27 January, 2021

कोरोनावर मात करत हिंगोली जिल्ह्याची विकासाकडे झेप -- पालकमंत्री वर्षाताई गायकवाड


 

  राज्य शासनास नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले याचा आम्हा सर्वांना आनंद आहेच. पण हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच कठीण होते. कारण मार्च 2020 पासून ते आतापर्यंत आपण सर्वच कोव्हिड-19 परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या संकट काळात संपूर्ण राज्य बंद करण्याची वेळ आली, त्यावेळी कोरोनाच्या या संकटात महसुल विभागातील जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तलाठी तर जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व उप मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, ग्रामसेवक, अंगणवाडीताई, पोलीस विभागातील पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक यांच्यासह सर्व पोलीस यंत्रणा, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील सर्व आरोग्य अधिकारी-कर्मचारी, महावितरण विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि नगर प्रशासनातील मुख्याधिकारी ते सफाई कामगारांनी आपल्या जीवाची परवा न करता अहोरात्र काम केले.

महाविकास आघाडी शासनाने वर्षभरात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे राज्यात सामाजिक, आरोग्य, सहकार, शैक्षणिक, आर्थिक आदी क्षेत्रात अमुलाग्र बदल होत असून महाराष्ट्र आर्थिक विकासाकडे झेपावत आहे. राज्य शासनाने राज्याच्या सर्वांगीण विकासाकरीता विविध महत्वकांक्षी योजना राबविण्यासाठी कल्याणकारी  निर्णय घेऊन विविध योजनांद्वारे उल्लेखनीय कामे सुरु केली आहेत. 1 मे, 1999 साली नवनिर्मित हिंगोली जिल्ह्याची निर्मीती झाली आहे. या जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने विविध विकास कामे करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. यामध्ये राज्य शासनाच्या ‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’, शिवभोजन योजना,’ ‘मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना’, ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजना’ आदी समाजोपयोगी महत्वकांक्षी कल्याणकारी योजनांची अंमलबजाणी करत यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.

सद्यस्थितीत कोरोना महामारी संकट असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. जिल्ह्यातही कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.  या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची  जिल्हा प्रशासन संयमाने आणि निर्धाराने लढत असून, जनता ही त्यास उत्स्फूर्तपणे या लढाईत उतरुन सकारात्मक साथ देत आहे. हे अत्यंत आशादायक आहे. कोरोना महामारीचा मुकाबला करत  जिल्ह्यातील सामान्य नागरिकास केंद्रबिंदू मानून उत्कृष्ट नियोजन करत जिल्हा शाश्वत व सर्वांगीण विकासाकडे झेप घेत आहे.

कोरोनाच्या महामारीचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असून याकरीता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करीत आहे. जिल्ह्यात कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले असून रुग्णसंख्याही झपाट्याने कमी होऊ लागली आहे. आजमित्तीस 91 रुग्ण सध्या सक्रीय आहेत. हिंगोली जिल्हा रिकव्हरीमध्ये राज्यात 15 व्या स्थानावर आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या 13 लाख 10 हजार असून कोरोना आजाराचा प्रार्दुभाव लक्षात घेता सर्वत्र आरोग्य विभाग कटाक्षाने लक्ष ठेवून आहे. 23 मार्च पासून कोरोना संसर्गाने डोके वर काढले. मध्यंतरीच्या काळात रुग्ण वाढले असले तरी सध्या मात्र रुग्ण वाढलेले नाहीत. जिल्ह्यात कोरोना आजाराचा मृत्यू दर कमी आहे आतापर्यंत जिल्ह्यात 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना संदर्भात जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना आजाराच्या रुग्णांसाठी ऑक्सीजन व बेडचीही पुरेपुर व्यवस्था केली आहे. राज्याचा रिकव्हरी दर 93.42 असून हिंगोली जिल्ह्याचा रिकव्हरी दर 97.71 टक्के एवढा आहे. राज्याचा मृत्यू दर 2.57 असून हिंगोली जिल्ह्याचा मृत्यू दर 1.5 एवढा आहे.  

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजारांहून अधिक जणांना संसर्ग झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत 56 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. बाधीत रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्ह्यात 02 डेडीकेटेड हॉस्पीटल असून त्यांची 360 खाटांची क्षमता आहे. 6 डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटरमध्ये 400 खाटांची क्षमता आहे. 20 कोविड केअर सेंटर असून त्याची 1 हजार 734 खाटांची क्षमता आहे. कोरोना बाधीत रुग्णांना ऑक्सीजनची अत्यंत आवश्यकता असते ही बाब लक्षात घेवून जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली, उपजिल्हा रुग्णालय, कळमनूरी आणि वसमत येथे प्रत्येकी 13 के.एल. क्षमतेचे 4 लिक्विड ऑक्सीजन टँक उभारण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना मुबलक प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध होण्यास मदत होत आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यासाठी कोव्हिड-19 तपासणीसाठी सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यात आली आली आहे. या प्रयोगशाळेमध्ये नियमितपणे तपासणी सुरु आहे.

 जिल्ह्यात सर्व शासकीय डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी हे प्रभावीपणे काम करत असून विलगीकरण कक्षासह कोरोना केअर सेंटर, आयसोलेशन वार्डमधील रुग्णांची तपासणी करुन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. याकरीता खाजगी डॉक्टरांची देखील मदत घेतली जात आहे.  तसेच मधुमेह, रक्तदाब, ह्दयविकार, क्षयरोग, कर्करोग, दमा, किडनी विकार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याने अशा व्यक्तींची माहिती संकलीत करण्यात आली असून, त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेनुसार ठिकठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. 

                कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत 595 पथके स्थापन करुन त्यामध्ये 1 हजार 785 कर्मचाऱ्यांची तसेच प्रत्येक 5 ते 10 पथकामागे 1 याप्रमाणे उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी 37 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. याद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंबाचे सर्वेक्षण करुन त्यांचा डाटा तयार करण्यात आला आहे. तसेच या मोहिमेत आढळलेल्या संशयित रुग्णाना उपचार करण्यात आले आहेत. या सर्व कामासाठी निधी कमी पडू दिला नाही. जिल्हा प्रशासनातील विविध यंत्रणांमार्फत योग्य नियोजन केले जात आहे. 

            राज्यात आणि जिल्ह्यात 16 जानेवारी पासून कोरोना लसिकरण मोहिमेस सुरुवात झाली आहे. जिल्ह्याला 6 हजार 650 लसींचे डोस प्राप्त झाले असून याद्वारे पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लसिकरण करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत इतर राज्य व जिल्ह्यातील 2 हजार 292 नागरिकांना 18 निवारागृहात ठेवून त्यांना भोजन, वस्त्र, व निवाऱ्यासह इतर सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. तसेच कोरोनाच्या कालावधीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत जिल्ह्यातील 8 लाख 57 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना 32 हजार मेट्रीक टन अन्न-धान्याचे मोफत वितरण करण्यात आले.

            गरीब व गरजू व्यक्तींना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने             दि. 26 जानेवारी, 2020 पासून शिवभोजन ही योजना सुरु केली आहे. या योजनेचा आतापर्यंत लाभार्थ्यांनी मोठा लाभ घेतला आहे. लॉकडाऊन कालावधीत गरजूंना याचा फायदा झाला आहे. याचा 9 केंद्रावर 4 लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.

            कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादूर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अविरत कार्यरत आहेत. संभाव्य रुग्णवाढ विचारात घेऊन त्याप्रमाणे वैद्यकीय सुविधा उभ्या करण्यात आल्या आहेत. मात्र सर्व नागरिकांना सतर्क राहणे, मुखपट्टीचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, तसेच वैयक्तिक स्वच्छतेसाठी हात धुणे आणि सार्वजनिक जागी स्वच्छता या बाबी सर्वात महत्वाच्या असून सर्व नागरिकांनी या नियमाचे पालन करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व सुजाण नागरिकांनी प्रशासनाला आतापर्यंत खूप चांगले सहकार्य केले आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करते.

यावर्षी जून महिन्यापासून पावसाला चांगली सुरुवात झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 112 टक्के पाऊस झाला. सन 2020-21 खरीप हंगामात जिल्ह्यात  सुमारे 4 लाख 7 हजार हेक्टर (96.00 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांना पेरणीकरीता खत आणि बियाणाची उपलब्धता व्हावी यासाठी नियोजन करण्यात आले असून, शेतकरी गटामार्फत 5 हजार 251 मेट्रीक टन खत तर 620 मेट्रीक टन बियाणे 13 हजार 317 शेतकऱ्यांच्या बांधावर वितरीत करण्यात आले आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजने अंतर्गत जिल्ह्यातील 240 गावातील 7 हजार 332 शेतकऱ्यांना शेती विषयक लाभ मिळाला आहे.

माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी बांधवांना चिंतामुक्त करण्यासाठी सहज, सोपी आणि पारदर्शक अशी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ सुरु केली असून, जिल्ह्यातील 90 हजारांहून अधिक खातेधारकांना 581 कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे बाधित जिल्ह्यातील 2 लाख 96 हजार 778 शेतकऱ्यांना मदत म्हणुन 229 कोटी 96 लाख निधी वितरीत करण्यात आला आहे.

जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहचत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या विजेची समस्या सुटत आहे. जिल्ह्यात तब्बल 2 हजार 900 शेतकऱ्यांच्या शेतावर कृषिपंप बसवून यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात 10 हजार सिंचन विहिरींचे उद्दिष्ट असून त्यापैकी 7 हजार 147 विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यातून 02 हजार 240 विहिरींचे कामे पूर्ण झाली आहेत. तर 3 हजार 517 विहिरींचे कामे प्रगतीपथावर आहेत. 1 हजार 390 विहिरींच्या कामास लवकरच प्रारंभ केला जाणार आहे.

आज राज्यासमोर अभूतपूर्व संकट असतांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण राज्य बंद होते आणि शाळा देखील त्याला अपवाद नव्हत्याच. परंतु ज्या प्रमाने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत टप्प्याटप्याने आपण सर्व गोष्टी अनलॉक करत चाललो आहोत. याच पध्दतीने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचा अवलंब करुन शाळा देखील आपल्याला सुरु करावयाच्या आहेत. अशा वेळी शाळा सुरु करत असतांना अनेक आव्हानांचा डोंगर आपल्या समोर आहे. राज्यात जवळपास सर्वत्र कोरोनाची लागण झाली असली तरी प्रत्येक ठिकाणी कोरोनाची स्थिती वेगळी आहे. जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या व स्वयंअर्थसहाय्यता अशा एकूण 9 वी ते 12 वीच्या 304 शाळा आहेत. त्यापैकी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम व अटींचे पालन करणाऱ्या जिल्ह्यातील 9 ते 12 वीच्या 41 शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. 57 शाळांनी शाळा सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याकडे सादर केला आहे. शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांची सुरक्षीतता शिक्षकांची सुरक्षितता याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. यादृष्टीने शालेय शिक्षण विभाग हे SOP (Standard Operating Procedure) च्या सहाय्याने शाळांना, शिक्षकांना मदत करणार आहे. याचबरोबर येत्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचा शाळेबरोबर बरेच दिवस झाले संपर्क तुटलेला आहे. जरी त्यांचे शिक्षण हे विविध माध्यमातून सुरु असले तरी  देखील विद्यार्थ्यांना परत शिक्षणाकडे आणणे आणि प्रत्यक्ष वर्गात बसवून या अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये त्यांच्या मानसशास्त्राचा विचार करुन त्यांना पुन्हा शिक्षणाकडे आणणे हे एक मोठे आवाहन असणार आहे.

  माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली असून आज देशात सर्वत्र डिजिटल शाळांचे वारे वाहत आहेत. शहरी भागात प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतू ग्रामीण भागात शक्यतो जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय पर्याय नसतो. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील माहिती व तंत्रज्ञानाच्या साह्याने जगाची ओळख व्हावी तसेच तो आजच्या स्पर्धात्मक युगात टिकावा, हा सकारात्मक उद्देश ठेवून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नागरिक व गावकरी यांच्या आर्थिक सहकार्यानेच हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व म्हणजे 883 शाळा या डिजिटल शाळा केल्या आहेत. यामुळे खाजगी शाळेलाही लाजवतील अशा पध्दतीने हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांनी आता आपले रूप बदलले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांची परिवर्तन आता डिजिटल रुपात झाल्याने त्या मुलांना आकर्षित करीत आहेत. बऱ्याच शाळेत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचले असून डिजिटलच्या माध्यमातून मुलांना नवनवीन माहिती दिली जात आहे.

जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा या कोणतेही शासकीय अनुदान न घेता डिजीटल करण्यात आल्या आहेत. नुकतेच राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांमधील वीजपुरवठा आणि वीजेवरील खर्चाचा प्रश्न सोडविण्यासाठी महाऊर्जा विभागाच्या माध्यमातून सौर ऊर्जा उपकरणे बसवण्याचा तसेच बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पध्दतीत बदल करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ उभारण्याचा निर्णय घेतला होता.

मागील पाच महिन्यापासून सर्व जग हे कोरोना सारख्या महामारीच्या विचित्र परिस्थितीला सामोरे जात आहे. यामुळे आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असतांना कोरोनाने आपल्याला काय शिकवले असा विचार आपण केला, तर कोरोनाने भविष्यातील उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची ओळख आजच आपल्याला करून दिली. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने याबाबत आत्मविश्वासाने एक पाऊल पुढे टाकले आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागीदारी करत विद्यार्थ्यांचे भविष्यातील स्वप्नं काय असेल हे आताचं ओळखून गुगल क्लासरुमची सुरुवात करुन ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणले आहे. ‘जी स्वीट’ आणि ‘गुगल क्लासरुम’ च्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. ‘जी स्वीट फॉर एज्युकेशन’, ‘गूगल क्लासरूम’, ‘गूगल मीट’ ‘दिक्षा ॲप’ यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे.

तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे, विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी असलेल्या शालेय बसची सुरक्षितता तपासून घेण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत आवश्यक तेवढे पाणी प्यावे आणि त्यासाठी आठवण व्हावी यासाठी तीन वेळा पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच मुलांवर शालेय जीवनापासूनच समता, स्वातंत्र्य, समानता, धर्मनिरपेक्षता आणि बंधुता हे पंचसुत्री संविधानिक संस्कार करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘संविधानाचे सामूहिक वाचन’ सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.  शिक्षण हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे हेच शिक्षकांचे काम असल्याने त्यांच्यावर अतिरिक्‍त कामांचा बोजा पडणार नाही याबाबत देखील शासन काळजी घेणार आहे. तसेच राज्यातील साडे तीन लाख शिक्षकांना सन 2016 ते 2018 या कालावधीतील 7 व्या वेतन आयोगातील फरक देणे प्रलंबित होते. तो फरक साडेतीन लाख शिक्षकांना देण्यात आला.

शाळा बंद.. पण शिक्षण आहे.. या अभ्यासमालेच्या सहाय्याने दिक्षा ॲप आधारीत विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन करण्यासाठीचा उपक्रम मागील 3 महिने सलग सुरु आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वयं शिक्षणासाठी पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका विकसित करण्यात आली आहे. जिओ टीव्हीवर चार माध्यमांमधून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 3 री ते इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहेत. जिओ सावन’ या रेडीओ वाहिनीवर देखील कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहेत. पाठ्यपुस्तके 100 टक्के विद्यार्थ्यांना पोहोच करण्यात आली. यु ट्यूब वाहिनीवर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे व्हिडीओ चॅनल सुरु करून त्यावर व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. सह्याद्री वाहिनीवर ‘टीलीमिली’ हा शैक्षणिक कार्यक्रम इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी साठी सुरु करण्यात आला आहे. शिक्षकांना घरातून विद्यार्थ्यांना अध्यापन करता यावे यासाठी गूगल क्लासरूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. स्वयंसेवक, शिक्षक वाडी-वस्त्यांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर इयत्ता 1 ली ते 12 वीचा इयत्तानिहाय, विषयनिहाय 25 टक्के पाठ्यक्रम कमी करण्यात आला आहे.

कोरोनाचा मुकाबला करत विविध अभिनव योजना आणि उपक्रमाच्या माध्यमातून हिंगोली जिल्हा प्रगतीकडे वाटचाल करत आहे. 

 (अरुण सुर्यवंशी)

जिल्हा माहिती अधिकारी

हिंगोली

****

 


जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांच्या हस्ते प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ

 


 

हिंगोली, दि.27 (जिमाका) :  केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाची महत्वकांक्षी योजना प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY 3.0) चा शुभारंभ दि. 26 जानेवारी , 2021 रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

तरुण ही देशाची ताकद आहे. या तरुणांना विविध कौशल्य प्रदान करुन दिशा देण्यासाठी प्रत्येक लोकसभा क्षेत्रासाठी एक याप्रमाणे प्रधान मंत्री कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

हिंगोली येथील प्रधान मंत्री कौशल्य केंद्र अकोला बायपास, माऊली नगर, हिंगोली येथे असून प्रथम टप्यात 120 उमेदवार प्रशिक्षण लक्ष्यासाठी In-Line Checker व Inventory Clerk या दोन रोजगाराभिमुख विनामूल्य कौशल्य  प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे.

रोजगार इच्छूक युवक-युवतींना मोफत रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देवून प्रमाणपत्र प्रदान करणे, प्रशिक्षणानंतर रोजगार व स्वयंरोजगार प्राप्तीसाठी सहाय करणे, पुर्वानुभवाने प्राप्त कौशल्याचे प्रमाणिकरण करणे , खाजगी क्षेत्रातील प्रशिक्षण केंद्राचा सहभाग वाढविणे हे या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत 200 ते 500 तासापर्यंतचे अल्प कालावधीचे प्रशिक्षण अभ्यासक्रम राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क आधारे उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अधिक रोजगार मागणी आधारे प्रशिक्षण अभ्यासक्रम निवडून प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त (प्र.) प्र. सो. खंदारे यांनी दिली आहे .

 ****

 

महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाच्या योजनेबाबत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे 28 जानेवारी रोजी आयोजन

 


 

हिंगोली, दि.27 (जिमाका) :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राअंतर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेबाबत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे गुगल मीटवर मिटींग युआरएल : https://meet.google.com/rwy-jyts-sfs  या संकेतस्थळावर दि. 28 जानेवारी, 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

            या ऑनलाईन समुपदेशन व करिअर मार्गदर्शन सत्रामध्ये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाअंतर्गतच्या योजनेबाबत मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.टी. बागूल हे मार्गदर्शन करणार आहेत.

            या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी https://meet.google.com/rwy-jyts-sfs  या लिंकवर क्लिक करावे. आपल्याकडे गुगल मीट ॲप यापूर्वी इन्स्टॉल केलेले नसेल तर इन्स्टॉल करुन घ्यावे. गुगल मीट ॲपमधून कनेक्ट झाल्यानंतर Ask to join वर क्लिक करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनीटे वेळेपूर्वी जॉईन करावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माईक बंद (mute) करावे. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक  सुरु (Unmute) करुन विचारावे व लगेच माईक बंद (mute) करण्याची दक्षता घ्यावी. प्रश्न विचारतांना मोजक्या शब्दात विचारावेत.

या मार्गदर्शन सत्राबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

****

26 January, 2021

कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्याने राज्यात वेगळा पॅटर्न निर्माण केला - पालकमंत्री वर्षाताई गायकवाड

 


हिंगोली, दि.26 (जिमाका):  कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने राज्यात एक वेगला पॅटर्न निर्माण केला आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

            भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापन दिनी आज येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, खा. राजीव सातव, आमदार तान्हाजी मुटकूळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, राज्य राखीव दलाचे समादेशक संदिपसिंह गिल, प्रभारी  पोलिस अधिक्षक  यशवंत काळे, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीन देशमूख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, अनेक देशात कोरोनाने थैमान घातले होते. हिंगोली जिल्ह्यात 3 हजाराहून अधिक जणांना त्याचा संसर्ग झाला असून दुर्दैवाने 56 जणांचा यात मृत्यू झाला आहे. लोक प्रतिनीधी आणि जिल्हा प्रशासनाने आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम केले. जनतेच्या सकारात्मक प्रतिसादामुळे कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यात हिंगोली जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनीधी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यशस्वी झाले असे म्हणता येईल. हिंगोली जिल्ह्याने धैर्याने आणि संयमाने एक वेगळा पॅटर्न राज्यात निर्माण केला. याकरिता हिंगोली जिल्ह्यातील जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.

कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी जिल्ह्यात आज 5 हजार पेक्षा जास्त क्वारंटाईनच्या खाटांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र RT-PCR लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने 360 खाटांची क्षमता असलेले 2 डेडीकेटेड कोव्हिड हॉस्पिटल तयार करण्यात आले आहेत. तर 400 खाटांची क्षमता असलेले 6 डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर तयार करण्यात आले आहेत. तसेच 20 कोविड केअर सेंटर असून त्याची 1 हजार 734 खाटांची क्षमता आहे. यापैकी केंद्रीय ऑक्सीजन पुरवठा पाईपलाईनद्वारे 600 खाटा आणि 87 व्हेंटीलेटर युक्त आयसीयू खाटा आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता असल्याची बाब लक्षात घेवून हिंगोली, कळमनुरी आणि वसमत येथे 13 के.एल. क्षमतेचे 4 लिक्विड ऑक्सिजन टॅंक उभारण्यात आल्याने रुग्णांना आता ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे.

तसेच कोव्हिड रुग्णांसाठी डायलेसीसचा स्वतंत्र वार्ड तयार करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन अंतर्गत 20 कोटी रुपये खर्च करुन जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यात आले. हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात सेंट्रल मॉनिटरींग सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. याद्वारे भरती असलेल्या सर्व रुग्णांची आरोग्य विषयक माहिती एकाच ठिकाणी एका स्क्रिनवर उपलब्ध होते. तसेच याद्वारे रुग्णांच्या आरोग्यावर 24 तास देखरेख ठेवून अचूक उपचार करण्यात येत आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अपंग पुनर्वसन केंद्र सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा अपंग पूर्नवसन केंद्र उभारण्यात येत असुन, यासाठी आपण जिल्हा नियोजन योजनेतून 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे यावेळी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले.

कोरोनासाठी लसीकरण सुरु झाले असले तरी अजून, धोका कमी झालेला नाही. याकरीता मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, शारिरीक अंतर राखणे या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोनावर उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपायांनी मात केली जाऊ शकते. त्याकरीता नागरिकांनी अधिकाधिक खबरदारी घेण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटूंब-माझी जबाबदारी’ ही मोहिम यशस्वीरित्या राबविली असून राज्यात आणि जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आहे. जिल्ह्याला 6 हजार 650 लसींचे डोस प्राप्त झाले असून, याद्वारे पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  

            पालकमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड पुढे म्हणाल्या की, माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी बांधवांना चिंतामुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली असुन जिल्ह्यातील 90 हजाराहून अधिक कर्जखात्यांवर 581 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे बाधीत जिल्ह्यात 2 लाख 96 हजार 778 शेतकऱ्यांना मदत म्हणून 229 कोटी 96 लाख निधी लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आला आहे.

तसेच हिंगोली शहरातील रामलीला मैदानाला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. याठिकाणी सुमारे दीडशे वर्षापासून दरवर्षी दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आपण जिल्हा नियोजन अंतर्गत सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करुन रामलीला मैदानाचे सुशोभिकरण केले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा, कालच माझ्या हस्ते झाला असून रामलीला मैदान आता लोकोपयोगासाठी खुले झाले आहे. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेले नरसी नामदेव आणि आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ या तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी सन 2020-21 मध्ये जिल्हा नियोजनातून 13 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. येणा-या काळात यासाठी अधिकचा निधी ही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.

ऊर्जा विभागाने राज्यातील प्रत्येक कृषीपंप वीज ग्राहकाला मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 जाहीर केले असुन त्याअंतर्गत वीज जोडणीचा किंवा सौर ऊर्जा पंपाचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच कृषी ग्राहकांना दिवसा अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी Online Land Bank Portal तयार करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी शिवभोजन योजने अंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना कोरोना प्रादूर्भावाच्या कालावधीत केवळ 5 रुपयांमध्ये सकस आहार देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यातील 9 शिवभोजन केंद्रावर 4 लाखाहून अधीक लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. तसेच कोरोनाच्या कालावधीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत जिल्ह्यातील 8 लाख 57 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना 32 हजार मेट्रीक टन धान्य वितरीत करण्यात आले आहे.

27 जानेवारी म्हणजे उद्यापासून राज्यात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिक्षकांची RT-PCR टेस्ट बंधनकारक केली असुन स्थानिक प्रशासनाने मुलांच्या आरोग्याची सर्व काळजी घ्यावी असे निर्देश दिले आहेत. शासनाने राज्यातील सर्व शासकीय शाळांमधील वीजपुरवठा आणि विजेवरील खर्चाचा प्रश्न सोडविण्यासाठी महाऊर्जा विभागाच्या माध्यमातून सौर ऊर्जा उपकरणे बसवण्याचा निर्णय घेतला असुन बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पध्दतीत बदल होणे आवश्यक असल्याने राज्यातील सर्व शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.

             यावेळी पालकमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते शहिद सैनिकांच्या विरमाता व विरपिता श्रीमती लक्ष्मीबाई भिकाजी रणविर यांचा शाल व श्रीफळ देवून गौरव करण्यात आला. तसेच सशस्त्र सेना ध्वजदिन निधी-2019 संकलनाच्या उत्कृष्ट कार्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या पुणे सैनिक कल्याण विभागातर्फे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच वन विभागामार्फतही सन 2018-19 मध्ये वनसंरक्षंणाच्या प्रभावी कामांबद्दल व वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल सहाय्यक वनसंरक्षक कामाजी गंगाधरराव पवार यांना सुवर्ण पदक मिळाल्याबद्दल त्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  तसेच जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2019-20 साठी तलवार बाजीमध्ये गुणवंत खेळाडू म्हणून संदिप कचरु वाघ यांचा 10 हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. बेसबॉल/ कुस्ती खेळासाठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून संजय आनंदराव ठाकरे यांचा 10 हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. क्रीडा संघटक/ कार्यकर्ता दत्तराव लिंबाजी बांगर यांचाही 10 हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. सामाजिक न्याय विभागातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ऑनलाईन जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या निबंध स्पर्धेत प्रथम आलेल्या कु. राणी शामराव सुर्यवंशी यांना 10 हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक आलेल्या कु. ऋतुजा रामचंद्र देशमुख यांना 5 हजार रुपयाचा धनादेश व प्रमाणपत्र व तृतीय क्रमांक आलेल्या कु.आघाव जान्हवी नंदकिशोर यांना अडीच हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र पालकमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते देवून गौरवण्यात आले.

यावेळी उपजिल्हा  निवडणूक अधिकारी गोविंद रणविरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार,  उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक,  पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 ****

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण

 


 

          हिंगोली,दि.26 (जिमाका):  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.   

            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी  चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी कमलाकर फड, उपजिल्हाधिकारी गोविंद रणविरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर,  उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी बारी सिद्दिकी यांची उपस्थिती होती.

****

 

 

25 January, 2021

जिल्ह्यासाठी 880 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर

 


      हिंगोली, दि.25 (जिमाका): सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने माहे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च-2021 या तीन महिन्यांसाठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. या तीन महिन्‍याचे जिल्‍ह्यासाठी  880 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकांस संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.  

तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे.  हिंगोली-244 क्विंटल, औंढा ना.-127.50 क्विंटल, सेनगाव-163 क्विंटल, कळमनुरी-191.50 क्विंटल, वसमत-154 क्विंटल असे जिल्ह्यासाठी एकूण 880 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर झाले आहे. सर्व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी , हिंगोली यांनी  केले आहे.

*****

 

पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते रामलीला मैदानाचे लोकार्पण

 



हिंगोली,दि.25 (जिमाका):  दीडशे वर्षाची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक रामलीला मैदानाचे जिल्हा नियोजनअंतर्गत 4 कोटी रुपये खर्च करुन रामलीला मैदानास संरक्षण भिंत तयार करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण मैदानाचे सपाटीकरण करुन मैदानाच्या आतील भागात चारही बाजूंनी पद पथ (रनींग ट्रॅक) व वृक्षारोपण करुन मैदानाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या मैदानाचे लोकार्पण आज राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन व फित कापून करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, खासदार सर्वश्री राजीव सातव, हेमंत पाटील, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, राजू नवघरे, संतोष बांगर, विप्लव बाजोरिया, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा हे उपस्थित होते.

*****

 

 

 

जिल्हा वार्षिक योजनेच्या 171.70 कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

 


 


हिंगोली,दि.25 (जिमाका):  जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेतंर्गत सन 2021-22 या वर्षासाठी अंमलबजावणीकरीता विभागांनी विविध योजनासांठी 224 कोटी 08 लाख 73 हजार एवढी मागणी केली असता जिल्हा नियोजन समितीने प्रत्यक्ष 171 कोटी 70 लाख 51 हजार खर्चाच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीस यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, खासदार सर्वश्री राजीव सातव, हेमंत पाटील, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, राजू नवघरे, संतोष बांगर, विप्लव बाजोरिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, जिल्ह्यातील शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या असून त्याचे नुतनीकरण करण्यासाठी राज्याकडून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी 25 कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच शाळेच्या वीजबिलासाठी 7 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला असून या कामी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घालून तातडीने कामे करुन घेण्याच्या सूचना  पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी दिल्या.

समिती सदस्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे देयक भरुनही वीज पुरवठा सुरु होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावर पालकमंत्री यानी या प्रश्नी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्तीश: लक्ष घालून सदर वीज पुरवठ्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा. ग्रामीण भागात वारंवार रोहित्र बंद होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत व ते वेळेवर दुरुस्त करुन मिळत नसल्याच्या तसेच वीज देयकाअभावी वीज पुरवठा खंडित करण्याच्या  महावितरणच्या तक्रारी प्राप्त होत असल्याची तक्रारी समिती सदस्यांनी केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीसोबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन सदर प्रश्न तात्काळ मार्गी काढावेत. हिंगोली येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी जमीन उपलब्ध करुन दिली आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येईल. तसेच जिल्हा क्रीडा संकुलाचे काम तात्काळ पूर्ण करुन ते खुले करावे, अशा सूचना श्रीमती गायकवाड यांनी दिल्या. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहीका खरेदी करण्यात यावी. तसेच नादुरुस्त शाळांची दुरुस्ती करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावे, अशाही सूचना पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी दिल्या.

 जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शालेय शिक्षण विभाग, जलसंधारण, पाझर तलाव, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची (एमआरईजीएस) कामे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा डीपीआर तयार करुन सादर करणे, अनुसूचित जाती, जमाती समाजातील लोकांना विहिरीसाठी वीज जोडणी देणे, तीर्थस्थळ, पर्यटन स्थळ यासाठी उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करुन सदर निधी लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी वेळेत खर्च करावा. यावेळी तसेच सन 2020-21 आराखड्यातील विविध कामांवर झालेल्या खर्चाचा तसेच नियोजित प्रस्तावित खर्चाचा देखील आढावा घेतला. तसेच सर्वसाधारण वार्षिक योजना, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतंर्गत नाविन्यपूर्ण योजना, केंद्र पुरस्कृत योजनांसाठी झालेल्या खर्चाचा व नियोजित खर्चाचा आढावा घेतला. शिक्षण, आरोग्य, स्वच्छ भारत अभियान आदीबाबतही संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आढावा घेतला. तसेच सर्व संबंधीत विभागांनी सन 2020-21 अंतर्गत त्यांना प्राप्त झालेल्या निधीचे योग्य नियोजन करुन वेळेत खर्च करावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांनी दिलेल्या सूचना व मागण्याच्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणेने त्याचे निरसन करावे व केलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित सदस्यांना वेळेत मिळेल याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी दिल्या.

सन 2021-22 अंतर्गत सर्वसाधारण वार्षिक योजनाकरीता 101 कोटी 68 लाख तर अनुसूचित जाती उपयोजनाकरीता 51 कोटी 90 लाख आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतंर्गत 18 कोटी 12 लाख 51 हजार अशा एकुण 171 कोटी 70 लाख 51 हजार खर्चाच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच जिल्हा वार्षिक योजना 2020-2021 अंतर्गत 15 जानेवारी 2021 अखेर झालेल्या खर्चाचा देखील आढावा यावेळी श्रीमती गायकवाड यांनी  घेतला .  

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सन 2021-22 चा प्रारुप आराखडा मान्यतेसाठी समितीसमोर सादर केला. तसेच सन 2020-21 च्या खर्चाचा सविस्तर आढावा सादर केला. तसेच सन 2020-21 साठी  प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव प्राप्त झाले असून लवकरच प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही करुन शंभर टक्के खर्च करण्यात येईल असे सांगितले.

यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर, समाज कल्याण आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी अनुसूचित जाती उपयोजनेचा प्रारुप आराखडा सादर केला तर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांनी ही अनुसूचित जमाती उपयोजनेचा प्रारुप आराखडा सादर केला. यावेळी सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची बैठकीस उपस्थिती होती.

*****

23 January, 2021

जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

 



हिंगोली,दि.23 (जिमाका): येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अरुणा संगेवार, नायब तहसिलदार राजेंद्र गळगे, नायब तहसिलदार राजेंद्र सुर्यवंशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी यांनी  देखील त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.  

****

22 January, 2021

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांचा हिंगोली दौरा

 


           हिंगोली,दि.12: राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री  प्रा. वर्षाताई गायकवाड या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. 

रविवार, दि. 24 जानेवारी,2021 रोजी दुपारी 02.30 वाजता सेनगाव येथे आगमन व राखीव. सायंकाळी 05.00 वाजता सेनगावहून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. सायंकाळी 06.00 वाजता हिंगोली शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.

            सोमवार, दि. 25 जानेवारी, 2021  रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 02.00 वाजता कार्यकारी समिती (जिल्हा नियोजन समिती) बैठकीस उपस्थिती. दुपारी 02.00 वाजता राखीव. दुपारी 03.00 ते सायंकाळी 06.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव. रात्री 09.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे मुक्काम.

मंगळवार, दि. 26 जानेवारी, 2021 रोजी सकाळी 09.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.30 वाजता राखीव. दुपारी 12.00 वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 04.00 वाजता हिंगोली येथून मोटारीने परभणी कडे प्रयाण करतील.

 

****

 

राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन

 


            हिंगोली,(जिमाका) दि. 22 : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्या कार्यालयात आणि जिल्ह्यातील सर्व मदान केंद्राच्या ठिकाणी 25 जानेवारी, 2021 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस' साजरा करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम 25 जानेवारी, 2021 रोजी सकाळी 09:30 वाजता शिवाजी महाविद्यालय, हिंगोली येथे आयोजीत करण्यात आला आहे.   

            भारत निवडणूक आयोगाच्या दि20 जानेवारी, 2021 च्या पत्रान्वये यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिवसापासुन भारत निवडणूक आयोगाने मतदारांना सहज आणि सोप्या पध्दीतीने ई-छायाचित्र मतदार ओळखपत्र (e-EPIC) डाऊनलोड करुन घेण्यासाठी https://nvsp.in/, https://voterportal.eci.gov.in/ या वेबपोर्टलव्दारे तसेच Voter Helpline Mobile App (Android & iOS) या ॲपव्दारे सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

            दि. 01 जानेवारी, 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीच्या कार्यक्रमात नव्याने मतदार म्हणुन नोंदणी झालेल्या नवमतदारांना सदर सुविधा दि. 25 जानेवारी, 2021 ते दि. 31 जानेवारी, 2021 या कालावधीत वापरता येणार आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाने https://kyc.eci.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध करुन दिलेली Ekyc पुर्ण करुन दि. 01 फेब्रुवारी, 2021 पासुन सर्व मतदारांना उक्त वेबपोर्टल व ॲपव्दारे e-EPIC डाऊनलोड करता  येणार आहे. सदर e-EPIC प्रिंट करुन मतदानासाठी ओळखीचा पुरावा म्हणुन वापरता येणार आहे.

            त्या अनुषंगाने e-EPIC सुविधेचा वापर करुन छायाचित्रमतदार ओळखपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. EPIC डाऊनलोड करताना काही अडचण आल्यास भारत निवडणूक अयोगाचे नोडल अधिकारी श्री. पुनेत ग्रोवेर मो. नं. 9953670300 व श्रीमती विना त्यागी मो. नं. 9867088248 यांचेशी संपर्क साधाण्याचे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणविरकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

****

 

 

सरपंच पदाचे आरक्षण सोडत 28 व 29 जानेवारीला

 

सरपंच पदाचे आरक्षण सोडत 28 व 29 जानेवारीला

 

हिंगोली,(जिमाका) दि. 22 :  जिल्ह्यातील सेनगाव, वसमत आणि कळमनुरी या तालुक्याचे सरपंच पदाचे आरक्षण कार्यक्रम गुरुवार, 28 जानेवारी 2021 रोजी सकाळी 12.00 वाजता तर हिंगोली आणि औंढा नागनाथ या तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण कार्यक्रम शुक्रवार 29 जानेवारी, 2021 रोजी सकाळी 12.00 वाजता सर्व संबंधित तालुका मुख्यालयी होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे.   

****

 

21 January, 2021

मुद्रांक शुल्क थकबाकीदारांना थकीत रक्कम जमा करण्याचे आवाहन -- सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संजय पाटील

  हिंगोली, दि.21 (जिमाका):  मालमत्ता खरेदीच्या दस्त नोंदणीत महालेखापाल नागपूर यांनी दूय्यम निबंधक कार्यालयाच्या केलेल्या तपासणीत मालमत्तेचे मूल्य कमी दाखवून मुद्रांक शुल्क कमी भरलेल्या 8 थकबाकीदारांची नांवे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संजय पाटील यांनी जाहिर केली आहे. सदर  थकबाकीदारांकडून थकीत मुद्रांक शुल्काची रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

मालमत्ता खरेदीच्या दस्त नोंदणीमध्ये मालमत्तेचे मुल्यांकन कमी दाखवून मुद्रांक शुल्कापोटी कमी रक्कमेचा भरणा करणाऱ्याकडून थकीत  मुद्रांक शुल्काची रक्कम वसुल करण्याची कार्यवाही सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. मालमत्तेचे मुल्यांकन कमी दाखवून मुद्रांक शुल्कापोटी कमी रक्कमेचा भरणाऱ्या मध्ये शैलेश रमेशलाल ओस्वाल, विनायक श्रीराम भिसे  आणि संतोष श्रीराम भिसे, सर्व राहणार हिंगोली यांच्याकडे रु. 1 लाख 76 हजार 25 थकबाकीची रक्क्म आहे. तर श्रीराम नारायण कानबाळे आणि संतोष श्रीराम भिसे, सर्व राहणार हिंगोली - रु. 49 हजार 360,  श्रीनिवास द्वारकादास मुदंडा व श्रीमती पुष्पाताई भ्र गणेशलाल जैस्वाल, सर्व राहणार हिंगोली - रु. 3 लाख 40 हजार 725, मोहम्मद उमर अब्दूल गनी आणि सय्यद युनुस सय्यद मन्सूर, सर्व राहणार हिंगोली - रु. 73 हजार 740, लक्ष्मीकांत जयकिशनजी लड्डा, राहणार मोर्शी रोड, अमरावती - रु. 2 लाख 8 हजार 20, तुकाराम सिताराम शिंदे, नारायण शंकरराव बुद्रक आणि विलास लक्ष्मणअप्पा गोठरे सर्व राहणार हिंगोली रु. 74 हजार 700, सतीष सोपानराव येरनाळे राहणार विराळ, ता. जळकोट, जि. लातूर- रु. 3 लाख 39 हजार 840 आणि प्रविण मांगीलालजी भंडारी (मे. महेश असो. गंगाखेड)- रु. 3 लाख 39 हजार 840 थकीत रक्कम भरलेली नाही. याकरीता या थकबाकीदारांनी रक्कमा भरणा करण्यासंदर्भात वेळोवळी नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर थकबाकीदारांनी थकीत असलेली रक्कम (दंडासह) पंधरा दिवसात जमा करावी, अन्यथा महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 46 नुसार संबंधित थकबाकीदाराच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा जाहिर लिलावाद्वारे विक्री करुन सदर रक्कम वसूल करण्यात येईल.

****