30 August, 2017

        शासनाच्या योजनाद्वारे महिलांचे सक्षमीकरण होणे आवश्यक
-         तहसीलदार विजय अवधाने
        हिंगोली, दि.30:  राज्य शासन नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्यांना जोमाने विकासकामांत सहभागी होता यावे. यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाद्वारे महिलांचे सक्षमीकरण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन हिंगोली तहसीलदार विजय अवधाने यांनी केले.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देवून जनजागृती करण्याकरीता ‘संवाद पर्व’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने हिंगोली येथील सिध्दीविनायक गणेश मंडळ येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित  ‘संवाद पर्व’ कार्यक्रमात तहसीलदार  श्री. अवधाने बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती सुजाता पाटील, महिला व बाल‍ विकास विभागाचे संरक्षण अधिकारी एन.डी. मकासरे,  जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी  श्री. कदम  आणि सिध्दीविनायक सिध्दीविनायक सोसायटीचे अध्यक्ष कल्याण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

            श्री. अवधाने पुढे म्हणाले की,  राज्य शासनामार्फत महिलांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. शासनाने महिलांसाठी सर्वसमावेशक असे महिला धोरण निश्चित केले असून या सर्व धोरणांमध्ये प्रामुख्याने महिलावरील अत्याचार, हिंसा, महिला विषयक कायदे, आर्थिक दर्जात सुधारणा, महिलांना केंद्रस्थानी ठेवून योजना तयार करणे, स्वंयसहाय्यता बचतगटांचा विकास आदी बाबींचा विचार केला आहे. मुलींच्या साक्षरतेचे प्रमाण वाढविण्याकरीता विविध योजनांसह कायदेही तयार करण्यात आलेले आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र यांच्या माध्यमातून महिलांना व्यवसायिक शिक्षण-प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. महिला बचत गट, सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना आदी अशा विविध योजना महिलांना सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या विभागामार्फत राबविल्या जातात. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कोणतीही माहिती सहज उपलब्ध होत असून, महिलांनी या तंत्रज्ञानाच्या साह्याने सक्षम होणे काळाजी गरज बनली असल्याचेही श्री. अवधाने म्हणाले.
            यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती सुजाता पाटील म्हणाल्या की, आधुनिक आणि प्रगल्भ म्हणवणाऱ्या या युगात ही समाजात महिलांवर होणारे अत्याचार आजही संपलेले नाहीत. हुंडाबळी, मानसिक व शारीरिक छळ, भेदभाव, कौटूंबिक हिंसाचार आदींच्या माध्यमातून स्त्रीयांवर होणारे अन्याय, अत्याचार सुरूच आहेत. याकरीता महिलांनी त्यांच्यासाठी असलेल्या कायद्याबाबत जागरुक होवून त्याचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. कारण याद्वारेच महिलांना त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुध्द वाचा फोडणे शक्य आहे. आज स्त्रियांनी स्वावलंबी होणं आवश्यक आहे. परंतू, त्यासाठी कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर त्यांना पाठबळ मिळणं आवश्यक आहे. यावेळी श्रीमती पाटील यांनी घडलेल्या विविध गुन्ह्याचे उदाहरण देत सजग राहण्याबाबत नागरिकांना आवाहन केले.
            जन्माला येण्यापूर्वी तसेच जन्मानंतर बालकांना पुरेशा सेवा देण्याचे राष्ट्रीय धोरण आपल्या देशाने स्वीकारले आहे. या धोरणनुसारच बाल विकास सेवा योजना मुलांचे सर्वांगीण विकासासाठी म्हणून आरोग्य, आहार व शिक्षण एकत्रितपणे देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. महिला आणि मुले यांच्यासाठी तळागाळपर्यंत पोहचलेला राज्यातील हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातंर्गत पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, सकस आहार विषयक शिक्षण, शालेय पुर्व शिक्षण, व्यावसायीक प्रशिक्षण आदी महत्वाच्या योजना राबविल्या जात असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाचे संरक्षण अधिकारी           श्री. मकासरे यांनी यावेळी दिली.
            यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी उध्दव कदम यांनी राज्याच्या अनेक भागात देहदान व अवयवदानाबाबत जागरुकता वाढत आहे. परंतु, सर्वसामान्यांच्या मनात देहदान व अवयवदाना‌व‌षियी अजूनही अनेक शंका असल्याने या सर्वश्रेष्ठ दानाबाबत अजूनही जनजागृती होणे आवश्यक आहे. याकरिता  वैद्यकिय शिक्षण विभागाद्वारे सर्व सहकारी विभागासोबत यावर्षीही 29 व 30 ऑगस्ट, 2017 रोजी दोन दिवसाचे महाअवयवदान अभियान राबविण्यात येत आहे. अवयवदानाचे प्रकार समजून घेणे आवश्यक असून एक म्हणजे जिवंतपणी करता येणारे आणि दुसरे मृत्युपश्चात केले जाणारे असे दोन प्रकारचे अवयवदान करता येते अशी माहिती उध्दव कदम यांनी यावेळी दिली  .
            शासनाच्या विविध योजनांची माहिती थेट सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी. योजनांबाबत असलेल्या शंकांचे निरसन व्हावे. तसेच शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती सामान्य नागरिकांना मिळून त्यांना त्याचा लाभ घेता यावा या उद्देशाने माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिनस्त जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने 'संवाद पर्व' हा उपक्रम गणेशोत्सवाच्या कालावधीत राबविण्यात येत असल्याचे प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी सांगितले.
कार्यक्रमास उपस्थित नागरिकांनी प्रश्न विचारुन आपल्या शंकाचे निरसन करुन घेतले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.   
**** 


  

29 August, 2017

बकरी ईदकरीता जिल्ह्यात 18 तात्पुरते पशुवधगृह
        हिंगोली, दि.29: बकरी ईद निमित्त जिल्ह्यात तात्पुरते स्वरुपात 18 पशुवधगृह उभारण्यात येणार असुन दि.1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत या पशुवधगृहावर सक्षम पशुवैद्यकिय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असुन या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही राहणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. ए. बी. लोणे यांनी माहिती दिली.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी अनिल भंडारी  यांच्या अध्यक्षतेखाली बकरी ईद-2017 साजरा करणे व महाराष्ट्र प्राणी रक्षण  कायदा 1976 व महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा कायदा 1995 ची अंमलबजावणी करणे बाबत बैठकीत ते माहिती सादर करतांना ते बोलत होते.  यावेळी बैठकीस जिपचे अति मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया,  उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार विजय अवधाने, प्रतिभा गोरे, पी.एस. माचेवाड यांची उपस्थिती होते.
            यावेळी डॉ. लोणे बैठकीत माहिती सादर करतांना  म्हणाले की, जिल्ह्यात बकरी ईद निमित्त मस्तानशहा नगर हिंगोली (शहर), मेहराज ऊलुम मस्जीद हिंगोली (शहर), नर्सी नामदेव, राहोली बु. लिंबाळा मक्ता, औंढा, जवळा बाजार, शिरडशाहापुर, पुसेगांव, केंद्रा बु., कळमनुरी, शेवाळा, जवळा पांचाळ, नगरपालीका, वसमत, शुक्रवार पेठ वसमत, कुरुंदा, गिरगांव, व हट्टा या ठिकाण 18 तात्पुरते पशुवधगृह उभारण्यात येणार आहेत. तसेच गुरांची अवैध वाहतुक होवु नये यासाठी पोलीस विभागामार्फत कन्हेरगांव नाका, जिंतुर पॉईंट, औंढा, वारंगा फाटा, पानकन्हेरगांव, जिंतुर टी पॉईंट वसमत या पाच चेक पोस्टवर तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आल्याची माहिती डॉ. लोणे यांनी दिली.
              महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 दि4.मार्च 2015 मधील कलम 5 अन्वये कोणाताही व्यक्ती राज्यातील कोणत्याही ठिकाणी कोणत्याही गायीची, वळुची किंवा बैलांची कत्तल करणार नाही किंवा कत्तल करविणार नाही. 5अ (1) कत्तल करण्यासाठी गाय, वळु किंवा, बैल यांची वाहतुक करण्यास प्रतिबंध 5 अ(2) कत्तल करण्यासाठी गाय, वळु किंवा बैल यांची निर्यात करण्यास प्रतिबंध 5 ब गाय, वळु किंवा बैल यांची अन्य कोणत्याही पध्दतीने विक्री, खरेदी करण्यास, विल्हेवाट लावण्यास प्रतिबंध आहे. 5 क गाय, वळु किंवा, बैल यांचे मांस ताब्यात ठेवण्यास मनाई  5 ड महाराष्ट्र राज्याबाहेर कत्तल केलेली गाय, वळु किंवा बैल यांचे मांस ताब्यात ठेवण्यास मनाई. कलम 6 अन्वये म्हशी आणि म्हशींचे पारडे या प्राण्यांची कत्तलपुर्व तपासणी करुन कत्तलीस परवानगी आहे. गाय, वळु आणि बैल हे प्राणी कत्तलीसाठी प्रतिबंधीत आहेत. कलम 10 अन्वये, या अधिनियमातील सर्व अपराध हे दखलपात्र व बंजमानती (Non Bailable) असतील. या बाबीसाठी 10 हजार रुपया पर्यंत दंड व 5 वर्ष करावासाच्या शिक्षेचे प्रावधान असल्याचेही डॉ. लोणे यांनी बैठकीत माहिती दिली.
                  जनतेने या बाबीची दखल घेवुन नियमानुसार व सलोख्याचे वातावरणात बकरी ईद सण साजरा करावा असे आहवान करत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.

