11 September, 2020

नागरीकांनी पूर परिस्थितीत काळजी घेण्याचे आवाहन · पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 

नागरीकांनी पूर परिस्थितीत काळजी घेण्याचे आवाहन

·   पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 

हिंगोली,दि.11: भारतीय हवामान विभाग यांच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात 11 ते 14 सप्टेंबर, 2020 या कालावधीत जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच येलदरी ,सिध्देश्वर  व इसापूर धरण पूर्णपणे भरले असून संबंधित प्रकल्पातून पाणी सोडल्यास  पुर्णा  व पैनगंगा नदीची पात्रे भरुन वाहू शकतात यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. तसेच जवळील नाले,ओढे काठच्या गावांना तसेच जेथे पुरस्थिती उद्भवू शकते अशा गावांसाठी उपाययोजना व खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

नागरिकांनी गावात पुरस्थिती निर्माण झाल्यास अथवा पुराबाबत पूर्व कल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावे, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा. गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे. गावात, घरात जंतूनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पुर स्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जाते वेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवावे. घर सोडून जातांना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करून जावे. कुंटूंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र राहील याची काळजी घ्यावी. पुरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करावा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करावा.), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर त्यास दोरीच्या सहाय्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न करा, पुर स्थितीत घाबरून जाऊ नका, सरकारी सुचनांचे पालन करा, तात्काळ स्थानिक तहसील कार्यालयास किंवा जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष क्र.०२४५६-२२२५६० या क्रमांकावर संपर्क साधावा.

तसेच पुर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण भटकू नये. पुराच्या पाण्यात चुकुनही जावू नका. तसेच पुर आल्यानंतर पुलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करून नका. दुषित,उघड्यावरील अन्न- पाणी टाळा शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा. सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत् तारांना स्पर्श करू नका. पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतु अपरीचीत व खोल पाण्यात जावू नका असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

****

 

 

 

No comments: