही लोकांसाठी हा आजार जीवघेणाही ठरतो. विशेषतः पावसाच्या सुरुवातीच्या काळात डेंग्यूचे रुग्ण सर्वाधिक आढळतात. राज्यात तापाच्या साथीमध्ये प्रामुख्याने डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत लोकांनी डेंग्यू या आजाराबाबत जागरुक राहिले पाहिजे. यासाठी दरवर्षी 16 मे हा 'राष्ट्रीय डेंग्यू दिवस' म्हणून साजरा केला जातो.

हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यू दिन यशस्वी होण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.गणेश जोगदंड यांनी आवाहन केले आहे. डेंग्यूविषयी जनजागृती, कारणे, लक्षणे, उपचार, उपाययोजना याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.

राष्ट्रीय डेंग्यू दिवस जनजागृती : यानिमित्त जिल्ह्यात डेंग्यू विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे नागरिकांपर्यत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या उन्हाळा सुरु आहे. राज्यात हवामानात बदल तसेच जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थतीमुळे बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाण्याचा तुटवडा असल्याने पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात न झाल्याने लोकाची पाणी साठवण्याची प्रवृत्ती आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्या अनुषंगाने अशा साठवलेल्या पाण्यात एडीस एजिप्टाय डास अंडी घालून डासोत्पती होते. या डासाची उत्पती कमी करणे, नियंत्रणात ठेवणे यासाठी जनतेस आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. आजाराचे नियंत्रण करण्यासाठी जनतेचा सहभाग आवश्यक आहे. केंद्र शासनाने डेंग्यू या विषयावर India Fights Dengu हे मोबाईल ॲप्लीकेशन तयार केलेले आहे. त्याच प्रमाणे ॲन्ड्राईड मोबाईलवर प्ले स्टोअर मध्ये जाऊन India Fights Dengu हे ॲप शोधावे व मोबाईलवर ते डाऊनलोड करुन घ्यावे. यामध्ये डेंग्यू विषयी सर्व माहिती उपलब्ध आहे.

डेंग्यू आजाराची कारणे : डेंग्यू हा डासांपासून पसरणारा रोग आहे. साचलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या वाढतात. डेंग्यूचा डास चावल्याने डेंग्यू होतो. जुलै ते ऑक्टोबर हे महिने डेंग्यूच्या अळ्यांच्या प्रजननासाठी अनुकूल असतात. या काळात पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता अधिक असते. अशा साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या वाढू शकतात. डेंग्यूमध्ये अनेक प्रकारची सुरुवातीची लक्षणे दिसू शकतात.

डेंग्यू आजाराची लक्षणे : एडीस एजिप्टाय डासाच्या संक्रमणात्मक चांव्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर डेग्यूंची लागण होते. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक हा ताप अधिक तीव्र स्वरुपाचा असून त्यामुळे मृत्यू ओढावू शकतो. लहान मुलांमध्ये शक्यतो सौम्य स्वरुपाचा ताप येतो. मोठ्या माणसामध्ये अधिक तीव्रपणे तापासोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अंगावर लाल रंगाचा चट्टा येणे, सांधे आणि स्नायूंमध्ये तीव्र वेदना जाणवणे, थकवा, उलट्या होणे, मळमळ, नाक, हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे या प्रकारची लक्षणे आढळून येतात.  

उपचार : सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपचार उपलब्ध आहे .

डेंग्यू टाळण्यासाठी उपाय योजना : डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडीस एजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी 8 दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालून अंड्याचे रुपांतर डासात होते. त्यानुषंगाने कोणतेही साठवलेले पाणी 8 दिवसापेक्षा जास्त ठेवू नये, डासोत्पती नियंत्रणासाठी गप्पी माशांची उपयुक्तता, परिसर स्वच्छता, व्यक्तीगत सुरक्षेअंतर्गत मच्छरदाण्यांचा वापर, डासांच्या चाव्यापासून रक्षणासाठी विविध उपाय करण्यासाठी कोरडा दिवस पाळून किटकजन्य आजार डेंग्यू आजारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या घराच्या आत किंवा बाहेर डासांची पैदास होऊ देऊ नका. घरामध्ये घाण पाणी साचू देऊ नका. भांड्यात पाणी किंवा छतावर इतर कोणतीही वस्तू असल्यास लगेच फेकून द्या.

या गोष्टी लक्षात ठेवा

डेंग्यूचा डास हा सामान्य डासांपेक्षा वेगळा असतो आणि तो दिवसा चावतो. घरामध्ये आणि आजूबाजूला डासांची पैदास होऊ देऊ नका. उन्हाळ्यामुळे जवळपास सर्वच घरांमध्ये कुलरचा वापर केला जातो. कुलरमध्ये पाणी साचल्याने त्यात डेंग्यूच्या अळ्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. अशा स्थितीत कूलर वापरल्यानंतर लगेचच त्यातील पाणी रिकामे करा. पावसाळ्यात कुंड्या, बाटल्या किंवा इतर ठिकाणी पाणी साचू देऊ नका.

जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठि नागरिक यांचा लोकसहभाग घेऊन गावपातळीवरही राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येणार आहे.  यामध्ये पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक सभा, जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, तालुकास्तर सभा, सर्व स्तरावर रॅलीचे आयोजन, ग्रामसभेचे आयोजन, बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन, हस्त पत्रिका वाटप, आशा बळकटीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन, कंटेनर सर्वेक्षण, सर्व स्तरावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन, दिंडीचे आयोजन, डासोत्पती स्थानात गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम, सर्व स्तरावरील फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण, एक दिवस कोरडा दिवस पाळणे याविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. डेंग्यूपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून जागरुक राहू या !

 

                                                                                                            --- चंद्रकांत कारभारी

                                                                                                                 माहिती सहायक

                                                                                                                 जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

 

*****

 

No comments: