30 September, 2020

एमएचटी-सीईटी 2020 प्रवेश परीक्षा केंद्रावर 144 कलम लागू

 


 

हिंगोली,दि.30: शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकीय, औषध निर्माणशास्त्र व कृषि तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी 2020 ही प्रवेश परीक्षा ऑनलाईन पध्दतीने हिंगोली जिल्ह्यात मुख्यालयाच्या ठिकाणी शासकीय तंत्रनिकेतन लिंबाळा, हिंगोली येथे दिनांक 1 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत  सकाळी 7.30 ते दुपारी 12.00 प्रथम सत्र, दुपारी 12.30 ते सायं. 6.45 पर्यंत द्वितीय सत्र याप्रमाणे परीक्षा घेण्यात येणार आहे. या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात  कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती  हाताळण्यासाठी  परीक्षा केंद्र परिसरात सकाळी 7.00 ते सायं 6.45 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आली आहे.

या परीक्षा उपकेंद्राची इमारत व परिसर यामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. 200 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बुथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परिक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकरी-कर्मचारी आणि पोलीस अधिक्षक यांनी बंदोबस्तकामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी ज्यांना परवानी दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल.

या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

 

 

       

 

दिपावलीनिमित्त तात्पुरते फटाके परवान्यासाठी अर्ज करावेत

 

 

        हिंगोली, दि.30: जिल्ह्यात दिपावली-2020 संबंधाने तात्पुरते फटाके परवाना (मोकळ्या जागेत) मिळण्यासाठी दिनांक 1 ते 7 ऑक्टोबर, 2020 या कालावधीत किरकोळ फटाके विक्रीचा व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांना तात्पुरते फटाके परवाना मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावेत. हा अर्ज स्फोटक अधिनियम 2008 मधील नियम 113 (फॉर्म नं. एई-5) मध्ये करणे आवश्यक आहे. अर्जासोबत अर्जदाराच्या पासपोर्ट साईज आकाराची तीन फोटो व संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद, तहसीलदार, पोलीस स्टेशन यांचे नाहरकत प्रमाणपत्र व अर्जदारांचे चारित्र्य प्रमाणपत्र, जागेच्या मालकीचा पुरावा व मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक राहील. खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून तात्पुरते फटाके परवान्यासाठी अर्ज करावेत. त्याशिवाय अर्ज स्विकारले जाणार नाहीत.       

तात्पुरते फटाके ज्वलनशील नसलेल्या शेडमध्ये ठेवण्यात यावे व त्यामध्ये अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही या दृष्टीने सुरक्षा व्यवस्था ठेवावी, फटाके  विक्रीचे व साठवणुकीचे दुकाने  एकमेकांपासून  कमीत कमी तीन मीटर अंतरावर असावेत आणि सुरक्षित कामापासून 50 मीटर अंतरावर असावे, फटाके शेड हे एकमेकाच्या समोर नसावे, कोणत्याही प्रकारचे तेलाचे दिवे, गॅस दिवे, उघडे दिवे शेडमध्ये सुरक्षित अंतरामध्ये वापरु नये व विद्युत  बल्ब वापरल्यास ते भिंतीला लावलेले असावेत. केवळ वायरने लोंबकाळत ठेवण्यात येऊ नये. विद्युत  बल्बचे बटन प्रत्येक दुकानाच्या भिंतीवर लावलेले असावेत व मास्टर स्विच प्रत्येक रांगेमध्ये असावे. कोणत्याही प्रकारचे फटाके शेड पासून 50 मीटर आत फोडू नये. एका ठिकाणी 50 पेक्षा अधिक दुकांनाना  परवानगी देण्यात येणार नाही. व्यवसाय कर अधिकारी यांचे ना-देय प्रमाणपत्राशिवाय अर्ज स्विकारला जाणार नाही. तात्पुरता फटाका परवान्याची पाचशे रुपये फीस चलनाद्वारे भरणा करणे आवश्यक राहील, असे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांनी कळविले आहे.

0000

       

29 September, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 36 रुग्ण ; तर 13 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  312 रुग्णांवर उपचार सुरु तर एकाचा मृत्यू

 

        हिंगोली,दि.29: जिल्ह्यात 36 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परीसरात 17 व्यक्ती, औंढा परिसर 01 व्यक्ती व कळमनुरी परिसर 03 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसर 08 व्यक्ती, सेनगांव परिसर 05 व्यक्ती, औंढा परिसर 01 व्यक्ती आणि वसमत परिसरात 01 व्यक्ती  असे एकूण 36 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 13 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आज एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

            सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 22 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 08 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 30 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 2 हजार 640 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 291 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 312 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 37 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी कळविले आहे.

*****

 

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यात 01 लाख 75 हजार 234 कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण

 

       

       * जिल्ह्यात सर्वेक्षणाचे 74 टक्के उद्दिष्ट साध्य.

 

हिंगोली दि. 29: कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत 1 हजार 222 पथकामार्फत 01 लाख 75 हजार 234 कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करुन 74 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे.

या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक कुटुंबातील मिळून 08 लाख 86 हजार 89 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 589 कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता 103 पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांना उपचारासाठी संदर्भीत करण्यात आले आहेत. तसेच सारी आजाराची 148 रुग्ण तर मधुमेहाची 3 हजार 703, उच्च रक्तदाबाची 6 हजार 792 किडनी आजाराची 55, लिव्हर आजाराचे 17 व इतर आजाराचे 3 हजार 610 रुग्ण या तपासणीत आढळून आली आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तालुकानिहाय तपशील पुढील प्रमाणे आहे.

हिंगोली तालुक्यात 200 पथकांमार्फत 46 हजार 419 कुटुबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून 2 लाख 30 हजार 641 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये मधुमेहाची 571 तर उच्चरक्तदाबाची 592 आणि इतर आजाराची 1 हजार 449 रुग्ण आढळून आली आहेत. वसमत तालुक्यातील 244 पथकांमार्फत 43 हजार 262 कुटुबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून 2 लाख 46 हजार 922 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.  या तपासणी मध्ये 158 कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता 37 पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सारी आजाराची 02 रुग्ण तर मधुमेहाची 1 हजार 039, उच्चरक्त दाबाची 3 हजार 618 किडनी आजाराची 14, लिव्हर आजाराचे 11 व इतर आजाराचे 1 हजार 111 रुग्ण या तपासणीत आढळून आली आहे. कळमनुरी तालुक्यातील 191 पथकांमार्फत 27 हजार 808 कुटुबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून 1 लाख 35 हजार 431 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.  या तपासणी मध्ये 93 कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता 22 पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सारी आजाराची 113 रुग्ण तर मधुमेहाची 643, उच्च रक्त दाबाची 1 हजार 025 किडनी आजाराची 01 व इतर आजाराचे 241 रुग्ण या तपासणीत आढळून आली आहेत. सेनगांव तालुक्यातील 65 पथकांमार्फत 31 हजार 568 कुटुबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून 1 लाख 49 हजार 487 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.  या तपासणी मध्ये 244 कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता 40 पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सारी आजाराची 33 रुग्ण तर मधुमेहाची 346, उच्चरक्त दाबाची 471, किडनी आजाराची 34, लिव्हर आजाराचे 02 व इतर आजाराचे 230 रुग्ण या तपासणीत आढळून आली आहे आणि औंढा तालुक्यातील 522 पथकांमार्फत 26 हजार 177 कुटुबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून 1 लाख 23 हजार 608 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.  या तपासणी मध्ये 94 कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता 04 पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच मधुमेहाची 1 हजार 104, उच्चरक्त दाबाची 1 हजार 086, किडनी आजाराची 06, लिव्हर आजाराचे 04 व इतर आजाराचे 579 रुग्ण या तपासणीत आढळून आली आहेत.

‘कोविड मुक्त महाराष्ट्र’ ही जनजागरण मोहिम राज्यभर शासनाच्या वतीने राबविण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जाणा-या या मोहिमेत गावे, तांडे, वस्त्या, प्रभागातील प्रत्येक घराला भेट देण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्याता आली आहेत. खोकला, ताप, दमा लागने अशी कोविड सदृश्य लक्षणे असणा-या रुग्णांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भीत केले जात आहे तसेच विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे.

 

*****

 

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली, दि.29 : जिल्ह्यात फलोत्पादनामध्ये दिवसेंदिवस होत चाललेली वाढ लक्षात घेता फळे व भाजीपाला या पिकांची व्यवसायिक पध्दतीने लागवड करुन घेता यावे तसेच निर्यात करता यावे. यासाठी नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेली कीड व रोग मुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे भाजीपाला पिकांची दर्जेदार व किडरोग मुक्त रोपे निर्मिती करुन उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे, रोपवाटीकेमुळे स्थानिक शेतक-यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणे, पिक रचनेत बदल घडवून आणने व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे, शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे या उद्देशाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा दर्जेदार किड व रोग मुक्त रोपे तयार करण्यास लहान रोपवाटीका उभारण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना नव्याने सुरु केली आहे.

शेतक-यांना स्वत:च्या मालकीचे किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे व कायम स्वरुपी पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. या योजनेस महिला कृषि पदवीधारकांना प्रथम प्राधान्य राहील. महिला गट, महिला शेतकरी यांना द्वितीय प्राधान्य  राहील.  तसेच भाजीपाला उत्पादक व अत्यल्पभूधारक शेतकरी यांना तृतीय प्राधान्य राहील. इच्छुक शेतक-यांनी MahaDBT या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अर्ज करावेत. अर्ज करण्याची प्रक्रीया दि. 02 ऑक्टोबर 2020 ते दि. 19 ऑक्टोबर, 2020 या दरम्यान राहील याची नोंद घ्यावी.

या योजनेस जास्तीत जास्त 10 गुंठे क्षेत्र अनुदानास पात्र राहील व प्रकल्प खर्च मर्यादा 4 लाख 60 हजार एवढी असून अनुदान 02 लाख 30 हजार असणार आहे. हे अनुदान दोन हप्त्यामध्ये वितरीत करण्यात येणार आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय फलोत्पादन  अभियान धरतीवर राबविण्यात येईल. या योजनेंतर्गत प्रकल्प उभारणी नंतर प्रकल्प प्रथम हप्ता 60 टक्के व उर्वरीत द्वितीय हप्ता 40 टक्के अनुदान वितरीत करण्यात येईल.

योजनेचा कालावधी सन 2020-21 व सन 2021-22 असा राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी धारकानी यापूर्वी शेडनेट हाऊस, पॉली हाऊसचा कुठल्याही योजनेतून लाभ घेतलेला नसावा. लक्षांकापेक्षा जास्तीचे अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पध्दतीने अर्जाची निवड करण्यात येईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व पात्र शेतक-यांनी अर्ज करावेत असे आवाहन येथील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  विजय लोखंडे यांनी केले आहे.   

*****

28 September, 2020

कळमनुरी तालुक्यातील मौ. झरा आणि सेनगाव तालुक्यातील मौ. हत्ता व कोळसा गांव कंटेनमेंट झोन घोषित

 

कळमनुरी तालुक्यातील मौ. झरा आणि सेनगाव तालुक्यातील मौ. हत्ता व कोळसा

गांव कंटेनमेंट झोन घोषित

 

      हिंगोली, दि.28 :  कळमनुरी तालुक्यातील मौ. झरा आणि सेनगाव तालुक्यातील मौ. हत्ता व  कोळसा येथे कोविड-19 चे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव इतरत्र होवू नये यासाठी कारेगाव येथील संपूर्ण क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक त्या सेवा  ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.

            या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

****

 

27 September, 2020

कष्टकरी शेतकरी बांधवांना एकजूटीने, खंबीरपणाने साथ देवू - कृषि मंत्री दादाजी भुसे

 


·  हिंगोली व परभणी जिल्ह्यातील पिकांचे तातडीने पंचनामे करावीत.

·  अहिल्याबाई होळकर यांच्या नावे प्रायोगिक तत्वावर पाचशे रोपवाटिका तयार करणार.

·  रानभाज्या विक्री महोत्सव सातत्याने सुरु ठेवावीत.

 

        हिंगोली/परभणी,दि.27 : कोरोना महामारीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी मार्गक्रमण करीत असतांना स्वत:चे दु:ख बाजूला सारुन  राज्यातील सर्व जनतेस कोणत्याही प्रकारचे अन्नधान्य आणि दूधाची कमी पडू दिले नाही, याचे श्रेय सर्व शेतकरी बांधवांना द्यावे लागेल. यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून समाजानेही शेतकरी बांधवांना मानसिक आधार देवून त्यांना साथ देण्याचे आवाहन कृषि मंत्री दादाजी भूसे यांनी केले.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीसी सभागृहात हिंगोली व परभणी जिल्ह्यातील पाऊस, पीक परिस्थिती आणि कृषी योजना अंमलबजावणीबाबतच्या आढावा बैठकीत कृषी मंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, कृषी सहससंचालक तुकाराम जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी अरुण संगेवार हिंगोलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, परभणीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            कृषि मंत्री श्री. भुसे पुढे म्हणाले की, सध्या हिंगोली व परभणी जिल्ह्यात दररोजच कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असुन ढगाळ वातावरणामुळे पिके पिवळी पडत आहे. अतिवृष्टीमुळे ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले तेथील पिकांचे जलदगतीने पंचनामे करावेत. यासाठी आवश्यकता भासल्यास ग्रामविकास व महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी नियुक्त करुन या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत. महाराष्ट्रात सगळीकडेच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीची माहिती एकत्रित करुन मंत्रीमंडळ बैठकीत ठेवून शेतकरी बांधवाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच केंद्राकडे देखील याबाबत मदत करण्यासाठी विनंती करण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय पथकास पाहणी दौऱ्याची विनंती करण्यात येणार असल्याचे असल्याचेही श्री. भुसे यावेळी म्हणाले.

            प्रधानमंत्री किसान योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची संयुक्त पथक नेमून माहिती घ्यावी आणि निकषात पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची नोंद करावी. जिल्ह्यातील धरणामध्ये पुरेसा जलसाठा झालेला असून त्यामूळे रब्बी क्षेत्रात वाढ होणार आहे. यासाठी बियाणे व खतांची विशेषत: युरिया खताची कमतरता पडणार नाही याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.

            यावेळी श्री. भूसे यांनी पिक विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींशी भ्रमणध्वणीवर संपर्क साधुन प्रत्येक तालुका आणि क्षेत्रीय पातळीवर संपर्क साधण्याच्या पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना सूचना द्याव्यात, असे निर्देश दिले. तसेच क्षेत्रनिहाय विमा प्रतिनिधींची माहिती घेवून त्यांचे संपर्क क्रमांकांची यादी प्रसिध्दी करावी. तसेच या कंपन्याकडे कृषि विभागाने व शेतकऱ्यांनी सद्यस्थितीतील नुकसानीची माहिती कळवावी अशाही सूचना कृषि मंत्री भुसे यांनी यावेळी केल्या.

            खरिप पेरणीच्या सुरुवातीस सोयाबीन बियाणांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. या बियाणांची पडताळणी करुन अनेक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर काही कंपन्याचे परवाने रद्द करण्यात आले. त्यामूळे पुढील पेरणीकरीता शेतकऱ्यांनी स्वत:चे बियाणे तयार करण्यासाठी चांगल्या प्रकारचे बियाणे काढून ठेवावे. कृषि विभागाने ही मोहीम चांगल्या प्रकारे राबविल्यामूळे बियाणे कमी पडले नाही. माननीय मुख्यमंत्री यांनी ‘विकेल ते पिकेल’ ही योजना सुरु केली असून ग्राहकांची जी मागणी आहे,  त्याच पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे, असा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल.

            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रानभाज्या महोत्सवाला महत्व आले आहे. पूर्वजांनी जपलेला हा निसर्गाचा ठेवा नागरिकांसमोर यावा व त्याद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा हाच उद्देश समोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला.  हा उपक्रम एक दिवसाचा न राहता कायमपणे कसा राहील यासाठी प्रयत्न करण्याची गरज असुन ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महापालिकेने यासाठी जागा उपलब्ध करुन द्याव्यात. यामुळे ग्राहकांना ताजा भाजीपाला व फळे उपलब्ध होवून त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने प्रायोगिक तत्वांवर 500 रोपवाटीका तयार करण्याचे काम सुरु असून, या रोपवाटीकेमध्ये भाजीपाल्यांची रोपे तयार करण्यात येणार आहेत. याचा जास्तीत-जास्त लाभ मराठवाडा आणि विदर्भाला देण्याचा मानस असल्याचेही यावेळी कृषि मंत्री श्री भुसे यांनी सांगितले.

            हिंगोली जिल्ह्यात पिक कर्ज वाटपाचे प्रमाण अत्यल्प झाले असून जे शेतकरी बांधव बँककडे कर्जाची मागणी करण्यासाठी जात आहे त्यांना बँक कर्मचाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असुन हे बरोबर नाही. शेतकऱ्यांना सौजन्याची वागणुक देण्याबाबत सर्व बँकांना जिल्हाधिकारी यांनी सुचना करावी आणि पिक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम सुरु आहे. यासाठी गोडाऊन, शितगृहे, वाहतूक, प्रक्रीया उद्योग आदीबाबत नियोजन करुन शेतकरी उद्योजक निर्मित उत्पादन करण्यात येणार असल्याचे सांगत नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेंतर्गत प्रलंबित प्रकरणी तातडीने कार्यवाही करावी.

            हिंगोली जिल्ह्यात हळदीचे शास्त्रीय पध्दतीने संशोधन करण्यासाठी प्रक्रीया केंद्र उभारण्याचे काम शासनाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. यासाठी खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून खासदार पाटील यांनी हिंगोली व परभणीकडेच न पाहता संपूर्ण महाराष्ट्रात उत्पादन घेणाऱ्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्न करावेत, असेही कृषी मंत्री भुसे यावेळी खा. पाटील यांना म्हणाले.

यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे सरसकट पिकाचे पंचनामे करण्याची मागणी केली. तसेच पिक कर्ज वितरणाचे प्रमाण खूप कमी झाल्याची खंत व्यक्त करुन शेतकऱ्यांप्रती बँकांची वागणूक अशोभनीय आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दरमहिन्यास आढावा बैठक घेवून उद्दिष्ट पूर्ण करण्यास सांगावे. ज्या बँका उद्दिष्ट पूर्ण करत नाहीत त्यांचा अहवाल रिझर्व्ह बँकेस कळविण्याच्या सूचना देवून पिक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली.

            यावेळी आमदार राजु नवघरे यांनी हिंगोली जिल्हा हा मागास जिल्हा असून यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सोयाबीन कापूस उस पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व गावे नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजनेत घेण्याची विनंती केली. आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी सततच्या पावसामुळे मुग, उडीद सोयाबीन हातचे गेल्यामूळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली. तसेच हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार संतोष बांगर यांनी केली.  

     हिंगोलीचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय लोखंडे यांनी जिल्ह्यातील पाऊस, पीक परिस्थिती तसेच ‘विकेल ते पिकेल’, पोकरा यासह इतर कृषी योजनांच्या जिल्ह्यातील अमंलबजावणी बाबत माहिती दिली. यामध्ये माहे जून ते ऑगस्ट मध्येअतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीचे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले असून 06  हजार  119 हेक्टर बाधीत क्षेत्र आहे. जिल्ह्यात सन 2020-21 खरीप हंगामामध्ये एकूण प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र 04 लाख 6 हजार 773 हेक्टर इतके आहे. तसेच राष्ट्रीय बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, ग्रामीण बँकांनी मिळून दि. 26 सप्टेंबर अखेर खरीप कर्ज एकूण रु. 485 कोटी 80 लक्ष वाटप केले आहे. महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 86 हजार 653 शेतकऱ्यांना 565 कोटी 58 लक्ष रु. कर्ज वाटप करण्यात आले आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील एकूण 240 गावाची निवड करण्यात आली असून त्यांना 16 कोटी 95 लक्ष रु. एवढे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. विकेल ते पिकेल धोरणातंर्गत उपप्रकल्पांच्या अर्थसहाय्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART), नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (POCRA), केंद्र पुरस्कृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्याची योजना (FPO), राज्य पुरस्कृत गट शेती योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास इत्यादी  योजनातून अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.

पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 3 लाख 888 अर्ज आले असून त्यामधून 1 लाख 47 हजार 723 हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये समाज माध्यमांचा वापर करुन शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करण्यासाठी शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उप्तादक कंपनी व ग्राहक यांच्या व्हॉटस् ॲप ग्रुप तयार करुन भाजीपाला व फळांची थेट ग्राहकांना विक्री करण्यात आली. यामध्ये एकूण 57 गटांद्वारे व 135 व्हॉट्स अप ग्रुपद्वारे 07 हजार 653 क्विंटल  भाजीपाला व फळांची  विक्री करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय लोखंडे यांनी सादरीकरणांद्वारे दिली.

     परभणीचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी संतोष आळसे यांनी जिल्ह्यातील पाऊस, पीक परिस्थिती तसेच विकेल ते पिकेल, पोकरा यासह इतर कृषी योजनांच्या जिल्ह्यातील अमंलबजावणीबाबत माहिती दिली. यामध्ये माहे जून ते ऑगस्ट मध्येअतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या नुकसानीचे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असून 27  हजार  412 हेक्टर बाधीत क्षेत्र आहे. जिल्ह्यात सन 2020-21 खरीप हंगामामध्ये एकूण प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र 05 लाख 23 हजार 809 हेक्टर इतके आहे. तसेच राष्ट्रीय बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, ग्रामीण बँकांनी मिळून दि. 26 सप्टेंबर 2020 अखेर खरीप कर्ज एकूण रु. 710 कोटी 83 लक्ष वाटप केले आहे. महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 01 लाख 71 हजार 166 शेतकऱ्यांना 1069 कोटी रु. कर्ज वाटप करण्यात आले आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातंर्गत जिल्ह्यातील एकूण 275 गावाची निवड करण्यात आली असून 4 हजार 954 शेतकरी लाभार्थ्यांना 12 कोटी 79 लक्ष रुपये एवढे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. विकेल ते पिकेल धोरणातंर्गत उपप्रकल्पांच्या अर्थसहाय्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART), नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (POCRA), केंद्र पुरस्कृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्याची योजना (FPO), राज्य पुरस्कृत गट शेती योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास, भाऊसाहेब पांडुरंग फळबाग लागवड योजना, महात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना इत्यादी  योजनातून अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.

पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 07 लाख 129अर्ज आले असून त्यामधून 3 लाख 76 हजार 81 हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये समाज माध्यमांचा वापर करुन शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करण्यासाठी शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उप्तादक कंपनी व ग्राहक यांच्या व्हॉटस् ॲप ग्रुप तयार करुन भाजीपाला व फळांची थेट ग्राहकांना विक्री करण्यात आज्याचह माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी संतोष आळसे यांनी सादरीकरणाद्वारे दिली.

यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपविभागीय कृषि अधिकारी, तालूका कृषि अधिकारी यांची  उपस्थिती होती.

बैठकीनंतर कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी औंढा तालुक्यातील हिवरा जाटू येथील ग्यानदेव उघडे यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांची पाहणी केली. तर काठोडा तांडा येथील शेतकरी विठ्ठल बुचके यांच्या शेतातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. औंढा नागनाथ येथील श्रीभोणे या शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळाच्या स्टॉलचे उद्घाटन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

 

****

26 September, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 25 रुग्ण; तर 38 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 

·        285 रुग्णांवर उपचार सुरु तर एक जणाचा मृत्यू

        हिंगोली,दि.26: जिल्ह्यात आज  नवीन 25 कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली परिसर 14 व्यक्ती, कळमनुरी परिसर 01 व्यक्ती व वसमत परिसर 01 व्यक्ती रॅपीड अँटीजन टेस्ट द्वारे, तर वसमत परिसर 01 व्यक्ती आणि हिंगोली परिसर 08 व्यक्ती आरटीपीसीआर टेस्टद्वारे कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज 38 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एका रुग्णाचा कोव्हिड-19 मुळे आज मृत्यू झाला आहे.

            सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 21 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 8 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 29 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

            जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 2 हजार 541 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 222 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 285 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 34 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी कळविले आहे.

****

 

    

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ही मोहिम आरोग्याची चळवळ व्हावी ---- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

 


औरंगाबाद. (विमाका) दि. 26 ---  कोरोनावर मात करण्यासाठी  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारीही मोहिम प्रभावीपणे राबवावी. या मोहिमेत प्रत्येकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.  ही मोहिम आरोग्याची  चळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.  ज्याप्रमाणे केरळ हे देशातील सर्वाधिक साक्षरतेचे राज्य म्हणून ओळखले जाते. त्याप्रमाणे आपला महाराष्ट्र हे आरोग्य साक्षरतेत सर्वात पुढे राहील, असे प्रयत्न करायचे आहेत. स्वतःची काळजी घेतानाच इतरांची कशी काळजी घ्यायची. गर्दीच्या ठिकाणी कसे वर्तन करायचे या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहचवायच्या आहेत, असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज मराठवाडा विभागातील आठ जिल्हयांशी दृकश्राव्य प्रणालीव्दारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी   उदयोग मंत्री  तथा औरंगाबाद जिल्हयाचे पालकमंत्री  सुभाष देसाई. सार्वजनिक बांधकाम मंत्री  तथा नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री  अशोक चव्हाण, अल्पसंख्याक विकास  व औकाफ मंत्री तथा परभणी जिल्हयाचे पालकमंत्री नवाब मलिक, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण  मंत्री  तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री  राजेश टोपे,  वैदयकीय शिक्षण मंत्री  तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री  अमित देशमुख, सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री  तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री  धनंजय  मुंढे सहभागी झाले होते.

      तर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक एम.के. प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, महानगर पालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, शासकीय वैदयकीय महाविदयालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आदींसह इतर अधिकारी  उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाचे संरक्षण  हा  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारीया मोहिमेचा उदेदश आहे.  ही मोहिम आता सगळीकडे प्रभावीपणे राबविली जाईल, असा विश्वास वाटतो आहे. मराठवाड्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. आरटी-पीसीआर टेस्टची संख्या वाढविणे आवश्यक आहे. ज्यांची अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आली असेल, आणि लक्षण असतील त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट होणे आवश्यक आहे. ग्रेट ब्रिटनसारख्या देशात आता लक्षणे न दिसणाऱ्या पण पॉझिटीव्ह रुग्णांना घरीच उपचार दिले जात आहेत. पण त्यांची दररोज चौकशी केली जाते. त्यांना त्रास होऊ लागल्यास रुग्णालयात दाखल केले जात आहे. आपल्याकडे होम आयसोलेशन आणि होम क्वारंटाईन यांची गल्लत केली जात आहे. होम क्वारंटाईन केलेल्यांना आपण घरी जाऊ देतो. पण लक्षणे न दिसणारी अशी मंडळी बाहेर फिरू लागतात आणि त्यांच्यामुळे अन्य काहींपर्यंत विषाणू पोहचू लागला आहे.

दरम्यान,  जगभर आता या विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल, असे म्हटले जात आहे. कारण आर्थिक चक्र फिरवण्यासाठी तरूण पिढी बाहेर पडू लागली आहे. ती कामावर जाऊ लागली आहे. पण त्यांच्यामुळे घरच्या ज्येष्ठांपर्यंत विषाणू पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता आपल्याला जनजागृतीवर मोठा भर द्यावा लागणार आहे. ब्रिटनमध्ये मास्क न वापरण्यांना मोठा दंड करणे सुरु केले आहे. त्यामुळे आपल्याकडेही आता बाहेर पडताना मास्क घातलाच पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी दंड करणेही आवश्यक असेल, तर तेही प्रभावीपणे केले पाहिजे.  

ब्रिटन आणि अन्य देशात आता पुन्हा बंधने घालणे सुरु करण्यात आले आहे. रात्री दहानंतर व्यवहार बंद करणे, कार्यक्रमांवर आणि गर्दी रोखण्यासाठीचे उपाय योजले जात आहेत. पुढचे सहा महिने ही बंधने राहतील अशी शक्यताही आहे. त्यामुळे आपल्याकडे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. या मोहिमचा उद्देश स्वरक्षणाचा आहे. मी सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हा या मोहिमेचा गाभा आहे. त्यामुळे आता आपल्याला जनजागृती आणि ट्रेसिंग- टेस्टिंगवर भर द्यावा लागणार आहे. डॉक्टरला रुग्ण वेळेत मिळणे आणि रुग्णाला डॉक्टर सोबतच औषधे मिळणे यांची सांगड घालावी लागणार आहे. औषधं उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. पण त्यांचा वापर करण्याचा निर्णय आणि जबाबदारी ही डॉक्टरांची आहे. त्यासाठी आपण उपचार पद्धतीसाठी मार्गदर्शक सूचनाही तयार केल्या आहेत. कुणाच्या आग्रहावरून किंवा अनावश्यकरित्या औषधांचा वापर होऊ नये याची दक्षता घेण्याची गरज आहे. विशेषतः कोरोना होऊन गेल्यानंतरच्या उपचारातही काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आपण आरोग्य विभागाचा टास्क फोर्स तयार केला आहे. या टास्क फोर्सने निसंकोचपणे राज्यस्तरावरील टास्क फोर्सशी संपर्क साधावा. यातून राज्यातील मृत्यूदर कमीत कमी रहावा यासाठी करता येतील, ते सर्व प्रय़त्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

राज्यात ऑक्सिजनची उपलब्धता आणि त्याच्या वाहतूकीबाबत केंद्र सरकारशी संपर्क साधला आहे. तसेच औषधांच्या उपलब्धतेसाठी राज्यस्तरावरून केंद्रीय पद्धतीने समन्वयन सुरु असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपली ही माझी कुटुंब माझी जबाबदारी मोहिम देशातील नव्हे, जगातील आरोग्य चळवळ ठरेल, असा विश्वास आहे. यात आपल्याला जनतेचा सहभाग वाढवायचा आहे. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी आपण यातून घेणार आहोत. लहानपणी आपल्याला आई-वडील बाहेरून आल्यानंतर हात-पाय धुवा, स्वच्छतेची काळजी घ्या अशा सवयी लावत. त्यामुळे आता या सूचना ग्रामीण भागापर्यंत आणि तळागाळापर्यंत पोहचविण्याची गरज आहे. प्रत्येक प्रदेशाची एक खासियत आहे, तिथे वेगवेगळ्या लोककलांची परंपरा आहे. या वेगवेगळ्या शैलींचा वापर करून आपल्याला या गोष्टी लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. लॉकडाऊन हवे की जीवनशैली बदलणे परवडेल हे लोकांना पटवून द्यायला हवे. लॉकडाऊनमुळे जगाचेच अर्थचक्र बिघडले आहे. त्यामुळे हे अर्थकारणाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी जीवन शैलीतील बदल स्विकारावे लागतील. स्वचःची काळजी घेऊन कामांसाठी बाहेर पडावे लागेल. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी यांनी नो मास्क नो एन्ट्री हे धोरण राबविणे सुरु केले आहे. मास्क नसेल तर दुकानात प्रवेश नाही. जो दुकानदार मास्क वापरणार नाही, त्याच्याकडूनही खरेदी नाही, अशी भुमिका घेण्याचे लोकांना आवाहन केले आहे. कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर माझे काय होईल, या भितीने काहीजण तपासणीसाठी पुढे येत नाहीत. तर काही मला काही होत नाही म्हणून बेपर्वाईने वागतात. या दोन्हीतून आपल्याला मार्ग काढून विषाणू प्रसार रोखायचा आहे, असे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करा – या आधीचे सणवार आपण साधेपणाने साजरे केले आहेत. गणेशोत्सवही आपण साधेपणाने साजरा करण्यात यशस्वी झालो. आता आपल्याला येणारा नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करायचा आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात येतील.

दरम्यान, मुख्यमंत्री  श्री. ठाकरे यांनी  आठही जिल्हयातील जिल्हाधिकांऱ्यांशी  संवाद साधून  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारीया मोहिमेचा सविस्तर आढावा घेतला. या मोहिमे अंतर्गत जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. या मोहिमेचा महत्त्वाचा सिम्बॉल जनजागृती करताना वापरण्याची सूचना त्यांनी केली. नांदेडने तयार केलेल्या होम आयसोलेशन किटबददल  त्यांनी समाधान व्यक्त केले तर  बीड जिल्हयात प्रत्येकाच्या दारावर मोहिमेच्या सिम्बॉलचे स्टीकर लावण्याच्या  निणर्याचे कौतुक केले.

औरंगाबाद जिल्हयाचे पालकमंत्री  सुभाष देसाई म्हणाले की,  औरंगाबाद जिल्हयात  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. स्थानिक लोककलावंतांच्या माध्यमातून ही मोहिम तळागाळापर्यंत पोहाचविण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच जनजागृतीसाठी धर्मगुरु यांचेही सहकार्य घेतले जाईल. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही  जिल्हयात मोहिम यशस्वी केली जाईल, असे सांगितले. तसेच  ऑक्सिजनच्या पुरवठयातील अडचणी दूर कराव्यात, असे ते म्हणाले. जालना जिल्हयाचे पालकमंत्री  राजेश टोपे म्हणाले की,  जिल्हयात  कोरोनाच्या नियंत्रणासाठी सुरुवातीपासूनच दक्षता घेतली जात आहे.  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी लोकांचा प्रतिसाद लाभावा, यासाठी प्रयत्न केला जाईल. लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी मोहिमेचे कौतुक करुन जिल्हयात मोहिम उत्तम प्रकारे राबविण्यात येत असल्याचे सांगितले. 15 ऑक्टोबर नंतर मोहिमेचा विस्तार करुन नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे ते म्हणाले. परभणीचे पालकमंत्री  नवाब मलिक यांनी  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेसाठी लोकांचे चांगले सहकार्य मिळत आहे.  लोकप्रतिनिधीही सहकार्य करत आहे. मोहिमेबददल कुणाचीही  तक्रार नाही. ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यात येईल, असे ते म्हणाले. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंढे म्हणाले की, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्वपक्षीय मेळावा घेण्यात आला.  सर्व लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभत आहे. अतिशय प्रभावीपणे  जिल्हयात मोहिम राबविण्यात येत आहे.

यावेळी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर बीडचे  जिल्हाधिकारी राहूल रेखावार, उस्मानाबादचे‍ जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आपआपल्या जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती दिली.

***