****
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘ संवादपर्व  उपक्रमातंर्गत

युवा पिढीने स्वयंरोजगाराच्या माध्यमातून
उद्योजक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत
                                                            --- पी.एस.खंदारे
        हिंगोली, दि.29:- वाढत्या बेरोजगारीचा विचार करता त्यामानाने आज रोजगार उपलब्ध होत नाहीत. त्याकरीता  आजच्या युवा पिढीने नौकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उद्योजक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे असे प्रतिपादन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी पी.एस. खंदारे यांनी केले.
             माहिती व जनसंपर्क महासंचालनालय जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या मार्गदर्शनाने गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देवून जनजागृती करण्याकरीता ‘संवाद पर्व’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने कळमनुरी येथील यश स्किल डेव्हलपमेंट यांच्या गणेश मंडळात ‘संवाद पर्व’ उपक्रमाचे आयोजन जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि तहसिल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. नायब तहसिलदार श्री. पाचपूते, रोकडेश्वर पाचपूते, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी श्री. खंदारे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अंतर्गत रोजगार व प्रशिक्षण केंद्रामार्फत विविध व्यवसायावर अधारित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच युवक-युवतींनी त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणावर अधारीत स्वयंरोजगार सुरु करण्याची गरज आहे. प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान यासह विविध योजनाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकातील सुशिक्षीत बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मर्यादीतमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. यात राष्ट्रीयकृत बँकेचा सहभाग 60 टक्के असून राष्ट्रीयकृत बँकांनी प्रकल्प रक्कमेचा 35 टक्के रक्कम महामंडळामार्फत बीज भांडवलावर म्हणुन देण्यात येते. तसेच प्रधानमंत्री मुद्रा बँक योजने अंतर्गत विनातारण 10 हजार ते 10 लाखापर्यंत स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी  कर्ज उपलब्ध होते, अशी माहिती यावेळी दिली. 
            तसेच नायब तहसिलदार श्री. पाचपूते यांनी महसूल विभागामार्फत देण्यात येणारे ऑनलाईन विविध प्रमाणपत्रासाठी कशाप्रकारे अर्ज करावेत याबाबत सविस्तर माहिती दिली.  
            यावेळी बेटी बचाओ- बेटी पढाओ,  स्वच्छ महाराष्ट्र अभियान यासह विविध योजनाची माहिती दिली.
            यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी ‘संवाद पर्व’ कार्यक्रम आयोजनचा उद्देश उपस्थिताना समजावून सांगितला. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती कोणकोणत्या संकेतस्थळावर मिळू शकते, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य, महान्यूज, दिलखुल्लास, जय महाराष्ट्र उपक्रमाची माहिती दिली.
            यावेळी वीरशैव गणेश मंडळ, व्यापारी गणेश मंडळ, बसवेश्वर गणेश मंडळ, मुरलीधर गणेश मंडळ यांचे पदाधिकारी यांच्यासह  मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि नागरिकांची उपस्थिती होती.   

****
  

28 August, 2017

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 47.98 मि.मी. पाऊस

          हिंगोली, दि. 28 :  जिल्ह्यात रविवार दिनांक 27 ऑगस्ट, 2017 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 18.73 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  47.98   मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 427.18 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 47.98 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात  रविवार दि. 28 ऑगस्ट, 2017 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली – 3.57 (471.14), वसमत – 29.14 (429.28), कळमनुरी – 11.17 (299.34), औंढा नागनाथ – 24.50  (528.50) , सेनगांव – 6.00 (407.66). आज  अखेर  पावसाची सरासरी 427.18 नोंद झाली.
*****



राष्ट्रीय युवा नेता कार्यमांतर्गत  तालुका  जिल्हास्तरीय
आदर्श युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करावेत
हिंगोली, दि. 28:-  भारत सरकारच्या युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालया अंतर्गत कार्यरत असलेल्या नेहरु युवा केंद्र, हिंगोली  कार्यालया द्वारा जिल्हयातील नोंदणीकृत युवा/महिला मंडळांकडून राष्ट्रीय युवा नेता कार्यक्रमांतर्गत तालुका जिल्हास्तरीय आदर्श युवा मंडळ पुरस्कार सन 2015-16 आणि  2016-17 अशा दोन वर्षासाठी तालुका आण जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
            तालुकास्तरीय पुरस्काराचे स्वरुप प्रथम- रु 8000/- (रुपये आठ हजार) प्रमाणपत्र द्वितीय- रु 4000/- (चार हजार रुपये) प्रमाणपत्र असे आहे. तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त मंडळाचा प्रस्ताव जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. जिल्हास्तरीय पुरस्काराचे स्वरुप रु.25000/- (रुपये पंचवीस हजार फक्त) प्रमाणपत्र असे आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या युवा मंडळाचा प्रस्तावाचा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी  पात्र ठरणार आहे.
अर्ज करण्यास पात्र असणारे मंडळ/संस्थामधील युवक मंडळाच्या/संस्थेच्या कार्यकारी सदस्यांचे वय 18 ते 29 दरम्यान असावे, युवक मंडळ/संस्था नेहरु युवा केंद्र, हिंगोली कार्यालयाशी संलग्न असावी. त्याचबरोबर स्थानीय युवकांच्या माध्यमातून गावाचा विकास, युवा मंडळाचा माध्यमातून कमीत कमी बारा कार्यक्रम असावेत 150 सदस्यांमार्फत एका वर्षामध्ये किमान 100 तास श्रमदान केलेले असावे.

 तरी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरणरक्षण राष्ट्रीय अशा विविध विकासात्मक कार्यक्रम राबविणाऱ्या युवा/महिला मंडळानी आपला विहीत नमुन्यातील अर्ज, अहवाल दि.05/09/2017 पर्यंत नेहरु युवा केंद्र, हिंगोली कार्यालय दिपकज्योती एजन्सीच्या वर, 2 रा मजला, रेल्वे स्टेशन रोड, हिंगोली  येथे सादर करावेत.                                                                     **** 
विशेष जिल्हा युवा पुरस्काराकरीता  युवा/महिला मंडळांनी अर्ज करावेत

हिंगोली, दि. 28:- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालया अंतर्गत कार्यरत असलेल्या नेहरु युवा केंद्र, हिंगोली  कार्यालया द्वारा जिल्हयातील नोंदणीकृत युवा / महिला मंडळांकडून विशेष जिल्हा युवा पुरस्कार 2016-17 अशा जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
            या  पुरस्काराचे स्वरुप रु.25000/- (रुपये पंचवीस हजार फक्त) प्रमाणपत्र असे आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या युवा मंडळाचा प्रस्तावाचा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी  पात्र ठरणार आहे.
अर्ज करण्यास पात्र असणारे मंडळ/संस्थामधील मंडळाची कार्यकारी सदस्यांचे वय 18 ते 29 दरम्यान असावे, संस्था नेहरु युवा केंद्र, हिंगोली कार्यालयाशी संलग्न असावी.
 तरी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरणरक्षण राष्ट्रीय अशा विविध विकासात्मक कार्यक्रम राबविणाऱ्या युवा/महिला मंडळानी आपला विहीत नमुन्यातील अर्ज दि.05 सप्टेंबर, 2017 पर्यंत नेहरु युवा केंद्र, हिंगोली कार्यालय दिपकज्योती एजन्सीच्या वर, 2 रा मजला, रेल्वे स्टेशन रोड, हिंगोली  येथे सादर करावेत.
****