23 September, 2020

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 

हिंगोली,दि.23:   जिल्ह्यात कोरोना (कोविड-19) विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंदोबस्त चालू आहे. तसेच 02 ऑक्टोबर, 2020 ला महात्मा गांधी जयंती असून त्याच दिवशी लालबहादूर शास्त्री जयंती आहे. तसेच विविध संघटनेतर्फे त्यांच्या मागणी संदर्भाता मोर्चे, धरणे आंदोलने, रास्तारोको, उपोषणे सुरु असून अशा विविध संघटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दि. 22 सप्टेंबर, 2020 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दि. 06 ऑक्टोबर,2020 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) लागू करण्यात येत असल्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी काढले आहेत.

त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे, अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. जिल्ह्यात पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.  तसेच विशेषरित्या परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक, हिंगोली किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकारी यांना राहतील, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****

No comments: